Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त तालुका कांग्रेस तर्फे विनम्र अभिवादन

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त तालुका कांग्रेस तर्फे विनम्र अभिवादन

    News34 chandrapur

    मुल – भारतिय राज्य घटनेचे शिल्पकार युगपुरुष महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिना निमित्त दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोज मंगळवार सकाळी १०-०० वाजता काॅंग्रेस भवन मूल येथे, काॅंग्रेसचे जेष्ठ नेते आदरणीय .संतोषसिंह रावत (अध्यक्ष,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह.बॅंक) व माजी जी.प.अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  याप्रसंगी उपस्थित सर्व कांग्रेस पदाधिकारी यांनी बाबासाहेबांच्या फोटोला पुष्प माला व पुष्प वाहून विनम्र अभिवादन केले.

     

    याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नवार, माजी सभापती संचालक घनश्याम येनुरकर, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, संचालक किशोर घडसे, सरपंच तथा संचालक अखिल गांगरेडिवार, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन नीलमवार, व्यंकटेश पुल्लकवार, माजी नगरसेविका ललिता फुलझेले, महिला तालुका अध्यक्षा रुपाली संतोषवार, शहर अध्यक्ष नलिनी आडपवार, कांग्रेस सरचिटणीस संदीप मोहबे, सुरेश फुलझेले, महिला सरचिटणीस शामलता बेलसरे, कोषाध्यक्ष राधिका बुक्कावार, सदस्य समता बनसोड, फर्जना शेख, यांचेसह ओबीसी सेलचे राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी, ज्येष्ठ कांग्रेस पदाधिकारी बंडूभाऊ गुरनुले, अन्वर शेख, विष्णू सादमवार, प्रशांत उराडे,राजू कानमपल्लीवार, ग्रामीण,शहरी,युवक व महिला तसेच ओबीसी सेल किसानसेल, व सर्व सेलच्या पदाधीकारी उपस्थित होते.

  • चंद्रपूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्याघ्र सफारी प्रकल्प करणार

    चंद्रपूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्याघ्र सफारी प्रकल्प करणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – विदर्भ ही वाघांची भूमी आहे; जैवविविधतेने संपन्न असलेल्या या भूमीत देश विदेशातील पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने येतात; याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथे जागतिक दर्जाची व्याघ्र सफारी प्रकल्प करण्याचा संकल्प असून यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागारांची मदत देखील घेता येईल; यामुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि परिसरात रोजगार निर्मिती व अर्थकारण मजबूत होण्यास निश्चित मदत होईल यासाठी वन अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करावे अश्या सूचना राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. नागपूर येथे यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

     

    या बैठकीला प्रधान सचिव श्री वेणुगोपाल रेड्डी, वनबलप्रमुख श्री शैलेंद्र  टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री महिप गुप्ता, वनविकास महामंडळाचे सिजिएम श्री संजीवकुमार, श्री प्रशांत झुरमुरे, श्री कल्याणकुमार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी एक सादरीकरण ना. सुधीर मुनगंटीवार यांना दाखविण्यात आले.

    चंद्रपूर-मूल मार्गावर वनप्रबोधिनी जवळील प्रशस्त वनक्षेत्रात व्याघ्र सफारी प्रकल्प व्हावा असा संकल्प असून केवळ व्याघ्र सफारीपुरता हा मर्यादित न ठेवता इतर वन्यजीवांचाही या सफारीत समावेश व्हावा यासाठी प्रयत्न व्हावा; अश्या प्रकल्पातून संशोधन व्हावे अशीदेखील अपेक्षा यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. ना. मुनगंटीवार म्हणाले कि, सर्व वयोगटातील पर्यटकांना आकर्षित करणारे नवीनतम, अत्याधुनिक दर्जाचे विरंगुळा केंद्र या ठिकाणी व्हावे यादृष्टीने नियोजन करणे आवश्यक असून तेथे असलेल्या वन्यजीवांची माहीती, त्यावर एखादा माहितीपूर्ण शो पर्यटकांसाठी करता येईल का, याचाही विचार करावा अशा सूचना यावेळी दिल्या.

