Tag: चंद्रपूर महानगरपालिका

  • चंद्रपूर मनपाची प्रोत्साहन योजना

    चंद्रपूर मनपाची प्रोत्साहन योजना

    News34 chandrapur

    चंद्रपूर – नियमित मालमत्ता कर भरणा करणाऱ्यांकरीता प्रोत्साहन म्हणुन ३१ डिसेंबरपर्यंत मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी ५ टक्के सूट तसेच ऑनलाईन पद्धतीने कराचा एकमुस्त भरणा करणाऱ्यांना पुढील वर्षी विशेष सवलत देण्याचे मनपातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

     

    मालमत्ता कर हे मनपाच्या उत्पन्नाच्या प्रमुख स्रोतांपैकी एक आहे. शहरासाठी नियमित सोयी सुविधा पुरविण्यास मालमत्ता कराची अधिकाधिक वसुली होणे गरजेचे आहे. महापालिका क्षेत्रात जवळपास ८० हजार मालमत्ता असून, संपूर्ण मालमत्तांच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे मागणी नोंदवली जाते. करदात्यांना कराची नोटीस पाठवून कर भरणा करण्यासाठी विनंती करणे ही कर विभागाची पहिली प्रक्रिया मानली जाते. जास्तीत जास्त वसुली होऊन ती शहराच्या विकास कामांसाठी उपयोगी यावी या अनुषंगाने करवसुलीस प्राधान्य दिले जाते.

     

    करभरणा हा प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन अथवा https://chandrapurmc.org या लिंकवर मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करता येणे शक्य आहे.  ऑनलाइन युपीआय ॲप अर्थात फोन पे, गुगल पे,भीम ॲप ( भारत इंटरफेस फॉर मनी ) यांचाही पर्याय मनपाने उपलब्ध करून दिलेला आहे.तसेच  व्हॉट्सॲप चॅटबॉटचा वापर करून सुद्धा मालमत्ता कर भरता येणार असुन याकरिता 8530006063 या क्रमांकावर वर “hi” टाईप करून आलेल्या उत्तरात ४ था क्रमांकाचा पर्याय निवडुन कर भरता येईल.

     

    मालमत्ता करात देण्यात येत असलेली सुट ही औद्योगीक मालमत्तेस लागु राहणार नाही.एकुण मालमत्ता करात सदर सुट देण्यात येत असल्याने मालमत्ता कर त्वरित भरण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • चंद्रपुरात अनधिकृत लेआऊट टाकत प्लॉटची विक्री

    चंद्रपुरात अनधिकृत लेआऊट टाकत प्लॉटची विक्री

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने अनधिकृत ले आऊट वरील बांधकामावर कारवाई करण्यात आली असुन अनधिकृत रीतीने उभे करण्यात आलेले मार्कींगचे सिमेंट खांब तोडण्याची कारवाई मनपामार्फत करण्यात आली आहे.

     

    ठक्कर कॉलनी येथे ईरई नदी पात्राजवळ मौजा गोविंदपुर रीठ सर्वे नंबर ७३/१ तसेच जवळच असलेल्या नाल्याजवळील पुलाच्या बाजुला चांदा रयतवारी सर्वे नंबर ४९ असलेल्या भूखंडावर अनधिकृत ले आउट टाकुन प्लॉट विक्रीचा व्यवसाय सुरू केला असल्याची माहिती मनपा पथकास मिळाली होती. त्यानुसार पाहणी केली असता सदर भूखंड हा पूरग्रस्त भागात असल्याने यावर कुठल्याही स्वरूपाची खरेदी विक्री करता येत नाही. यासंबंधी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमाच्या कलम ५२ अन्वये अनधिकृत बांधकाम करणाऱ्यास नोटीस देण्यात आली होती. मात्र नोटीस स्वीकारण्यास सदर बांधकामदाराने नकार दर्शविला होता त्यामुळे सदर कारवाई करण्यात आलेली आहे. सदर ले आऊटवर प्लॉटची विक्री करण्यास मार्कींग सुद्धा करण्यात आली होती.

     

    चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की  केवळ नोटरीच्या आधारे कुठल्याही स्वरूपाची खरेदी विक्रीची कारवाई करू नये भविष्यात यासंबंधी कुठल्याही संशय उद्भवल्यास याची जबाबदारी पुर्णपणे  विक्री करून देणार व विक्री करून घेणार यांची राहील. दुय्यम निबंधक कार्यालयातून नोंदणी होत असलेल्या भूखंडाचीच खरेदी अथवा विक्री करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

     

    सदर कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त सचिन माकोडे,सहायक नगररचनाकार सारिका शिरभाते, अतिक्रमण निर्मूलन अधिकारी संतोष गर्गेलवार तसेच अतिक्रमण पथकाद्वारे करण्यात आली. शहरात जिथेही अनधिकृत ले आऊट आहेत तिथे कारवाई सुरु राहणार असल्याने अनधिकृत ले आऊट वर कुठल्याही स्वरूपाचे बांधकाम आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. तसेच नागरिकांना शहरातील अनधिकृत ले आउट संबंधी माहिती असल्यास ती मनपास देण्याचे आवाहन मनपामार्फत करण्यात येत आहे.

  • चंद्रपुर शहरात अतिक्रमणाविरोधात आरटीओ,पोलीस प्रशासन व मनपाची धडक कारवाई

    चंद्रपुर शहरात अतिक्रमणाविरोधात आरटीओ,पोलीस प्रशासन व मनपाची धडक कारवाई

    News34 chandrapur

    चंद्रपूर  – शहरात रस्त्यावर अतिक्रमण करून वाहने विक्री करणाऱ्यांवर प्रादेशिक परिवहन कार्यालय,पोलीस प्रशासन,वाहतूक पोलीस व चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे संयुक्त कारवाई करण्यात आली असुन नागपूर रोडवर जुनी वाहने विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांची ७ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

     

    शहरातून नागपुरकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावर अतिक्रमण, जुनी चार चाकी दुचाकी वाहने विक्री करण्याची दुकाने अवैधरित्या थाटण्यात येतात. दुकानासमोर पार्किंग करणाऱ्या नागरिकांची वाहने थोड्या वेळापुरती वाहने दुकानासमोर उभी राहतात मात्र विक्री करणाऱ्यांची वाहने पुर्ण वेळ रस्त्यावर उभी राहतात यामुळे या अतिक्रमणांचा वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होत असल्याचे लक्षात घेऊन ८ ते १० चारचाकी वाहनांवर दंड तर पल्सर,पॅशन – प्रो,अ‍ॅक्टिव्हा अश्या ७ दुचाकी जप्त करण्याची कारवाई आरटीओ मार्फत करण्यात आली असुन जोपर्यंत दंडाचा भरणा होणार नाही तोपर्यंत या वाहनांची विक्री होऊ शकणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

     

    त्याचप्रमाणे फुटपाथवर छोटी हातगाडी,मोठे ठेले उभे करून खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांना २४ तासांच्या आत त्यांचे अतिक्रमण हटविण्याच्या सुचना देण्यात आल्या असुन न हटविल्यास छोटे – मोठे ठेले व त्यांचे साहीत्य जप्त करण्यात येणार आहे. हे विक्रेते येणाऱ्या ग्राहकांना बसण्यास रस्त्यावर खुर्च्या ठेवतात त्यामुळे वाहतुकीस उपलब्ध रस्त्याचे प्रमाण आपसुकच कमी होते त्यामुळे पुढील २४ तासानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

     

    नागपुर रोडवरील जे जुनी चार चाकी व दुचाकी विक्री करणारे स्थायी दुकानदार आहेत त्यांनी आपल्या दुकानासमोर कोणतेही वाहन विक्रीकरिता लावु देऊ नये,वाहन विक्री करावयाची असल्यास विक्रीकरिता स्वतः जागा उपलब्ध करून घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. सदर कारवाई सहायक आयुक्त सचिन माकोडे,वाहतुक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अतिक्रमण निर्मुलन अधिकारी संतोष गर्गेलवार तसेच मनीष शुक्ला,अनिल खोटे, भरत बिरिया, बंडू चहरे, विक्रम महातव,डोमा विजयकर,अमरदीप साखरकर यांनी केली.

     

    चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे, चंद्रपूर शहर व महामार्गावरील होत असलेले अतिक्रमणामुळे शहरात अपघाताच्या घटनेत वाढ होत असून त्यावर ठोस पाऊले उचलण्याची गरज प्रशासनाला आहे, कारवाई करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा सहारे यांनी प्रशासनाला दिला होता, युवासेनेच्या इशाऱ्यानंतर प्रशासन कामाला लागले मात्र ही अतिक्रमण हटाव मोहीम किती दिवस चालणार यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे?

     

  • चंद्रपुरातील अतिक्रमण अपघाताला जबाबदार

    चंद्रपुरातील अतिक्रमण अपघाताला जबाबदार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मागील 2 महिन्यापासून चंद्रपूर शहरात होणारे अपघात चिंतेचा विषय बनला आहे, या कालावधीत तब्बल 12 जणांनी आपला जीव गमावला, या अपघातांची असंख्य कारणे आहे, मात्र शहरातील वेगात वाढणारे अतिक्रमण सुद्धा या अपघाताला तितकेच जबाबदार आहे.

     

     

    यावर चंद्रपूर जिल्हा युवासेनेने गंभीर दखल घेत 8 दिवसांच्या आत प्रियदर्शिनी चौक ते ट्रायस्टार हॉटेल चौक पर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा वेढा काढण्यात यावा अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी चंद्रपूर मनपा आयुक्त, वाहतूक नियंत्रक शाखा व जिल्हाधिकारी यांना निवेदनामार्फत केली आहे.

     

     

    प्रियदर्शिनी चौक ते हॉटेल ट्रायस्टार चौक मधील रस्त्यावर दुचाकी शोरूम धारकांचे रस्त्यावर वाढत असलेले अतिक्रमण व सोबत वरोरा नाका चौकातील फास्टफूड सेंटर व जिम समोर पार्किंग नसल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिक वाहने उभे करीत अपघाताला आमंत्रण देत आहे.

     

     

    प्रशासनाने 8 दिवसाच्या आत सदर अतिक्रमण काढावे अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करून प्रशासनाची झोप उडविल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी दिला आहे.

    यावेळेस युवासेना उपजिल्हाधिकारी रिजवान पठाण शहर अधिकारी,शहाबाज शेख शिवा वजारकर,पराग कूत्तरमारे सुरज रॉय यावेळी यांची उपस्थिती होती

  • चंद्रपूर शहरातील दुचाकी अपघातात 8 वा मृत्यू

    चंद्रपूर शहरातील दुचाकी अपघातात 8 वा मृत्यू

    News34 chandrapur

    चंद्रपूर – ऑक्टोबर पासून सुरू झालेले रस्ते अपघात कमी होण्याचे नाव घेत नसून 16 नोव्हेम्बरला वरोरा नाका चौकात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला.

    जटपुरा प्रभागातील नगीनाबाग येथे राहणारा 27 वर्षीय सोहेल शेख या युवकाचा रस्ते अपघातात नाहक बळी गेला.

     

    गुरुवारी रात्री 10 ते साडेदहा वाजताच्या सुमारास सोहेल हा आपल्या मित्रांसोबत दुचाकी वाहन क्रमांक Mh34 BJ5111 ने घराकडे जात होता, वरोरा नाका चौकापूर्वी असलेले जिम व फास्ट फूड सेंटर समोर ट्रक ला ओव्हरटेक करतेवेळी सोहेल यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो ट्रक क्रमांक RJ 11 GB 0726 ला धडकला, यामध्ये सोहेल चा मृत्यू झाला, अपघात झाल्यावर अनेकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली मात्र पोलीस 45 मिनिटे उशिरा पोहचली, यावेळी महिला डॉक्टरने सोहेल ला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तो वाचू शकला नाही.

     

    चंद्रपूर शहरात मागील महिन्यापासून सुरू झालेल्या अपघाताच्या मालिकेतील 8 वा बळी होता, या अपघाताला कारणीभूत कोण आहे? यावर उपाययोजना कधी होणार? नागरिकांचे नाहक बळी अजून किती दिवस? प्रशासनाने अपघाताची गंभीर दखल घेत यावर ठोस नियंत्रण करण्याची गरज आहे.

