Tag: चंद्रपूर महानगरपालिका

  • चंद्रपूर शहरात पुन्हा विद्रुपीकरणाचा प्रकार, मनपाची पोलिसात तक्रार

    चंद्रपूर शहरात पुन्हा विद्रुपीकरणाचा प्रकार, मनपाची पोलिसात तक्रार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरात विना परवानगी भिंतीपत्रके लावणाऱ्या एक आशा व्यसनमुक्ती केंद्र आरमोरी व रिद्धी बिल्डर्स विरुद्ध महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिका झोन क्र. १ कार्यालयाद्वारे रामनगर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

     

    शहरातील वरोरा नाका,प्रियदर्शिनी चौक,जिल्हा परिषद समोरील परिसर,जटपुरा गेट तसेच डॉ.आलुरवार हॉस्पीटल परिसरात व्यसनमुक्ती केंद्राची तसेच फ्लॅटची जाहिरात करणारी रिद्धी बिल्डर्सची माहिती असलेली पॉम्पलेट्स व स्टिकर मनपाकडुन पूर्वपरवानगी न घेता लावली असल्याचे सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार यांना १३ डिसेंबर रोजी पाहणीदरम्यान आढळुन आले.

     

    संबंधितास भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून पत्रके काढण्यास सांगितले असता अद्याप पावेतो भिंतीपत्रके न काढल्याने एक आशा व्यसनमुक्ती केंद्र व रिद्धी बिल्डर्स यांच्यावर महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत कलम ३ नुसार फौजदारी गुन्हा नोंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे. चंद्रपूर महापालिकेच्या वतीने शासकीय निधीद्वारे शहर सुशोभीकरणाची कामे करण्यात आली आहेत.

     

    भिंतीपत्रके,पोस्टर्स,बॅनरबाजीमुळे शहराच्या विद्रुपीकरणासह शहराच्या सौंदर्यात बाधा येते किंबहुना वाहतुकीसही अडथळा निर्माण होत असल्याने याबाबत उच्च न्यायालय आणि राज्य शासनाने आखुन दिलेल्या सुचनांनुसार कारवाई करण्यात येते. त्यानुसार, परवानगीशिवाय पॅम्प्लेट्स, बॅनर्स, होर्डिंग्ज,कापडी फलक लावणा-यांवर आर्थिक दंडासह कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद या धोरणामध्ये करण्यात आली आहे.

  • केंद्रीय योजनेतून चंद्रपुरात उभे राहणार 10 हजार नवीन घरकुल

    केंद्रीय योजनेतून चंद्रपुरात उभे राहणार 10 हजार नवीन घरकुल

    News34 chandrapur

    नागपूर /चंद्रपूर : आपल्या हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. या स्वप्नाला प्रत्यक्षात साकार करण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. केंद्रीय योजनेतून दहा हजार घरांची निर्मिती करण्यात येणार असून तसा प्रस्ताव केंद्र शासनाला सादर झाला आहे. स्वतः पालकमंत्री श्री. मुनगंटीवार या प्रस्तावाचा पाठपुरावा करीत असून लवकरच प्रधानमंत्री आवास योजनेतून चंद्रपुरात 10 हजार नवीन घरकुल उभे राहतील, असा विश्वास त्यांनी नागपुरात व्यक्त केला.

     

    महात्मा फूले नविनीकरण उर्जा व पायाभूत तंत्रज्ञान लिमिटेड (महाप्रित) आणि चंद्रपूर महानगर पालिका मिळून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरबांधणी प्रस्तावासंदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील हरिसिंग वनसभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमोल शिंदे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., महाप्रितचे संचालक पुरुषोत्तम जाधव, मुख्य लेखाधिकारी डी.सी.पाटील, महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजना केंद्राचे संचालक अशोक जोशी, वैज्ञानिक संजय बालमवार तर दूरदृष्यप्रणालीद्वारे मुंबईवरून प्रधान सचिव दीपक म्हैसेकर उपस्थित होते.

     

    चंद्रपूर महानगर पालिका अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेमधून खाजगी भागीदारीद्वारे घरांची निर्मिती या घटकांतर्गत घरकुल बांधणे प्रस्तावित आहे. यासाठी म्हाडाच्या अखत्यारीत नवीन चंद्रपूर येथे मौजा कोसारा, खुटाळा येथे जागा उपलब्ध आहे. या साईटवर घरकुल बांधण्याकरीता महाप्रित आणि चंद्रपूर शहर महानगरपालिका यांच्यात 12 एप्रिल 2023 रोजी सामंजस्य करार झालेला आहे.

     

    चंद्रपूर शहरातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ देण्याच्या अनुषंगाने महाप्रीत व चंद्रपूर शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 10 हजार घरकुलांची निर्मिती करण्यात येणार आहे. चंद्रपूर शहरात जागा नसलेले भाडेकरू तथा नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सदर योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ घेता येणार आहे. याकरीता नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 2 लक्ष 50 हजार रुपयांचे अनुदान तसेच बांधकाम कामगार म्हणून 2 लक्ष रुपयांचे अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

  • चंद्रपूर मनपाच्या नियमांना तिलांजली

    चंद्रपूर मनपाच्या नियमांना तिलांजली

    News34 chandrapur

    चंद्रपूर : शहरातील बालाजी वाॅर्ड गोपालपुरी, आनंदनगरात मागील अनेक वर्षांपासून खुले असलेल्या सुमारे दोन एकर भूखंडांवर बेकायदेशीर लेआउट तयार करण्यात आला. त्यामध्ये नियमानुसार रस्ता व सार्वजनिक कामांसाठी ओपन स्पेस ठेवला नाही. त्यामुळे हा लेआउट रद्द करावा व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी मंगळवारी (दि.१२) महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल यांच्याकडे तक्रारीतून केली आहे.

     

    गोपालपुरी, आनंदनगरातील ही जागा ऐतिहासिक गोंडकालीन किल्ल्याला लागून आहे. त्यामुळे किल्ल्याच्या वैभवाला धोका निर्माण होऊ शकतो. या जागेत दरवर्षी इरई नदीच्या पुराचे पाणी शिरते. या जागेवर राऊत कुटुंबीय, तसेच इतर संबंधितांनी नुकतेच लेआउट तयार केले. १०० रुपयांच्या नोटरीवर प्लॉट विक्री सुरू केल्याने विकत घेणाऱ्या नागरिकांची फसवणूक होत आहे.

     

    या लेआउटमध्ये फक्त १८ फूट रुंद रस्त्यासाठी जागा सोडण्यात आली. नियमानुसार नाली, ओपन स्पेस आणि समाज मंदिरासाठी जागाच ठेवली नाही. बांधकामे उभी झाल्यास येणाऱ्या काळात तेथील नागरिकांची गैरसोय होणार असून, महानगरपालिकेचीही फसवणूक होणार आहे. त्यामुळे हे लेआउट रद्द करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी तक्रारीतून केली आहे.

  • विना परवानगी भिंतीपत्रके लावणाऱ्याविरुद्ध चंद्रपूर मनपाने केली पोलीसात तक्रार

    विना परवानगी भिंतीपत्रके लावणाऱ्याविरुद्ध चंद्रपूर मनपाने केली पोलीसात तक्रार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरात विना परवानगी भिंतीपत्रके लावणाऱ्या स्वराज्य वक्ता अकादमीविरुद्ध महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिका झोन क्र. २ कार्यालयाद्वारे चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

     

    शहरातील गांधी चौक,मिलन चौक जयंत टॉकीज तसेच मनपा हद्दीतील शासकीय व खाजगी जागा, शहरातील पोस्ट / टेलीफोन पेटी, इलेक्ट्रिक खांब, रस्त्याच्या कडेची झाडे इत्यादींवर प्रशिक्षण देण्यासंबंधी माहिती असलेली भिंतीपत्रके मनपाकडुन पूर्वपरवानगी न घेता लावली असल्याचे सहायक आयुक्त सचिन माकोडे यांना १२ डिसेंबर रोजी पाहणी दरम्यान आढळुन आले.

     

    संबंधितास भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून पत्रके काढण्यास सांगितले असता अद्याप पावेतो भिंतीपत्रके न काढल्याने स्वराज्य वक्ता अकादमी, प्रशिक्षक समीर लेनगुळे यांच्यावर  महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत कलम ३ नुसार फौजदारी गुन्हा नोंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे. चंद्रपूर महापालिकेच्या वतीने शासकीय निधीद्वारे शहर सुशोभीकरणाची कामे करण्यात आली आहेत,गांधी चौक हे शहराचे मुख्य ठिकाण असुन तेथे दीपस्तंभ उभारलेला आहे. त्या जागेवरच संबंधितांनी भिंतीपत्रके लावली त्यामुळे शासकीय निधीचेही नुकसान झाले.

     

    भिंतीपत्रके,पोस्टर्स,बॅनरबाजीमुळे शहराच्या विद्रुपीकरणासह शहराच्या सौंदर्यात बाधा येते किंबहुना वाहतुकीसही अडथळा निर्माण होत असल्याने याबाबत उच्च न्यायालय आणि राज्य शासनाने आखुन दिलेल्या सुचनांनुसार कारवाई करण्यात येते. त्यानुसार, परवानगीशिवाय पॅम्प्लेट्स, बॅनर्स, होर्डिंग्ज,कापडी फलक लावणा-यांवर आर्थिक दंडासह कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद या धोरणामध्ये करण्यात आली आहे.

  • चंद्रपुरातील फाउंटेन घोटाळ्यावर पालकमंत्री, विरोधीपक्ष नेते व आमदार गप्प का? – पप्पू देशमुख

    चंद्रपुरातील फाउंटेन घोटाळ्यावर पालकमंत्री, विरोधीपक्ष नेते व आमदार गप्प का? – पप्पू देशमुख

    News34 chandrapur
    चंद्रपूर : शहरातील विविध पाच चौकात फाऊंटेन बांधकाम व उभारणीच्या सव्वादोन कोटीच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप केल्यानंतर आज 13 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजताचे दरम्यान जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी गांधी चौकातील महानगरपालिका इमारतीसमोर घोटाळेबाज अधिकाऱ्यांना अटक केल्याचे प्रतिमात्मक आंदोलन करून जोरदार नारेबाजी केली. आंदोलनात सहभागी चार कार्यकर्त्यांच्या डोक्यावरून आरोपीप्रमाणे काळा कपडा टाकून त्यांचा चेहरा झाकण्यात आला. अटक केलेल्या सर्व चारही प्रतिकात्मक भ्रष्ट अधिकाऱ्यांचे हात बांधण्यात आले. सर्व प्रतीकात्मक हॉटेल अधिकाऱ्यांना मनपा इमारती च्या पायऱ्यावरून उतरवून शहर पोलीस स्टेशनच्या दिशेने नेण्यात आले.

     

    या आंदोलनात मनिषा बोबडे, शोभा यादव, अपर्णा चौधरी, पुष्पा मुळे, माला गेडेकर, किरण कांबळे, निर्मला नगराळे, स्नेहल चौथाले, माया डोईफोडे, दर्शना पाटील, राधिका माणिकपुरी,सचिन आक्केवार, अमुल रामटेके, योगेश निकोडे, राहुल दडमल, गितेश शेंडे, अमोल घोडमारे, प्रफुल बैरम, अरुण येरगुडे, वसंता जाधव, प्रवीण अत्तेरकर, सुनील ढेकले, घनश्याम येरगुडे, देवराव हटवार, इमदाद शेख, सुभाष फुलझेले, प्रफुल सतभये, नरेंद्र लभाने इत्यादी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
    फाउंटेन घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून या घोटाळ्यासाठी जबाबदार आयुक्त बिपिन पालीवाल व इतर संबंधित अधिकारी यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी जनविकास सेनेची मागणी आहे.

     

    आमदार, पालकमंत्री व विरोधी पक्ष नेते आता का बोलत नाही ?

     

    धुळीच्या प्रदूषणाने शहरातील नागरिक त्रस्त आहेत. अशातच शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत मनपाला शासनाकडून चार कोटी रुपयांच्या वर निधी प्राप्त झाला. धूळ कमी करून नागरिकांना दिलासा देण्याऐवजी मनपाच्या घोटाळेबाज अधिकाऱ्यांनी फाऊंटेन लावण्यासाठी सव्वादोन कोटी रुपयांची निविदा काढली. चौकात फाउंटेन लावून धूळ कमी करण्याचा करण्याचा जावईशोध चंद्रपूर मनपाच्या घोटाळेबाज अधिकाऱ्यांनी लावला. आज पर्यंत मनपातील करोडो रुपयांचे जवळपास पंधरा घोटाळे पुराव्यानिशी उजेडात आणले. एकाही घोटाळ्याचे विरोधात स्थानिक आमदार, पालकमंत्री किंवा विरोधी पक्ष नेते आता का बोलत नाही याबद्दल जनतेच्या मनात मोठा असंतोष असल्याची प्रतिक्रिया देशमुख यांनी यावेळी दिली.

  • चंद्रपूर मनपाच्या शाळेचे व सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम सुरू करा – आम आदमी पार्टी

    चंद्रपूर मनपाच्या शाळेचे व सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम सुरू करा – आम आदमी पार्टी

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील अनेक प्रभागांमध्ये महानगरपालिकेची शाळा आहे. त्यापैकी काही शाळा खूप दयनीय अवस्थेत असून आपल्या शेवटच्या घटका मोजत आहेत. अशा या शाळेमध्ये, शाळेचे छत कोसळून केव्हाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज आम आदमी पक्षाच्या वतीने चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त यांना तात्काळ निधी उपलब्ध करून शाळेचे तसेच सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम तात्काळ सुरू करण्याबाबत एक महिन्याचा अलटीमेटम देण्यात आला.

    अशीच शाळा इंदिरानगर प्रभागामधील आम आदमी पक्षाचे युवा शहराध्यक्ष संतोष बोपचे यांनी तर डॉक्टर आंबेडकर नगर प्रभागातील सिद्धार्थ नगर येथील शाळा आणि जूनोना चौक येथील सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम तात्काळ करणेबाबत आम आदमी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना एक वर्ष आधीच याबाबत निवेदनातून सुचवून दिल्या होत्या. परंतु त्यावरती कुठल्याही प्रकारचे कार्यवाही न झाल्यामुळे पुन्हा इशारा देण्यात आला.

     

    यावेळी आम आदी पक्षाचे वरिष्ठ नेते सुनिल मुसळे, जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार, संघटन मंत्री भिवराज सोनी, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष मधुकर साखरकर, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे, महानगर महासचिव तबससूम शेख, महानगर सह संघटन मंत्री सिकंदर सागोरे, महानगर ओबीसी आघाडी अध्यक्ष प्रशांत धानोरकर, महानगर कोषाध्यक्ष स्वप्नील घाघरगुंडे, मंगला मुके, सूनील सतभय्या, नागसेन लाभाने इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

     

    यावेळी बोलताना युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे म्हणाले की, “शहरात रहदारीच्या ठिकाणी शौचालय नसणे हे स्वच्छ भारत मिशन ला मोठा धक्का आहे. जूनोना चौक हे शहरातील एक प्रमुख चौक आहे. या चौकात हजारो लोकांची वर्दळ असते. मात्र, या चौकात कोणतेही सार्वजनिक शौचालय नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे शहरातील स्वच्छता देखील बिघडते. आम्ही महानगरपालिकेकडून तात्काळ या चौकात सार्वजनिक शौचालय बांधण्याची मागणी करतो.”

     

    यावेळी बोलताना महानगर युवा अध्यक्ष संतोष बोपचे म्हणाले की, “शहरात अनेक महानगरपालिकेची शाळा आहेत. त्यापैकी काही शाळा खूप दयनीय अवस्थेत आहेत. शाळेचे छत कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. आम्ही महानगरपालिकेकडून या शाळांचे तात्काळ नूतनीकरण करण्याची मागणी करतो.”
    आम आदमी पक्षाच्या या अलिमेटममुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आता या प्रश्नांवर तातडीने कारवाई करावी लागणार आहे, हे विशेष.

  • चंद्रपुरातील सव्वादोन कोटींच्या फाउंटेन निविदा घोटाळ्याची एसीबीकडे तक्रार

    चंद्रपुरातील सव्वादोन कोटींच्या फाउंटेन निविदा घोटाळ्याची एसीबीकडे तक्रार

    News34 chandrapur

    चंद्रपूर : प्रियदर्शनी चौक,कामगार चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, एसटी वर्कशॉपजवळील शहीद भगतसिंग चौक आणि रामाळा तलावातील फाउंटेन उभारणी व बांधकामाच्या सव्वादोन कोटींच्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याची बाब जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी उजेळात आणल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान सोमवारी त्यांनी या घोटाळ्याची तक्रार जिल्हाधिकारी, नगरविकास विभाग तसेच एसीबीकडे केली असल्याने आता या घोटाळ्यातील मोठे मासे गळाला लागणार आहेत.

     

    पाच फाउंटेन उभारणीसाठी मनपाने १७ फेब्रुवारी रोजी निविदा प्रसिद्ध केली होती. नागपूर येथील प्रशांत मद्दीवार यांच्या एजन्सीकडे फाउंटेन उभारणी व बांधकामाचे काम दिले. या एजन्सीकडे पुरेसा अनुभव नसल्याने जाणीवपूर्वक प्रशांत मद्दीवार या एजन्सीसाठी सोयीच्या अटी-शर्ती निविदेत टाकण्यात आल्या. जॉइंट व्हेंचरची तरतूद केली. निविदा प्रक्रियेत पात्र ठरण्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालय किंवा महामंडळामध्ये निविदेतील कामाच्या किमतीच्या ८० टक्के काम किंवा ५० टक्के दोन काम किंवा ४० टक्के तीन कामे पूर्ण केल्याचा अनुभव असणे आवश्यक असतानाही मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांनी नियम पायदळी तुडवले. केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशाचे सरसकट उल्लंघन केले.

     

    काम पूर्ण केल्याचे अनुभव प्रमाणपत्र नसतानाही प्रशांत मद्दीवार या कंत्राटदाराला पात्र ठरवले. चार-चार पटीने कामाची किंमत वाढवून ,अवास्तव दर टाकून तसेच पात्र असलेल्या कंत्राटदाराला टाळून मर्जीतील कंत्राटदारला काम देऊन आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप या प्रकरणात झालेला आहे. याबाबत संपूर्ण कागदपत्रासह जनविकास सेनेचे जिल्हाध्यक्ष पप्पु देशमुख यांनी जिल्हाधिकारी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव तसेच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक यांच्याकडे तक्रार केली. मनपाचे आयुक्त बिपिन पालीवाल व या घोटाळ्याशी संबंधित इतर अधिकारी यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे आता कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

     

    मनपाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना वठणीवर आणणार

     

    चंद्रपूर शहरातील नागरिक धुळीच्या प्रदूषणाने त्रस्त आहेत. या धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत निधी प्राप्त झाला.या निधीतून अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला. प्रदूषणाने त्रस्त नागरिकांना दिलासा देण्याच्या हेतूने शुद्ध हवेसाठी किंवा धूळ नियंत्रणाच्या दृष्टीने इतर आवश्यक उपाययोजना न करता केवळ मर्जीतील कंत्राटदारासाठी फवारे लावण्यात आले. चंद्रपूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संपत्तीचा शोध घेणे आम्ही सुरू केले आहे.त्यांना वठणीवर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हा जनविकास सेनेचा इशारा आहे.

  • अमृत अर्धवट योजनेचं करायचं काय?

    अमृत अर्धवट योजनेचं करायचं काय?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरातील डॉ. अंबेडकर, इंदिरानगर, भानापेठ, जलनगर, अपेक्षा नगर या प्रभागात अमृत योजनेचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या प्रभागातील नागरिकांना पाण्यासाठी महागडे टँकर आणावे लागत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने महानगरपालिकेला तीन महिन्यात योजनेचे काम पूर्ण करण्याचा अल्टीमेटम दिला आहे. अन्यथा प्रभागातील नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे.

     

    आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या नेतृत्वाखाली आज महानगरपालिकेत निवेदन देण्यात आले. यावेळी युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे, महानगर महासचिव तबससूम शेख, महानगर सह संघटन मंत्री सिकंदर सागोरे, महानगर ओबीसी आघाडी अध्यक्ष प्रशांत धानोरकर, महानगर कोषाध्यक्ष स्वप्नील घाघरगुंडे, मंगला मुके, बबन काळे, योगेश्वर काळे, श्याम रहांगडाले, विजू आत्राम, चंद्रसेन पटले, विवेक दापेवार, लीला शेंडे, नागसेन लाभाने इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

     

    निवेदनात म्हटले आहे की, अमृत योजनेचे काम 2023 च्या ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

     

    निवेदनात मागणी करण्यात आली आहे की, तीन महिन्यात योजनेचे काम पूर्ण करण्यात यावे. ज्या ठिकाणी पाईप लाईन दिलेली आहे अशा सर्व ठिकाणी तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करावा. अन्यथा प्रभागातील नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल.

  • चंद्रपूर महानगरपालिकेत ‘फाऊंटेन घोटाळा’

    चंद्रपूर महानगरपालिकेत ‘फाऊंटेन घोटाळा’

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर शहराच्या जटपूरा प्रभागातील प्रियदर्शनी चौक, हिंदुस्तान लालपेट प्रभागातील कामगार चौक, तुकुम प्रभागातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, शास्त्रीनगर प्रभागातील एसटी वर्कशॉप जवळील शहीद भगतसिंग चौक,भानापेठ प्रभागातील रामाळा तलाव या ठिकाणी फाउंटेन उभारणी व बांधकामाच्या कामा करिता 17 फेब्रुवारी 2023 रोजी चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे एक निविदा प्रसिद्ध करण्यात आली. एकूण जवळपास सव्वादोन कोटी रुपये अंदाजपत्रकीय किंमत असलेल्या या निविदा प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी दिनांक 6 डिसेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला. मर्जीतल्या कंत्राटदाराला काम देण्यासाठी आयुक्त बिपिन पालीवाल यांनी या निविदा प्रक्रियेत अनेक नियम पायदळी तुडवले, अंदाजपत्रकामध्ये चार-चार पटीने कामाची किंमत वाढवून अवास्तव दर टाकले तसेच निविदा प्रक्रियेत अपात्र ठरणाऱ्या मर्जीतील कंत्राटदाराला पात्र केले व पात्र असलेल्या इतर कंत्राटदारांना हेतू पुरस्कार अपात्र ठरविल्याचा आरोप माजी नगरसेवक देशमुख यांनी केलेला आहे. या संपूर्ण घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून आयुक्त बिपिन पालीवाल यांचे विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी जनविकास सेनने केली. याबाबत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा जनविकास सेनेने दिलेला आहे.

     

    असा झाला घोटाळा…

     

    नागपूर येथील प्रशांत मद्दीवार यांच्या एजन्सीला फाउंटेन उभारणी व बांधकामाचे काम देण्यासाठी नियमांना बगल देण्यात आल्याचा आरोप देशमुख यांनी केलेला आहे.
    प्रशांत मद्दीवार या एजन्सीकडे पुरेसा अनुभव नसल्यामुळे निविदा प्रक्रियेत जाणीवपूर्वक ‘जॉईंट व्हेंचर’ ची तरतूद करण्यात आली.
    प्रशांत मद्दीवार या एजन्सीने दिल्ली येथील ‘एक्वारियस टेक्नॉलॉजी’ या एजन्सी सोबत जॉईन वेंचर चे पत्र सादर केले.

    मात्र याच निविदा प्रक्रियेत ‘एक्वारस टेक्नॉलॉजी’ या एजन्सीने एम एस भांडारकर व अंकुश गोडबोले यांच्या एजन्सी सोबत सुद्धा जॉईन्ट वेंचरचे पत्र दिले. एका निविदा प्रक्रियेमध्ये एखाद्या एजन्सीला एकाच कंत्राटदारासोबत जॉईंट वेंचर करता येते. त्यामुळे एक्वारस टेक्नॉलॉजी सोबत जॉईन वेंचर करणाऱ्या तीनही एजन्सीला अपात्र ठरविणे गरजेचे होते. परंतु तसे करण्यात आले नाही.

     

    निविदा प्रक्रियेत पात्र ठरण्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालय किंवा महामंडळामध्ये निविदेतील कामाच्या किमतीच्या 80% चे एक काम किंवा 50% चे दोन काम किंवा 40% ची तीन कामे पूर्ण केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. प्रशांत मद्दीवार या एजन्सीने काम पूर्ण केल्याचे पत्र सादर केले नाही. केवळ चार लक्ष रुपयांचे कार्यादेश जोडले. निविदा प्रक्रियेत कार्यादेश ग्राह्य धरण्यात येत नाही. काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देणे आवश्यक असते. प्रशांत मद्दीवार या एजन्सीकडे पुरेशा किमतीचे काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र नसतानाही या एजन्सीला पात्र ठरवून प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी वेळ देण्यात आला.

     

    या निविदा प्रक्रियेतील चार कामे प्रशांत मद्दीवार या एजन्सीला अंदाजपत्रकीय किमतीपेक्षा केवळ 0. 91 टक्के कमी दराने मंजूर करण्यात आले. प्रियदर्शनी चौक ,कामगार चौक व एसटी वर्कशॉप येथिल कामांची काही देयके सुद्धा अदा केली आहे. आयुक्त बिपिन पालीवाल यांनी अशा प्रकारे कंत्राटदाराशी संगनमत करून शासकीय निधीची अफरातफर केल्याने त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी देशमुख यांनी केलेली आहे.