  • पंचनामा – शासनाच्या परवानगी शिवाय सुरू असलेला चंद्रपुरातील आनंद मेळा

    पंचनामा – शासनाच्या परवानगी शिवाय सुरू असलेला चंद्रपुरातील आनंद मेळा

    News34 chandrapur

    चंद्रपूर : शहरात आनंद मेळा उघडण्यासाठी विविध विभागांचे ना हरकत प्रमाणपत्र घेतल्यानंतरच ती सुरू करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. मात्र या विभागांची परवानगी न घेताच चांदा क्लब ग्राउंड येथे आनंद मेळा सुरू असून यातून दररोज लाखोंची कमाई केली जात आहे. प्रशासकीय यंत्रणेतील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आनंद मेळाच्या मालकाशी हातमिळवणी केल्याने शासनाचा महसूल तर बुडतच आहे मात्र लहान मुले आणि सामान्य लोकांची सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यात आली आहे.

     

    40 ते 50 लाखांची उलाढाल

    चंद्रपूर शहरात वर्षातुन दोन ते तीनदा आनंद मेळा लागतो. जयंत टॉकीज जवळ, चांदा क्लब ग्राउंड आणि विद्या निकेतन शाळेजवळ हा आनंद मेळा लागतो. यामध्ये लहान मुलांच्या मनोरंजनासाठी आकाश पाळणा, झुले, टॉय ट्रेन आणि अनेक साहसी खेळ असतात. इथे पार्किंगचे पैसे वेगळे, तिकीट वेगळी आणि ज्या साहसी खेळाचा आनंद लुटायचा आहे त्याचे वेगळे पैसे. एकूण ह्याचा खर्च बघता सामान्य माणसाच्या खिशाला हे परवडण्यासारखे नाही इतकी याची तिकीट आहे. तरी सामान्य माणूस काटकसर करून एक दिवस तरी आपल्या मुलांना येथे घेऊन जातो. एका आनंद मेळ्याचा एका सत्राचा गल्ला हा 40 ते 50 लाखांचा आहे. इतकी बक्कळ कमाई यातून केली जाते.

     

    परवानगी मिळण्याआधीच मेळा सुरू

    चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राऊंड येथे 14 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या दरम्यान एक महिन्याच्या कालावधीत आनंद मेळा होणार होता. तो सुरू करण्यासाठी महानगरपालिका, अग्निशमन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण आणि जिल्हा सामान्य प्रशासन विभागाकडून याची परवानगी घ्यावी लागते. त्याशिवाय हा मेळा सुरू करता येत नाही. त्यातही जिल्हा सामान्य प्रशासन विभागाची परवानगी अतिमहत्त्वाची आहे. सर्वांची परवानगी घेतल्यानंतरच आणि त्याची पडताळणी केल्यानंतरच जिल्हा सामान्य प्रशासन विभाग याची परवानगी देते. मात्र याची पडताळणी करण्यात आली नाही. असे असताना आनंद मेळा सर्रासपणे सुरू आहे. मेळा संपण्यासाठी केवळ दहा दिवस उरले आहेत तरी परवानगी मिळण्याची प्रकिया पूर्ण झालेली नाही.

     

    मेळ्याच्या मालकाकडून खोटे कागदपत्रे सादर

    आनंद मेळा हा सामान्य नागरिकांसाठी सुरक्षित असावा यासाठी अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. ते मिळण्यासाठी लायसन्स एजन्सीचे फॉर्म A प्रमाणपत्र, त्रयस्थ एजन्सीकडून फायर ऑडिट रिपोर्ट, ज्या ठिकाणी हा आनंदमेळा होणार आहे त्याचा संपूर्ण नकाशा जोडावा लागतो. नागपुरातील आकाश अम्यूजमेंट कंपनीकडून चंद्रपूर महोत्सव मेलाचे मुख्य कार्यवाह रामपाल सेवाराम सिंह यांनी 30 ऑक्टोबरला परवानगी मिळण्यासाठी अर्ज केला. मात्र यापैकी आवश्यक कुठल्याही कागदपत्रांची पूर्तता त्यांनी केली नाही. फायर ऑडिट रिपोर्ट त्यांनी जोडली नाही, जो जागेचा नकाशा दिला तो खोटा दिला. नकाशावर जलील बाबा दर्गा दाखवण्यात आला जो चंद्रपूर शहरात नाही. कागदपत्रे पूर्ण नसताना त्याचा अर्ज नामंजूर करण्यात आला नाही. उलट हा मेळा सुरू झाला असताना त्याकडे डोळेझाक करण्यात आली.

     

    जिल्हा सामान्य प्रशासन विभागातही तेच

    हीच कागदपत्रे जिल्हा सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करण्यात आली. त्याची पडताळणी देखील संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली नाही. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाही यांत्रिकी विभागाची परवानगी मिळाली नसताना देखील हा मेळा सुरू करण्यात आला.

     

    प्रशासनाचे झोपेचे सोंग

    आनंद मेळा सुरू करण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात अर्ज सादर करण्यात आला होता. 14 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर यादरम्यान हा मेळा सुरू असण्याचे स्पष्ट असताना आणि त्यापूर्वी परवानगी घेण्याची पूर्तता झाली नसताना हा आनंद मेळा सुरू कसा झाला याची शहानिशा करण्याची तसदी प्रशासनातील एकही अधिकारी कर्मचाऱ्याने घेतली नाही.

     

    भ्रष्ट यंत्रणा आणि दलालांची टोळी

    केवळ या आनंद मेळ्याची ही गोष्ट नाही तर यापूर्वी झालेल्या अनेक आनंद मेळ्यात ही भ्रष्ट शासकीय यंत्रणा या मागे होती. त्यासाठी चंद्रपूर शहरात काही दलाल लोक सक्रिय असून ते जिल्हा प्रशासनाकडून सर्व परवान्यांचे आपण बघून घेतो याची हमी देतात. प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी देखील यासाठी चांगलीच मागणी करतात. याची पूर्तता झाली की परवानगी नसताना देखील मेळा सुरू करण्याची मुकसंमती देतात. मात्र हे धोकादायक असून भविष्यात कुठलीही मोठी दुर्घटना झाल्यास याला जबाबदार संपूर्णता प्रशासनाची भ्रष्ट यंत्रणा असणार आहे.

  • चंद्रपुरातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विविध समित्यांची स्थापना

    चंद्रपुरातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विविध समित्यांची स्थापना

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 26 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत तालुका क्रीडा संकुल, बल्लारपूर येथे राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेचे उत्कृष्ठ आयोजन, व्यवस्थापन व कामकाज उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली. सदर समित्यांना दिलेली जबाबदारी ओळखून कामे पार पाडण्याच्या सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.

     

    जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात सदर समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेतांना ते बोलत होते.

     

    बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., मनपा आयुक्त विपिन पालीवाल, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अजय चरडे, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी स्नेहल रहाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, बल्लारपूरचे मुख्याधिकारी विशाल वाघ, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, कार्यक्रम व्यवस्थापक सिद्धार्थ मेहता आदी उपस्थित होते.

     

    जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात खेळाडू, संघ व्यवस्थापक, खेळाडूंचे पालक, कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती असणार आहे. सदर स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विविध समित्यांची स्थापन करण्यात आली आहे. प्रत्येक समितीने आपल्या कार्याची जबाबदारी ओळखून स्पर्धा कालावधीत अनुषंगिक कामे पार पाडावीत.

     

    आयोजन समितीने राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन उत्कृष्ट होण्याकरीता संपूर्ण नियोजन करावे. खेळाडूंची नोंदणी करण्यासाठी रजिस्ट्रेशन डेक्सची उपलब्धता ठेवावी. स्पर्धेकरीता येणाऱ्या खेळाडूंसाठी निवास व्यवस्था करणे, आवश्यकतेनुसार मनुष्यबळांची उपलब्धता ठेवावी. मदत कक्षाद्वारे खेळाडूंना सर्व माहिती उपलब्ध होईल याअनुषंगाने माहिती द्यावी तथा कॉलसेंटर उभारावे. स्वच्छता समितीने परिसर स्वच्छता, भोजनाचा परीसर तसेच निवासव्यवस्थेसह, क्रीडांगणाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी. याकरीता बल्लारपूर नगरपालिका व चंद्रपूर महानगरपालिकेने त्यांचे मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे.

     

    जिल्हाधिकारी श्री. गौडा पुढे म्हणाले, आरोग्य सुविधेसाठी डॉक्टरांच्या चमूसह ॲम्बुलन्स उपलब्ध ठेवाव्यात. भोजन समितीने खेळाडूंच्या तसेच मान्यवरांच्या भोजनासाठी कुपनची व्यवस्था ठेवावी. येणाऱ्या खेळाडूंकरीता वाहतूक व्यवस्था तसेच वाहनासाठी पार्किंग व्यवस्था ठेवावी. सुरक्षा समितीने सुरक्षा यंत्रणा अद्यावत ठेवाव्या. वनअकादमी, सैनिक शाळा आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यासारख्या निवास व्यवस्थेच्या तसेच क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी पोलीसांची सुरक्षा व्यवस्था ठेवण्याच्या सुचना दिल्या तसेच प्रत्येक समितीने आपल्या कार्याची जबाबदारी ओळखून स्पर्धा कालावधीत अनुषंगिक कामे पार पाडावीत, असेही ते म्हणाले.

     

    या आहेत समित्या:

    आयोजन समिती, उद्घाटन समिती, स्वागत समिती, निवास व्यवस्था समिती, मदत कक्ष, भोजन समिती, क्रीडा कार्यक्रम व तक्रार निवारण समिती, स्थानिक पर्यटन समिती, प्रसिद्धी आणि पायाभूत सुविधा समिती, वाहतूक व्यवस्था समिती, सांस्कृतिक कार्य समिती, सुरक्षा समिती स्वच्छता समिती आदी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

  • 6 डिसेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी

    6 डिसेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी

    News34 chandrapur

    चंद्रपूर :  नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दि. 6 डिसेंबर 2023 रोजी चंद्रपूर  जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार, दि. 06 डिसेंबर रोजी जिल्‍ह्यात बहुदा सर्वत्र हल्‍का ते मध्‍यम पाऊस पडण्‍याची संभावना असून एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस, विजांच्‍या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळ वेग (30ते40 किमी प्रतितास) होण्‍याची शक्‍यता वर्तविली आहे.

     

    खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी घ्यावी काळजी :

    संरक्षणात्‍मक कपडे घाला आणि घरात आश्रय घ्‍या. मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्‍या आणि दरवाज्‍यापासून दुर रहावे. रोडवे अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे, सखल भाग आणि जिथे पाणी साचते अशा भागातुन जाणे टाळावे. खराब दृश्‍यमानतेमुळे मुसळधार पाऊसात वाहने चालवणे टाळा. पूर आलेला रस्‍ता ओलांडून गाडी चालवण्‍याचा प्रयत्‍न करू नका. पाणी दिसते त्‍यापेक्षा खोल आणि मजबुत असु शकते आणि त्‍यात मोडतोड तीक्ष्‍ण किंवा धोकादायक वस्‍तू, भांडे, छिद्र किंवा विजेच्‍या तारा असु शकतात.  पॉवर लाईन्‍स किंवा विजेच्‍या तारांपासून दुर रहा. फ्लॅश पुर चेतावणी किंवा विजेच्‍या तारांपासून दुर रहा.

     

    वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना काय करावे आणि काय करु नये:

     

    विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असल्यास त्या वस्तू त्वरीत बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका.  शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.  विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहु नका.  जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. तरी, जिल्‍ह्यातील नागरिकांनी उचित काळजी घ्‍यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्‍यात आले आहे.

  • आमदाराची पुस्तक तुला

    आमदाराची पुस्तक तुला

    News34 chandrapur

    अहमदनगर – विविध व्यासपीठांवरून तरुणाईला शिक्षणाचं आणि वाचनाचं महत्त्व पटवून देणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांच्या कारकि‍र्दीत एक अनोखा सन्मान त्यांना मंगळवारी प्राप्त झाला. आ. सत्यजीत तांबे शेवगावच्या दौऱ्यावर असताना त्यांनी राजीव राजळे मित्रमंडळ आयोजित ‘राजीव बुक फेस्ट २०२३’ या भव्य पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली.

     

    या वेळी शेवगावचे नगरसेवक रिंकु कलके आणि ग्रामस्थांनी आमदार सत्यजीत तांबे यांची ‘पुस्तक तुला’ केली. या वेळी स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शक प्रा. विठ्ठल कांगणे उपस्थित होते. एखाद्या नेत्याचा पुस्तक तुला करून केलेला सन्मान आपण पहिल्यांदाच पाहिला आणि आपल्या डोळ्यांचे पारणे फिटले, अशी प्रतिक्रिया कांगणे यांनी व्यक्त केली.

    सत्यजीत तांबे म्हणाले की, मी नेहमी तरुणाईला सांगत असतो की, पुस्तकी ज्ञान वाढवा. कारण, पुस्तक हे माणूस घडवण्याचे काम करते. पुस्तक माणसाला ज्ञानी बनवतात. पुस्तक म्हणजे केवळ कागदांचा संग्रह नव्हे. तर पुस्तक माणसाच्या आयुष्याला वेगळी दिशा देत असतात. म्हणून आपण पुस्तकांच्या सहवासात सातत्याने राहिले पाहिजे. या पुस्तक तुलेसाठी वापरलेली पुस्तकं आता विविध संस्थांना आणि गरजू विद्यार्थ्यांना दान करण्यात येतील.

    पुस्तक हे माणसाचे आयुष्य घडवते. त्यामुळे वाचनसंस्कृती जपली पाहिजे. वाचन संस्कृतीचा वारसा पुढे नेण्याचं काम आ. सत्यजीत तांबे करत आहेत, अशी भावना या वेळी कलके यांनी व्यक्त केली. दरम्यान, आमदार तांबे यांना ‘ज्ञान उपासना सन्मान’ प्रदान करण्यात आला.

  • चिमूर क्रांती भूमीत ७ डिसेंबर पासून ओबीसी चे अन्नत्याग आंदोलन

    चिमूर क्रांती भूमीत ७ डिसेंबर पासून ओबीसी चे अन्नत्याग आंदोलन

    News34 chandrapur

    चिमूर – नागपूर येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशना दरम्यान राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आक्रमक पवित्रा घेत चिमूर क्रांती भुमितून ७ डिसेंबर पासून पुन्हा अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येत आहे त्या संदर्भात अतिरिक्त जिल्हाधिकारी चिमूर व आमदार भांगडिया याना निवेदन देण्यात आले आहे.

     

    ओबीसी समाजाच्या विविध मागण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वतीने विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांनी चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालय समोर अन्नत्यांग आंदोलन सुरू केले होते. त्या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी मुंबई येथे २९ ऑक्टोमबर २०२३ ला सह्याद्री अतिथीगृहावर बैटक आयोजित केली होती. परंतु अजूनही समस्या सुटल्या नसल्यामुळे ७ डिसेंबर २०२३ पासून ओबीसीच्या विविध मागण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमूरच्या वतीने तहसील कार्यालयाच्या बाजूला अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.

     

    या बाबत राष्ट्रीय ओबीसी महासंघच्या वतीने चिमूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर घाडगे व आमदार कीर्तीकुमार भांगडिया याना निवेदन देण्यात आले आहे

  • चिमूर नगर परिषद हद्दीत घाणीचे साम्राज्य

    चिमूर नगर परिषद हद्दीत घाणीचे साम्राज्य

    News34 chandrapur
    चिमूर – चिमूर नगर परिषद क्षेत्रातील वडाळा पैकु जुन्या वस्तीत घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून नगर परिषदच्या विरोधात नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

     

    नगर परिषद चिमूर, प्रभाग क्र ३/४ मधील, गटारी तुडुंब भरली असून,२ वर्षांपासून नाली उपसा करण्यात आली नाही त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. गटारामध्ये अळ्या, कीटक पडली असून मच्छर चा प्रादुर्भाव वाढला आहे. याकडे न प चिमूर कडून अजूनपर्यंत दखल घेतल्या गेली नाही ही शोकांतिका आहे.

     

    तसेंच बोरवेल नांदुरुस्त, सर्व,विहीर भोवती काटेरी झाडें व घाण साचली आहे काही विद्युत पथदिवे बंद अवस्थेत आहे, या गंभीर समस्येकडे प्रशासन का लक्ष देत नाही याची खंत वाटते. केवळ कर वसुली करून जनतेला वेठीस धरणे योग्य नाही.

     

    ५/६ वर्षपासून दूषित नळ पाणी पुरवठा सुरू असून याकडे सुद्धा दुर्लक्ष आहे. नगर परिषद अखेर काय साध्य करत आहे हे एक कोडच आहे. वडाळा ग्रामपंचायत स्वतंत्र होती तेव्हाच जनतेला सर्व नागरी सुविधा परिपूर्ण मिळायच्या परंतु हल्ली नगर परिषद मध्ये समाविष्ट करून पश्चाताप होत असल्याची नागरिकांना खंत वाटत आहे.

  • तीन राज्यातील अभुतपूर्व विजयाचा चंद्रपुरात भाजपा कार्यकर्त्यांद्वारा जल्लोष

    तीन राज्यातील अभुतपूर्व विजयाचा चंद्रपुरात भाजपा कार्यकर्त्यांद्वारा जल्लोष

    News34 chandrapur

    चंद्रपूर – प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचे कणखर नेतृत्व, देशभरात विकासाचा झंझावात, ‘सबका साथ, सबका विकास व सबका विश्वास’ हे धोरण यशस्वीपणे राबविल्या गेल्याने भाजपाला मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांमध्ये निर्विवाद बहूमत प्राप्त झाल्याने चंद्रपूर महानगरात भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत विजयाचा जल्लोष साजरा केला. नागरीकांना मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.

     

    भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद कडू, युवा नेते रघुवीर अहीर, यांच्या नेतृत्वात दि. 03 डिसेंबर 2023 रोजी कस्तुरबा चौक (गिरणार) येथे साजरा झालेल्या या विजयोत्सवात ब्रिजभुषण पाझारे, राजेंद्र अडपेवार, गिरीष अणे, सुरेश भाकरे, विनोद शेरकी, गणेश गेडाम, राजेंद्र खांडेकर, राहुल घोटेकर, सविता कांबळे, पुष्पाताई उराडे, चंद्रकला सोयाम, रेणुकाताई घोडेस्वार, शेख जुम्मन रिजवी, अरविंद कोलणकर, राजू येले, रवी चहारे, ललित गुलानी, सय्यद चाँद, स्वप्नील मुन, विशाल गिरी, स्वप्निल कांबळे, मोनिषा महातव, चेतन शर्मा, प्रविण चुनारकर, अवलेश यादव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी या विजयोत्सवात सहभाग घेतला.

     

    या प्रसंगी भाजप कार्यकर्त्यांनी ‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जिंदाबाद’ चे नारे देवून तीन राज्य केवल झॉंकी है, लोकसभा अब बाकी है । असे नारे देवून परिसर दणाणून सोडला.

  • महावितरण मधील लाईनमन, लाईनस्टाफ यांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा

    महावितरण मधील लाईनमन, लाईनस्टाफ यांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा

    News34 chandrapur

    चंद्रपुर: महाराष्ट्र राज्य चे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना महावितरणचा कणा म्हटल्या जाणाऱ्या लाईनस्टाफ लाईनमन यांनी दि 1 डिसेंबर ला आपल्या समस्या मांडत संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या आंदोलनाचे निवेदन लाईनस्टाफ बचाव कृती समिती चंद्रपुर तर्फे नियोजन भवन येथे नुकतेच देण्यात आले.
    महाराष्ट्र मधील वीज पुरवठा करणारी एशिया खंडांतील सर्वात मोठी कंपनी म्हणजे महावितरण.

    महावितरण आपल्या महाराष्ट्र मधील अति दुर्गम भागातील लोकांना वीज पुरवठा देण्याचे कार्य करते आणि हे महत्वाचे कार्य करणाऱ्या लाईनमन लाईनस्टाफ ला महावितरण प्रशासन चपराशी च्या ग्रेड मध्ये ठेवून अन्याय करीत आहे.

     

    महावितरण मध्ये लाईनमन लाईनस्टाफ हा एक शिकलेला ITI केलेला कुशल कामगार म्हणून घेतल्या जाते परंतु त्याला वर्ग 4 मधील चपराशी च्या ग्रेड मध्ये ठेवण्यात आले आहे.
    त्यामुळे महाराष्ट्र मधील सर्व लाईनस्टाफ यांनी धुळे येथे 1 ऑक्टोबर ला महामेळावा घेतला त्यात जवळपास 10 हजार लाईनस्टाफ उपस्थित होते.त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय वर आक्रोश व्यक्त केला आणि तिथे या मेळाव्याला सर्व महावितरण मध्ये कार्यरत 27 संघटनाना निमंत्रित करण्यात आले होते.

     

    पण लाईनस्टाफ च्या हिताचे विचार करणारे फक्त 9 संघटना उपस्थित होत्या. त्यांनी एकमत करून महाराष्ट्र राज्य वीज लाईनस्टाफ बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली आणि या समितीने आंदोलनाचा इशारा देत लाईनस्टाफ च्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विनंती केली परंतु प्रशासन ने कोणतीही दखल घेतली नाही म्हणून 16 ऑक्टोबर 2023 ला सविस्तर आंदोलन ची नोटीस देण्यात आली.

     

    त्या नोटीस प्रमाणे 20 ऑक्टोबर 2023 ला महावितरण च्या सर्व मंडळ कार्यालय समोर द्वार सभा घेण्यात आली.
    यापुढे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये महावितरण चा कणा खाकी रक्षक लाईनस्टाफ क्रमबद्ध आंदोलन सुरू असून आता शेवटच्या टप्प्यात आले आहे.

     

    मागण्या

    1 महावितरण लाईनमन लाईनस्टाफ कुशल कामगार असून त्यांना चपराशी च्या वर्ग 4 मधून वर्ग 3 मध्ये टाकण्यात यावे.

    2 लाईनमन लाईनस्टाफ चे शहर असो की ग्रामीण कामाचे तास निश्चित करून शिफ्ट ड्युटी चार्ट प्रमाणे ड्युटी देण्यात यावी.

    3 लाईनमन लाईनस्टाफ चे कामाचे स्वरूप निश्चित नसून ते निश्चित करण्यात यावे.

    4 लाईनमन लाईनस्टाफ याना स्वतंत्र वेतन श्रेणी देण्यात यावी.

    5 लाईनमन लाईनस्टाफ यांना वाहन पेट्रोल भत्ता 20 लिटर देण्यात यावा कारण त्यांना आता कंपनी कामासाठी ग्राहकांच्या तक्रार निवारण करण्यासाठी स्वतःच्या वाहन ने जावे लागते त्यामुळे वाहन पेट्रोल भत्ता देण्यात यावा.

     

    6 वीज बिल वसुली हे काम सांघिक स्वरुपाचे असल्याने जवाबदारी निश्चित करण्यात यावी.

    7 ग्राहकांना वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी योग्य सुरक्षित साधने आणि लाईन मेंटेनन्स चे साहित्य पुरविण्यात यावे.

    8 कंत्राटी पद्धतीने नोकरभरती ना करता सरळसेवा पद्धतीने नोकर भरती करण्यात यावी.

    अशा प्रमुख मागण्या लाईनस्टाफ कडून महाराष्ट्र राज्य वीज लाईनस्टाफ बचाव कृती समिती चंद्रपुर मार्फत करण्यात आलेल्या आहे.

     

    या मागण्या मान्य झाल्या नाही तर हे आंदोलन असेच सुरू राहील आणि महाराष्ट्र राज्यात वीज समस्या वाढतील आणि महाराष्ट्र सुद्धा अंधारात जाण्याची भीती आहे असा इशारा निवेदना द्वारे देण्यात आला.

     

    निवेदन देताना विलास गजभे, निलेशकुमार जवादे, रुपेश बनकर, आदेश धानोरकर, मर्द रामटेके, पंकज गेडे, गणेश जिवतोडे, पुरोहित भीमटे व लाईनस्टाफ बचाव कृती समिती चंद्रपुर संघटना पदाधिकारी व सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.