  • चंद्रपूर मनपाची हद्दवाढ, ही गावे होणार समाविष्ट

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दवाढीच्या प्रस्तावावर भूमिपुत्र युवा संघटनेने आक्षेप घेतला आहे. या प्रस्तावात चंद्रपूर शहराभोवतीच्या 13 किलोमीटर अंतरातील सर्व गावांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे आम्ही या प्रस्तावावर आक्षेप घेतो, असे संघटनेचे संयोजक दिनेश दादापाटील चोखारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

    चंद्रपूर महानगरपालिकेची स्थापना 2011 मध्ये झाली. त्यावेळी पूर्वीच्या नगरपालिका हद्दीतील लोकसंख्या आणि वस्ती समाविष्ट करण्यात आली होती. आता स्थापनेच्या 12 वर्षांनी महापालिकेची हद्द वाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावात मोरवा, ताडाली, साखरवाही, येरुर, पडोली, आदी गावांचा समावेश करण्यात येणार आहे. मात्र, मनपा क्षेत्रातील आजूबाजूच्या 13 किलोमीटर अंतर्गत असलेल्या सर्व गावांचा आणि मोठ्या गावांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे या प्रस्तावावर आक्षेप घेण्यात येत आहे.

    पूर्वीपासून समाविष्ट असलेल्या प्रभागाचा सर्व परीने विकास करावा. आताच मनपा क्षेत्रात पाण्याची समस्या जटील आहे. रस्ते बरोबर नाही. मग हद्द वाढवून काय होईल. सध्या पूर्वीपासून समाविष्ट भागातच विकास होऊ द्या. नागरिकांना सर्व सेवा सुविधांचा लाभ मिळू द्या, असे चोखारे यांनी म्हटले आहे.

    चंद्रपूर शहराचा विकास हा सर्वांगीण असावा, यासाठी मनपा क्षेत्रातील आजूबाजूच्या 13 किलोमीटर अंतर्गत असलेल्या सर्व गावांचा समावेश करण्यात यावा. यामुळे शहराचा विकास होईल आणि शहरातील रहिवाशांना अनेक सुविधा उपलब्ध होतील. जवळच्या इतर गावांचा समावेश न करता मोरवा, ताडाली, साखरवाही, येरुर, पडोली, आदी गावांचा समावेश करून ही हद्द वाढ करणे म्हणजे जाणीवपूर्वक दुजाभाव करण्यासारखे आहे. त्यामुळे मनपापासून जवळपास असलेली सर्व गावे यात समाविष्ट करण्यात यावे, अन्यथा समावेश करू नये, अशी विनंती चोखारे यांनी केली आहे.

  • चंद्रपुरातील नागरिकांना महानगरपालिकेने केले महत्वाचे आवाहन

    News34 chandrapur

    चंद्रपूर  –  चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने अनधिकृत ले आऊट वरील बांधकामावर कारवाई करण्यात आली असुन अनधिकृत रीतीने उभे करण्यात आलेले मार्कींगचे सिमेंट खांब तोडण्याची कारवाई मनपामार्फत करण्यात आली आहे.

     

    ठक्कर कॉलनी येथे ईरई नदी पात्राजवळ मौजा गोविंदपुर रीठ सर्वे नंबर ७३/१ असलेल्या भूखंडावर अनधिकृत ले आउट टाकुन प्लॉट विक्रीचा व्यवसाय सुरू केला असल्याची माहीती मनपा पथकास मिळाली होती. त्यानुसार पाहणी केली असता सदर भूखंड हा पूरग्रस्त भागात असल्याने यावर कुठल्याही स्वरूपाची खरेदी विक्री करता येत नाही. यासंबंधी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमाच्या कलम ५२अन्वये अनधिकृत बांधकाम करणाऱ्यास नोटीस देण्यात आली होती. मात्र नोटीस स्वीकारण्यास सदर बांधकामदाराने नकार दर्शविला होता त्यामुळे सदर कारवाई करण्यात आलेली आहे. सदर ले आऊटवर प्लॉटची विक्री करण्यास मार्कींग सुद्धा करण्यात आली होती.

     

    चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की  केवळ नोटरीच्या आधारे कुठल्याही स्वरूपाची खरेदी विक्रीची कारवाई करू नये भविष्यात यासंबंधी कुठल्याही संशय उद्भवल्यास याची जबाबदारी पुर्णपणे  विक्री करून देणार व विक्री करून घेणार यांची राहील. दुय्यम निबंधक कार्यालयातून नोंदणी होत असलेल्या भूखंडाचीच खरेदी अथवा विक्री करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

    सदर कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त सचिन माकोडे,सहायक नगररचनाकार सारिका शिरभाते, अतिक्रमण निर्मूलन अधिकारी संतोष गर्गेलवार तसेच अतिक्रमण पथकाद्वारे करण्यात आली. शहरात जिथेही अनधिकृत ले आऊट आहेत तिथे कारवाई सुरु राहणार असल्याने अनधिकृत ले आऊट वर कुठल्याही स्वरूपाचे बांधकाम आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. तसेच नागरिकांना शहरातील अनधिकृत ले आउट संबंधी माहिती असल्यास ती मनपास देण्याचे आवाहन मनपामार्फत करण्यात येत आहे.