     

    कामाच्या प्रत्यक्ष किमतीपेक्षा अंदाजपत्रकात लाखो रुपयांची वाढ

     

    निविदा प्रक्रिया प्रसिद्ध करताना शेड्युल बी या प्रपत्रा मध्ये कामाचे सविस्तर दर दर्शवून त्याची बेरीज केली जाते. ही बेरीज म्हणजेच या कामाची एकूण अंदाजपत्रकीय किंमत असते.
    अंदाजपत्रकीय किंमत ‘बिल ऑफ कोटेशन’ म्हणजेच बीओक्यू या प्रपत्रा मध्ये दर्शविण्यात येते. कंत्राटदार मध्ये दर टाकून निविदा प्रक्रियेत भाग घेतात.
    शेड्युल बी मध्ये कामाची एकूण किंमत व बीयुकीमध्ये टाकलेली किंमत एकच असणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र या निविदा प्रक्रियेत शेड्युल बी पेक्षा लाखो रुपयांनी अधिक किंमत बीओक्यू मध्ये टाकण्यात आली. अंदाजपत्रकामध्ये अशा प्रकारे लाखो रुपये वाढवून कंत्राटदाराला लाभ पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला.

     

    पात्र ठरणाऱ्या चांगल्या कंपन्यांना अपात्र केले

     

    या निविदा प्रक्रियेत भाग घेणारी अहमदाबाद येथील क्लासिक फाऊंटेन व लखनऊ येथील त्रिवी फाउंटेन या एमएसएमई या वर्गात मोडणाऱ्या कंपन्या आहेत. अशा कंपन्यांना प्राधान्य देण्याचे सरकारचे धोरण आहे. या कंपन्यांना अनामत रक्कम मधून सूट सुद्धा देण्यात येते. या दोन्ही एजन्सीज कडे करोडो रुपयांची कामे करण्याचा अनुभव आहे. तसेच या दोन्ही एजन्सी स्वतः फाउंटेन तयार करणाऱ्या कंपन्या आहेत. मात्र या दोन्ही एजन्सीला निविदा प्रक्रियेत अपात्र ठरविण्यात आले.शरद काळे या नागपूरच्या एजन्सीला सुद्धा अशाच प्रकारे अपात्र केले. अपात्र ठरवताना कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार या एजन्सीज सोबत केला नाही. एकतर्फी कारवाई करण्यात आली. आपल्या मर्जीतील प्रशांत मद्दीवार व स्वयंभू या एजन्सीला लाभ पोहोचवण्यासाठी आयुक्त बिपिन पालीवाल यांनी सर्व नियम पायदळी तुडवले.

  • चंद्रपूर मनपात भारतीय संविधान दिन साजरा

    चंद्रपूर मनपात भारतीय संविधान दिन साजरा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिकेत २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला,याप्रसंगी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर व डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले तसेच संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.

     

    २६ नोव्हेंबर १९४९ मध्ये भारतीय संविधान सभेने भारताची राज्यघटना स्विकारली. त्यामुळे, २६ नोव्हेंबर हा दिवस ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. परंतु, संविधान सभेने ही राज्यघटना स्विकारल्यानंतर देशात त्याची अमंलबजावणी होण्यास काही महिने लागले. २६ जानेवारी १९५० रोजी ही राज्यघटना पूर्णपणे लागू करण्यात आली.

     

    राज्यघटना हि १९५० रोजी लागू झाली असली तरी आजही संविधान लागू करण्याचे उद्देश काय याची अनेकांना माहिती नाही त्यामुळे जनजागृती करण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्याचे शासनाचे निर्देश आहेत त्यानुसार संविधान दिन साजरा करण्यात आला.

     

    याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,उपायुक्त अशोक गराटे,उपायुक्त मंगेश खवले, उपअभियंता विजय बोरीकर,सहायक आयुक्त नरेंद्र बोबाटे,सचिन माकोडे, विधी अधिकारी अनिलकुमार घुले,अनिल बाकरवाले, डॉ.अमोल शेळके,संतोष गर्गेलवार,प्रगती भुरे, सारिका शिरभाते,वैष्णवी रिठे,सारंग निर्मळे,विजय भुरकुंडे, विकास दानव, प्रदीप पाटील,नरेंद्र जनबंधू, गुरुदास नवले तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.