Tag: चंद्रपूर मराठी बातम्या

  • चंद्रपुरातील मतदारांपर्यंत पोहचणार ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृतीचा चित्ररथ

    चंद्रपुरातील मतदारांपर्यंत पोहचणार ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृतीचा चित्ररथ

    News34 chandrapur

    चंद्रपूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आगामी लोकसभा / विधानसभा सार्वत्रिक निवडणुका – 2024 च्या अनुषंगाने, इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन (ईव्हीएम) व व्हीव्हीपॅट वापराबाबत एलईडी चित्ररथाद्वारे जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. सदर मोहीम चंद्रपूर जिल्ह्यात फेब्रुवारी 2024 अखेरपर्यंत राबविण्यात येणार असून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते नियोजन भवन येथे चित्ररथाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

     

    यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, आगामी लोकसभा / विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने ईव्हीएम / व्हीव्हीपॅटबाबात प्रचार प्रसिध्दी आणि लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी 10 डिसेंबर 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 2032 मतदान केंद्र, प्रत्येक शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, गाव / शहरातील मुख्य चौक, बाजारपेठ, नाका, शासकीय कार्यालये, सभेची ठिकाणे इत्यादी मौक्याच्या ठिकाणी फिरत्या वाहनांद्वारे सदर मोहीम राबविण्यात येईल. या जनजागृती मोहिमेमध्ये प्रशिक्षण व प्रात्यक्षिक करून दाखविण्यात येणार आहे.

     

    पुढे जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिमेमध्ये मतदान प्रक्रियेसंबंधी माहिती जाणून घेणे, मतदान यंत्राबाबत आवश्यक माहिती घेणे, प्रत्यक्ष मतदान करणे, आपण केलेल्या मतदानाप्रमाणेच निकाल येतो का, ते तपासणे, याबाबत नागरिकांच्या मनात काही शंका असल्यास त्याचे निरसन करणे, तसेच व्हीव्हीपॅटबाबत माहिती जाणून घ्यावी.

     

    जिल्ह्यातील प्रत्येक मतदारांपर्यंत ही जनजागृती मोहीम पोहचेल, असे नियोजन जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आली आहे. याचा लाभ जिल्ह्यातील सर्व मतदारांनी घ्यावा. तसेच येणा-या निवडणुकीत आपल्या मतदानाचा अधिकार बजावून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले.
    यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी दगडू कुंभार यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते.

  • 67व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी चंद्रपूर सज्ज

    67व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी चंद्रपूर सज्ज

    News34 chandrapur

    चंद्रपूर : बल्लारपूर (विसापूर) तालुका क्रीडा संकूल येथे होणा-या 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि.23) घेतला. विसापूर येथील क्रीडा संकुलाला भेट देऊन त्यांनी व्यवस्थेची पाहणी केली व संबंधितांना सुचना दिल्या.

     

    यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, सहायक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., विशेष कार्य अधिकारी डॉ. विजय इंगोले, मनपा आयुक्त विपील पालीवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, जिल्हा पुरवठा अधिकारी अजय चरडे, उपविभागीय अधिकारी स्नेहल राहाटे, तहसीलदार डॉ. कांचन जगताप, हरीश शर्मा, राहुल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे आदी उपस्थित होते.
    जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, स्पर्धेच्या आयोजनासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. सर्व समित्यांनी एकमेकांत समन्वय ठेवावा. तसेच शासकीय, अशासकीय सदस्य आणि स्वयंसेवकांनी चर्चा करून सुक्ष्म नियोजन करावे.

     

    जिल्हा प्रशासनाचे सर्व अधिकारी, क्रीडा संघटना, त्यांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी या स्पर्धेच्या यशस्वीकरीता दिवसरात्र काम करीत आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून चंद्रपूर, बल्लारपूरचे नाव देशपातळीवर पोहचून जिल्ह्याचा नावलौकिक होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने या स्पर्धेकरीता उत्स्फुर्तपणे आपले योगदान द्यावे. बाहेरून येणा-या खेळाडूंना निवास, वाहतूक, भोजन आदी व्यवस्थेसंदर्भात माहिती उपलब्ध करून द्यावी. खेळाडूंना काही अडचणी आल्या तर त्याचे निराकरण करण्यासाठी मदत कक्ष, संपर्क क्रमांक, चॅटबॉट आदी व्यवस्था सज्ज ठेवाव्यात. खेळाडूंना घेऊन येणा-या प्रतिनिधींसोबत समित्यांनी समन्वय ठेवून त्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी दिल्या.

    यावेळी जिल्हाधिका-यांनी संपूर्ण टीमसह, नोंदणी कक्ष, स्वागत कक्ष, भोजन व्यवस्था कक्ष, पार्किंगची व्यवस्था, क्रीडा मैदान, सांडपाणी व्यवस्था आदींची पाहणी केली.

  • हंसराज अहिर यांनी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील 3 विधानसभेचा घेतला आढावा

    हंसराज अहिर यांनी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील 3 विधानसभेचा घेतला आढावा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील वरोरा विधानसभा क्षेत्र, वणी विधानसभा क्षेत्र व आर्णी विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरियर्स, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधून लोकसभा समन्वयक तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी बुथ रचना बळकट करीत सुपर वॉरियर्सने आपल्या नियंत्रण क्षेत्रातील प्रत्येकी तीन बुथवर 50 टक्क्याहून अधिक मतदान मिळेल याकरीता प्रभावीपणे कार्य करण्याची सुचना केली.

     

     

    वरोरा येथे दि. 23 डिसे. 2023 रोजी पार पडलेल्या विधानसभानिहाय कोअर कमिटीच्या या बैठकीस वरोरा विधानसभा निवडणुक प्रमुख रमेश राजुरकर, डॉ. भगवान गायकवाड, अंकुश आगलावे, नरेंद्र जीवतोडे, करण देवतळे, रोशनीताई देवतळे, सुनिताताई काकडे यांचेसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. वणी व आर्णी विधानसभा क्षेत्राच्या कोअर कमिटी बैठकीस प्रमुख पदाधिकारी, सुपर वॉरियर्स उपस्थित होते.

     

     यावेळी उपस्थित पदाधिकारी, सुपर वॉरियर्स व बुथ प्रमुखांना मार्गदर्शन करतांना हंसराज अहीर यांनी महाविजय 2024 चे स्वप्न साकार करण्यास व मा. मोदीजींच्या नेतृत्वात देशाची आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी सुपर वॉरियर्सनी आवश्यक ते निर्णय व विशेष लक्ष घालून बुथ रचनेचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्याची सुचना केली.

     

    सुपर वॉरियर्सने महाविजयाचा संकल्प घेत प्रत्येक मुद्दा, विषय समजुन घेवून त्याची तिन्ही बुथवर शत प्रतिशत अंमलबजावणी करण्याचे नियोजन करावे अशा सुचनाही अहीर यांनी वरील तिन्ही विधानसभा क्षेत्रातील कोअर कमिटी पदाधिकारी वॉरियर्स व उपस्थित कार्यकर्त्यांना केल्या.

  • विदर्भाच्‍या विकासावर आमदार अडबाले यांनी वेधले लक्ष

    विदर्भाच्‍या विकासावर आमदार अडबाले यांनी वेधले लक्ष

    News34 chandrapur

    चंद्रपूर : नागपूर हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना आमदार सुधाकर अडबाले यांनी विदर्भातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. वन्यप्राण्यांचा धोका, दुष्काळी परिस्थिती, उद्योगामुळे होत असलेले प्रदूषण, बेरोजगारी आणि सैनिकी शाळेमध्ये विदर्भातील विद्यार्थ्यांना आरक्षण देण्याची मागणी यावेळी त्यांनी सभागृहात केली.

     

    आमदार अडबाले म्हणाले की, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये वन्यप्राण्यांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शेतकरी व शेतमजुरांचा वन्यप्राण्यांमुळे बळी जात आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये हत्तींचा हैदोस सुरू आहे. जंगली प्राण्यांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप पुरेशा प्रमाणात देण्याची गरज आहे. जंगली प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान होत असेल तर पिक कव्हर इन्शुरन्स देण्याची व्यवस्था करावी.

     

    विदर्भामध्ये विशेष करून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सिमेंट उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. या उद्योगांमुळे प्रदूषण होत आहे. प्रदूषणामुळे पिकांचे आणि नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. अनेक आजारांनी चंद्रपुरकरांना ग्रासले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड या ठिकाणी खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणीही प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी असल्यामुळे जलसाठा खोली वाढली आहे. विहिरी किंवा बोरिंगचे पाणी खाेलवर गेले आहे. वर्धा नदीवर शेतकऱ्यांच्या सिंचन दृष्टीने बॅरेजेस बांधण्याची गरज आहे.

     

    विदर्भात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सुशिक्षित बेरोजगार पूणे-मुंबईला जातात. विदर्भातील उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. कापूस आणि सोयाबीन हे विदर्भाचे मुख्य पीक आहेत. या पिकांच्या भावात स्थिरता आणण्याची गरज आहे.

     

    गडचिरोली जिल्ह्यामध्ये रेल्वे नाही. रेल्वे कशी पोहोचेल, यादृष्टीने शासनाने पाऊले उचलावीत. चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्‍या सैनिकी शाळेमध्ये विदर्भातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी विशेष आरक्षण द्यावे. जेणेकरून होतकरू विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण घेता येईल व इतर विदर्भ विकासाच्या बाबींकडे आमदार सुधाकर अडबाले यांनी लक्ष वेधले.

  • महिला काँग्रेस बल्लारपूर विधानसभेची जम्बो कार्यकारणी जाहीर

    महिला काँग्रेस बल्लारपूर विधानसभेची जम्बो कार्यकारणी जाहीर

    News34 chandrapur

    चंद्रपूर : सर्वच क्षेत्रात महिलांनी समोर येऊन प्रभावीपणे काम करावे. हि धारणा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची आहे. राजकारणात देखील महिलांनी सक्रिय होऊन काम करण्यासाठी त्या सातत्याने महिलांना आवाहन करीत असतात. त्यांच्या आवाहनाला साद देत अनेक महिला काँग्रेसमध्ये प्रवेश करून सक्रिय काम करीत आहेत. चंद्रपूर येथील धानोरकर जनसंपर्क कार्यालयात माजी शिक्षण मंत्री तथा आमदार वर्षाताई गायकवाड, आमदार प्रतिभाताई धानोरकर तसेच महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष नम्रताताई ठेमस्कर यांच्या प्रमुख उपस्थिती महिला काँग्रेस बल्लारपूर विधानसभेची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
    याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी संदीप कुमार जी, महाराष्ट्र प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, कामगार नेते के. के. सिंग, शहर काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद विनोद अहिरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा तालुका अध्यक्ष रवी मरपल्लीवार, जिल्हा काँग्रेस महिला उपाध्यक्ष वैशाली पुल्लावार, पोंभूर्णा तालुका अध्यक्ष हेमंत आरेकर, युवा नेते आशिष अहिरकर, अंशुल मोरे यांची उपस्थिती होती.
    यावेळी  शोभा नंदू कुमरे, वैशाली पुल्लावार यांची जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्ष  पदावर तर छबूताई वामन पावडे, वंदना शत्रुघ्न उईके, किशोरी विकास मशाखेत्री, सुशिला प्रभाकर कुळमेथे, मंगलाताई दादाजी आत्राम, शोभा प्रकाश महाजनवार, प्रेमिला गोविंदा रोहणकर, रिना रंजीत मारबोनवार यांची जिल्हा महिला काँग्रेस महासचिव म्हणून तर संगीता विनायक बुरांडे, रोशना लोंढे, शिल्पा विनोद ठाकरे, प्रिती नरेश भांडेकर, कविता किशोर नंदीग्रामवार, विनता नितेश रायपुरे, नलिनी थेरकर यांची जिल्हा महिला काँग्रेस सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.
  • राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गटाच्या नेत्याने पत्रकाराला केली मारहाण

    राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गटाच्या नेत्याने पत्रकाराला केली मारहाण

    News34 chandrapur

    चंद्रपूर –  गडचांदूर नगरपरिषद उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते ‘शरद सुरेश जोगी’ यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या ‘J-पॅलेस’ नामक बार & रेस्टॉरंट,लॉजचे प्रकरण सध्या सर्वत्र गाजत असून जोगी यांनी खोटे शिक्के व खोट्या सह्यांच्या आधारे शासनाची दिशाभूल करत सदर बारचा परवाना मिळवल्याची तक्रार संबंधित विभागाकडे करून परवाना रद्द करावा आणि शासनाची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा,अशी मागणी करण्यात आली आहे.

     

    यासंदर्भात बातमी प्रकाशित करण्यापुर्वी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी एका वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी, कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पत्रकार ‘गणेश लोंढे’ यांनी जोगी यांना संपर्क केला असता फोनवर प्रतिक्रिया देत नाही,प्रत्यक्ष भेट मग देतो.!असे बोलून ‘J-पॅलेस’ बार मध्ये बोलवले.

     

    दुरध्वनीवर प्रतिक्रिया देत नसल्याने साध्या मनाने गणेश लोंढे सदर बारमध्ये गेले असता त्याठिकाणी पत्रकार गणेश यांनी प्रतिक्रिया विचारताच जोगी यांनी अश्लील शिवीगाळ करत ‘तु भला मोठा पत्रकार झाला का ? माझी सत्ता आहे,पाहून घेतो तुमच्या सारख्या पत्रकारांना, असे म्हणत पत्रकार गणेश यांच्या हातातील मोबाईल हिसकावून जोरात जमिनीवर आपटला,खुर्ची उचलून मारली आणि उद्या जर बातमी आली तर तुला मारून टाकतो’, अशाप्रकारे जीवे मारण्याची धमकी दिली.यात पत्रकार गणेश यांना गुप्त मार बसला आहे.

     

    जोगी यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी चंद्रपूर जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश सोलापन यांनी शिष्टमंडळासहित पोलीस अधिक्षकांची भेट घेतली, यावेळी घडलेला सर्व प्रकार लोंढे यांनी पोलीस अधीक्षकांना सांगितला, कारवाई होणार असे निर्देश संबंधित पोलीस अधिकाऱ्याला पोलीस अधीक्षकांनी दिले.

     

    जर जोगी यांच्यावर कारवाई झाली नाही तर सत्तेचा माज असलेल्या नेत्याविरोधात ग्रामीण पत्रकार संघटना आक्रमक होत एकजुटतेने याविरोधात आंदोलन करणार असा इशारा सोलापन यांनी यावेळी दिला.

  • चंद्रपूर जिल्ह्यात अपघात दिवस, 1 ठार तर 12 जखमी

    चंद्रपूर जिल्ह्यात अपघात दिवस, 1 ठार तर 12 जखमी

    News34 chandrapur

    चिमूर – चिमूर तालुक्यात शुक्रवार दिवस हा अपघात दिवस ठरला असून आज चक्क 13 व्यक्ती विविध अपघातात जख्मी झाले असून एकाचा मृत्यू तर 12 व्यक्तीवर चिमूर उपजील्हा रुग्णालयात उपचार सुरू असून दोन रुग्णांना नागपूर येथे उपचाराकरिता रवाना केले आहे. नानाजी शिवराम जीवतोड वय 65 वर्ष यांचा मृत्यू झाला.

     

    चिमूर तालुक्यात अपघाताचे प्रमाण वाढले असून राष्ट्रीय महामार्गावरील शहरालगतच्या लोखंडया पुलाजवळ मिनझरी बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन दुचांकीस्वर गंभीर जख्मी झाले. राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक एम एच 31 FC 3690 मिंनझरी वरून चिमूर कडे विद्यार्थी व प्रवासी घेऊन राष्ट्रीय महामार्गाने येत असताना लोखंडी पुलाजवळ दुचाकी क्रमांक एम एच 34 व्हि 4146 ला धडकली त्यामुळे झालेल्या अपघातात दोन्ही दुचाकीस्वर शरद शंकर आदे वय 25. सोमेश्वर लक्ष्मण पंचवटे वय 49 दोघेही राहणार हिरापूर् गंभीर जखमी झाले आहेत.

     

    त्यांना नागपूर येथे उपचाराकरिता रवाना केले आहे. तर शेगाव येथून मयतिच्या कार्यक्रमाकरिता जात असताना चिमूर नेरी मार्गावर पोल्ट्रीफार्म जवळ टाटासुमो MH -26 L 1667 या गाडीचा राळ तुटल्याने टाटा सुमो गाडी पलटी झाल्याने ड्रायव्हर सोबत अकरा व्यक्ती जख्मी झाले. घटनेची माहिती चिमूर पोलिसांना कळताच घटनास्थळावर सहायक पोलिस निरीक्षक निलेश चवरे पोलिस कर्मचाऱ्यांसाठी घटनस्थलवर पोहचून पंचनामा केला. जखमींना उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल करण्यात आले.

     

    उपस्थित वैधकिय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून हिरापूर येथील दोन रुग्णांना पुढील उपचाराकरिता नागपूर येथे रेफर करण्यात आले. व अकरा रुग्ण चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. पुढील कार्यवाही पोलिस निरीक्षक मनोज गभने यांचे मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक निलेश चवरे करीत आहेत.

  • चंद्रपुरात केंद्र सरकारविरोधात कांग्रेसचे निषेध आंदोलन

    चंद्रपुरात केंद्र सरकारविरोधात कांग्रेसचे निषेध आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : सभागृहात जनतेचे प्रश्न उपस्थित करणे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. तर, लोकप्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे सत्ताधारी पक्षाचे काम आहे. यासर्व बाबी संविधानात नमूद आहेत. मात्र, अधिवेशन काळात संसदेत घडलेल्या स्मोक हल्ल्याच्या घटनेवर निवेदनाची मागणी करणाऱ्या तब्बल १४२ खासदारांचे केंद्र सरकारने निलंबन केले आहे. यातून केंद्र सरकारने लोकशाहीची हत्या केली आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी (ता. २२) दुपारी ३.३०  वाजता गांधी चौकात केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.

    यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार सुभाषभाऊ धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, कामगार नेते प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांची उपस्थिती होती.

     

    भारतीय संसद ही देशाची सर्वोच्च संस्था आहे. हिवाळी अधिवेशन सुरू असताना संसद भवनाची सुरक्षा भेदून दोन तरुणांनी लोकसभेमध्ये स्मोक हल्ला केला. ही घटना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. त्यामुळे या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री यांनी केंद्र शासनाच्या भूमिकेबाबत स्पष्ट निवेदन करावे, अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांकडून करण्यात आली. या लोकप्रतिनिधींच्या प्रश्नींची उत्तरे देण्याऐवजी केंद्र सरकारने १४२ खासदारांचे निलंबन केले आहे. हा लोकशाहीवरील अभूतपूर्व हल्ला असल्याचे मत आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी व्यक्त केले.

     

    केंद्रातील भाजप सरकार धक्कादायकपणे विरोधी पक्षाच्या १४२ खासदारांना संसदेच्या दोन्ही सभागृहातून बाहेर काढते, ही एक प्रकारे लोकशाही तत्वांची हत्या आहे. लोकशाहीला स्मशान बनविण्याचे काम भाजपकडून सातत्याने होत असल्याचा आरोप आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केला. केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारने संविधानातील नियमांना पायदळी तुडविण्याचे काम सुरू केले आहे. खासदारांचे निलंबन करून हुकुमशाही वृत्तीची प्रचिती देशाला दाखवून दिली आहे. त्यामुळे लोकशाहीच्या या अपमानाच्या विरोधात आपण आता पहिल्यापेक्षा जास्त ताकदीने एकत्रितपणे उभे राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले.

     

    प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनीसुद्धा केंद्र सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली. आंदोलनात कामगार नेते के. के. सिंग, विनोद दत्तात्रेय, गोपाल अमृतकर, अरुण भेलके, नंदू नागरकर, संतोष लहामगे, संगीता अमृतकर, अश्विनी खोब्रागडे, रमिज शेख, कुणाल चहारे, प्रशांत भारती, सुनीता अग्रवाल, विना खनके, सकिना अन्सारी, उमाकांत धांडे, भालचंद्र दानव, राहुल चौधरी, हर्षित रामटेके, युसूफ भाई, पप्पू सिद्दीकी, दुर्गेश कोडाम, गोस खान, प्रमोद बोरीकर, मुन्ना तावाडे, नरेंद्र डोंगरे, प्राचार्य नरेंद्र बोबडे, प्रशांत दानव, नौशाद शेख, पितांबर कश्यप, दुर्गेश कोडाम यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

  • घोडाझरी तलावात बुडून मृत्युमुखी पडलेल्या चार युवकांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

    घोडाझरी तलावात बुडून मृत्युमुखी पडलेल्या चार युवकांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

    News34 chandrapur

    चंद्रपूर : घोडाझरी तलावात बुडून वरोरा तालुक्यातील चार युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हि घटना अतिशय वेदनादायी असून या कुटुंबियांना विशेष बाब तत्वावर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत करण्याची लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देत त्वरित निधी देण्याचे आदेश दिले. आज आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याहस्ते मृतकाच्या कुटुंबियांना धनादेश दिले.

     

    वरोरा तालुक्यातील शेगाव येथील जहागिर गजानन झाडे, वय-27 वर्ष , मनिष भारत श्रीरामे, वय-32 वर्ष, चेतन भिमराव मांदाडे, वय- 21 वर्ष, संकेत प्रशांत मोडक, वय-25 वर्ष मौजा- गिरोला असे मृत युवकांची नावे आहेत.

     

    वरोरा तालुक्यातील शेगांव येथील 04 युवकांचा ब्रम्हपुरी तालुक्यातील घोडाझरी तलावात बुडून दु:खद मृत्यु झालेला होता. सदर प्रकरणात आर्थिक मदत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी वरोरा कृ ऊ बा माजी सभापती राजेंद्र चिकटे, वरोरा पं स. माजी उपसभापती विजय आत्राम, नायब तहसीलदार काळे, मंडळ अधिकारी अजय निखाडे, महादेव कोटकर, चंदूभाऊ जयस्वाल, संजय कोटकर, गोलू वाढई, ग्राप सदस्य शेगांव दिवाकर मेश्राम, प्रभाकर घोडमारे व शेगांव ग्रामस्त उपस्थित होते.

  • घुग्घुस येथे हायवा ट्रक ला भीषण आग

    घुग्घुस येथे हायवा ट्रक ला भीषण आग

    News34 chandrapur

    चंद्रपूर/घुग्घुस – घुग्घुस येथे कोळसा भरून येत असलेल्या ट्रक ला 21 डिसेंम्बरला रात्री 12 वाजे दरम्यान भीषण आग लागली, या आगीत हायवा ट्रक चे मोठे नुकसान झाले आहे.

     

    HRG ट्रान्सपोर्ट कंपनीचा हायवा ट्रक क्रमांक MH34 BZ0588 हा वेकोली वणी क्षेत्राच्या कोलगाव कोळसा खाणीतून कोळसा भरून घुग्घुस कडे येत होता, मात्र बैरम बाबा मंदिर परिसराजवळ ट्रक पोहचताच शॉर्ट सर्किट झाला आणि ट्रक ला भीषण आग लागली.

     

    सुदैवाने वाहन चालक वेळीच बाहेर निघाल्याने जीवितहानी टळली, घुग्घुस पोलिसांना याबाबत माहिती त्यांनी अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले मात्र आगीत ट्रक चे मोठे नुकसान झाले.