  • चंद्रपुरातील महिलांनी तयार केले दिवाळीचे फराळ

    News34 chandrapur

    चंद्रपूर  – चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे दिनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत दि.३ ते ७ नोव्हेंबर दरम्यान महिला बचत गटांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांची विक्री व प्रदर्शनी ज्युबली शाळेजवळ असलेल्या कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित केली जाणार आहे.

    सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत सुरु असणाऱ्या या विक्री व प्रदर्शनीत नागरिकांना स्वस्त दरात मुबलक खाद्य पदार्थ व वस्तु घेता येणार आहे. यात दिवाळी सणानिमित्त महिला बचत गटांनी तयार केलेले चकली, चिवडा, लोणचे, फराळी वस्तूंचा आस्वाद घेता येणार आहे तसेच कापडी बॅग, दिवे, मातीच्या वस्तु अश्या अनेक वस्तुही विक्रीस राहणार आहेत. सदर विक्री व प्रदर्शनी ३ ते ७ नोव्हेंबर पर्यंत असल्याने नागरिकांना भेट देण्यास ५ दिवस मिळणार आहे. तसेच सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत सुरु असल्याने सर्व वयोगटाच्या व्यक्तींना भेट देता येणार आहे.

    शहरातील नागरिकांनी महिला स्वयंसाह्य बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुंची खरेदी करून बचत गटातील महिलांना व्यवसाय करण्याकरिता हातभार लावावा तसेच बचतगटांनी तयार केलेल्या चविष्ट व्यंजनांचा आस्वाद घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • चंद्रपूर मनपाच्या चांदा सिटी हेल्पलाईन वर तक्रारीचा डोंगर

    News34 chandrapur

    चंद्रपूर   – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मागील वर्षी करण्यात आलेल्या चांदा सिटी हेल्पलाईन ॲप तक्रार निवारण कार्यप्रणालीस उत्तम प्रतिसाद मिळाला असुन सदर ॲपवर आतापर्यंत विविध विषयांच्या ४१७२ तक्रारी प्राप्त झाल्या असुन यापैकी ४१५० तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.

     

    चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी पालिकेची सुत्रे हाती घेतल्यापासुन मनपाद्वारे देण्यात येणाऱ्या सेवा लोकभिमुख होण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. यापुर्वी नागरीकांच्या तक्रारी या पत्र स्वरूपात किंवा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातुन प्रशासनास प्राप्त व्हायच्या व त्याचे निराकरण व्हावयास ही वेळ लागायचा. मात्र प्रशासनाचे कामकाज गतिमान व्हावे या दृष्टीने आयुक्तांच्या संकल्पनेतुन २५ ऑक्टोबर रोजी चांदा सिटी हेल्पलाईन ॲपची सुरवात करण्यात आली होती.

     

    या कार्यप्रणालीनुसार इंटरनेटच्या गुगल प्ले स्टोअरमधून चांदा सिटी हेल्पलाईन हे ॲप डाउनलोड केल्यानंतर किंवा टोल फ्री क्रमांक १८००-१२३-७९८० येथे संपर्क करून व ८५३०००६०६३ या व्हॉट्स ॲप क्रमांकावर तक्रार करता येते. तक्रारीत संबंधित परिसर, विभाग, तक्रार पाठवणाऱ्याचे नाव, मोबाइल नंबर, पत्ता, तक्रारीचे स्वरूप लिहून पाठवावे लागते. याच तक्रारीत गरज भासल्यास संबंधित तक्रारीचा फोटोही अपलोड करता येतो. चांदा सिटी हेल्पलाईन ॲपचे नाव व संपर्क क्रमांकांची प्रसिद्धी एसएमएस,फोन कॉल, ऑटो मायकिंग, सोशल मीडिया व इतर प्रसिद्धीमाध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात करून ज्यास्तीत ज्यास्त नागरीकांपर्यंत हे क्रमांक पोचविण्यात आले आहे.
    या ॲपवर स्वच्छता,समाज कल्याण -दिव्यांग,महिला व बालकल्याण,रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, NULM, विद्युत व दिवाबत्ती, रेन वॉटर हार्वेस्टिंग, मोकाट जनावरे, बांधकाम,नगर रचना बिल्डींग परवाना, पाणी पुरवठा, कर, उद्यान, अवैध बांधकाम, अमृत योजना, अवैध होर्डिंग, अतिक्रमण, अग्निशमन व इतर नागरी सुविधांच्या दृष्टीने नागरीकांना तक्रार करता येते.तक्रार प्राप्त झाल्यानंतर ४८ तासांच्या आता निराकरण करण्याची जबाबदारी संबंधित विभागीय अधिकारी व संबंधित विभागप्रमुख यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

     

    अधिकारी स्तरावर तक्रार निश्चित दिवसात मार्गी लागली नाही तर हीच तक्रार पुढे टप्प्याटप्प्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वर्ग होते. तक्रारींचे निराकरण कितपत झाले किंवा पेंडंसी आहे का ? याचा आढावा आयुक्तांद्वारे नियमित घेतला जात असल्याने संबंधित तक्रारी त्वरेने निकाली काढल्या जात आहेत.मनपाद्वारे देण्यात येणाऱ्या नागरी सुविधांबाबत कुठलीही तक्रार असल्यास चांदा सिटी हेल्पलाईन ॲपचा वापर करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • चंद्रपुरातील सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलां-मुलींना शिक्षणासाठी 5 टक्के आरक्षण व शिष्यवृत्ती मिळणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर: स्वच्छता हीच सेवा असून सफाई कर्मचारी स्वच्छतेचे काम करून देशाची मोठी सेवा करीत आहेत. शहर स्वच्छ ठेवण्यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांची भूमिका ही सर्वात महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. पी.पी.वावा यांनी दिले.

     

    नियोजन भवन येथे जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध विषयांवर आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, वनअकादमीच्या अपर संचालक मनीषा भिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, नगर प्रशासन अधिकारी अजितकुमार डोके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक भास्कर सोनारकर यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

     

    डॉ. पी.पी.वावा म्हणाले, सर्वप्रथम येथील सफाई कर्मचाऱ्यांच्या असलेल्या समस्यांचे निराकरण प्राधान्याने करावे. स्थायी अथवा  कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना ओळखपत्र उपलब्ध करून द्यावे. त्यांचा ब्लड ग्रुप, इन्शुरन्स सुविधा, पीएफसह मासिक वेतन प्रमाणपत्र द्यावे. या कर्मचाऱ्यांना उत्तम आरोग्य सुविधा पुरवाव्यात तसेच आरोग्य तपासणीचे कॅम्प आयोजित करावे. आयुष्मान भारत योजनेचा लाभ द्यावा. कर्मचाऱ्यांचे किमान वेतन, कोर्ट व प्रलंबित प्रकरणांमध्ये त्वरित कार्यवाही करावी. येथील सफाई कर्मचाऱ्यांना वास्तव्यास राहण्यासाठी अजूनही पक्के घर नाही. त्यासाठी आवश्यकतेनुसार प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे उपलब्ध करून द्यावी.

     

    ते पुढे म्हणाले, येथील सफाई कर्मचाऱ्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हा त्यांचा परंपरागत व्यवसाय असल्याने त्यांना जात प्रमाणपत्र  देण्याचे नियोजन करावे. रोजगार व स्वयंरोजगारासाठी बँकेमार्फत कर्ज सुविधा उपलब्ध करून द्यावी. सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलां-मुलींना शिक्षणासाठी 5 टक्के आरक्षण तसेच शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येईल. तसेच  शासनाच्या विविध विभागाच्या वतीने सफाई कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगाराच्या व प्रशिक्षणाच्या योजनांचा लाभ मिळवून देत त्यांना मुख्य प्रवाहात आणावे, असेही ते म्हणाले.

     

    यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांना लागणारी कागदपत्रे, त्याच्या घरांचा प्रश्न देखील सोडविण्यात येईल, असे डाॅ. वावा यांना आश्वासित केले. यावेळी सफाई कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या समस्या सदस्यांसमोर मांडल्या. या समस्यांचे निराकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.