चंद्रपुरातील अमृत योजनेच्या कंत्राटदारास काळ्या यादीत टाका – हंसराज अहिर

News34 chandrapur

चंद्रपूर – अमृतजल नळ पाणी पुरवठा योजना ही मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या स्वप्नातील महत्वाकांक्षी योजना असतांनाही चंद्रपूर महानगरपालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार व नियोजनशुन्यतेमुळे 2021 पर्यंत पुर्णत्वास जाणारी ही योजना अजुनही भरकटत असून लोकांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत असल्याने संबंधित दोषी कन्सट्रक्शन कंपनी व मालकाला संपूर्ण महाराष्ट्रातून काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या संदर्भात घेतलेल्या समिक्षा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिलेत.

सदर योजनेबाबत महानगरातील मागासवर्गीय, दलित नागरीकांच्या तसेच भाजप पदाधिकारी खुशाल बोन्डे , विनोद शेरकी यांचेकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

 

या तक्रारींची दखल घेवून हंसराज अहीर यांनी दि. 15 सप्टें. 2023 रोजी शासकीय विश्रामगृहात मनपा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांची याप्रश्नी समिक्षा बैठक घेतली. बैठकीस मनपा आयुक्त विपीन पालीवाल, मजीप्रा चे कार्यकारी अभियंता संजय अष्टगी, मुख्य अभियंता महेश बारई, उपअभियंता बोरीकर, भाजप नेते खुशाल बोंडे, माजी महापौर अंजली घोटेकर, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, राजु घरोटे, रविंद्र गुरनुले उपस्थित होते.

 

अमृतचे कार्य करणाऱ्या संतोष कन्सट्रक्शन कंपनीने या कामात प्रचंड घोळ करीत कामे पुर्ण न करता पैसे घेवून पळ काढल्याने या योजनेवर 240 करोड खर्ची घालुनही लोकांना पाणी मिळत नाही ही अत्यंत गंभीर बाब असून या महा. जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची अक्षम्य चूक व हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे अहीर यांनी म्हटले. कामाची प्रगती, गुणवत्ता तपासणी न करता मजीप्राच्या शिफारसीने तत्कालीन मनपा आयुक्तांनी अपूर्ण काम व योजना पुर्णत्वास न गेली असतांना कंत्राटदाराला अपूर्ण कामाचे व आगावू रक्कम दिल्याची बाब उघडकीस आली असून हा प्रकार अक्षम्य आहे. त्यामुळे सदर कंत्राटदारास त्वरीत काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करावी. या विषयी पुढील महिण्यात या योजनेसंदर्भात जनसुनावणी घेण्यात येणार असल्याचेही हंसराज अहीर यांनी सांगीतले.

 

सुरूवातीला सदर योजना 2019 पर्यंत पुर्णत्वास जाण्याचा करार होता. मात्र शासनाने या करारास 2 वर्षे मुदतवाढ दिल्याने ही योजना 2021 पर्यंत पुर्णत्वास जाणे अपेक्षीत असतांना हे काम वेळेत पुर्ण करून घेण्यास असमर्थ ठरल्याचे अधिकाऱ्यांनी समिक्षा बैठकीत मान्य केले. त्यावेळी अहीर यांनी नाराजी व्यक्त करतांनाच अधिकाऱ्यांनी कंपनीला अप्रत्यक्षपणे सहकार्यच केल्याचे अहीर यांनी अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला. त्यांनी योजनेविषयी गंभीर स्वरूपाच्या अनेक बाबींवर भाष्य करीत सदर कंपनीला तातडीने बोलावून काम पूर्ण करण्याच्या सुचना कराव्या अन्यथा पोलिस तक्रार करावी, अतिरिक्त दंडाची आकारणी करावी, आगावू अदा केलेली रक्कम वसूल करण्याची कार्यवाही करावी असे निर्देश दिले. संतोष कन्सट्रक्शन कंपनीच्या विषयात अडकून न पडता सदर योजना कशी मार्गी लावता येईल याविषयी नियोजन करण्याची सुचनाही अहीर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केली.

 

उपस्थित नगरसेवकांनीही यावेळी त्यांच्या भागातील तक्रारींचा पाढा वाचला. बैठकिस नगरसेवक राजेंद्र अडपेवार, जयश्रीताई जुमडे, शाम कनकम, मायाताई उईके, प्रदिप किरमे, संजय कंचर्लावार, शितल आत्राम, रवी आसवाणी, कल्पनाताई बगुलकर, विठ्ठल डुकरे, रवी लोणकर, पूनम तिवारी, महेंद्र जुमडे, सुभाष आदमने, नकुल आचार्य उपस्थित होते.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *