Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • special train for Mahaparinirvan Diwas । महापरिनिर्वाण दिनानिमित्त बौद्ध अनुयायांसाठी विशेष सुविधा द्या – खासदार धानोरकर

    special train for Mahaparinirvan Diwas : चंद्रपूर 4 डिसेंबर (News३४): भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (६ डिसेंबर) चैत्यभूमी (मुंबई) आणि दीक्षाभूमी (नागपूर) येथे अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या लाखो बौद्ध अनुयायांच्या सोयीसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

    खंडणी : वाळू घाट बंद पाडतो, खंडणीचा गुन्हा दाखल

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून समृद्धी महामार्गावर (मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग) टोलमधून संपूर्ण सवलत देण्याची मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, महापरिनिर्वाण दिनी लाखो अनुयायी खासगी वाहनांनी प्रवास करतात. त्यांच्यावरील आर्थिक ताण कमी व्हावा, तसेच त्यांना वेळेवर आणि सुलभपणे पोहोचता यावे, यासाठी बौद्ध अनुयायांची वाहने टोलमुक्त करावीत. महाराष्ट्राकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्याचा हा मोठा सन्मान ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे. special train for Mahaparinirvan Diwas

    दरम्यान, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनाही पत्र पाठवून बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावरून मुंबईसाठी विशेष रेल्वेगाडी चालवण्याची मागणी करण्यात आली आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने अनुयायी मुंबईला जातात. नियमित गाड्यांमध्ये होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन, अनुयायांच्या सोयीसाठी ०५ डिसेंबर रोजी बल्लारपूरहून मुंबईसाठी (अप) आणि ०७ डिसेंबर रोजी मुंबईहून बल्लारपूरसाठी (डाऊन) अशी एक विशेष रेल्वेगाडी त्वरित चालवावी, अशी विनंती रेल्वेमंत्र्यांना करण्यात आली आहे.

  • Pt Deendayal Upadhyay cancer hospital । चंद्रपुरातील कॅन्सर हॉस्पिटलचे नामकरण

    Pt Deendayal Upadhyay cancer hospital : चंद्रपूर, दि.०३ – चंद्रपूर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक ठरणाऱ्या २८० कोटी रुपयांच्या अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालयाला ‘पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर रुग्णालय’ असे नाव देण्यास मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. आज विधानभवनातील मुख्यमंत्री कार्यालयात राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या रुग्णालयाला पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्याची आग्रही मागणी केली. या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तत्काळ संमती दर्शवली असून आता हे रुग्णालय अधिकृतपणे ‘पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर रुग्णालय’ या नावाने ओळखले जाणार आहे.

    २८० कोटींचा प्रकल्प

    चंद्रपूर जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांना नवे परिमाण देणारा २८० कोटींचा १४० खाटांचा कॅन्सर रुग्णालय प्रकल्प लवकरच जनसेवेसाठी उपलब्ध होणार आहे. टाटा ट्रस्ट यांच्या विशेष सहकार्यातून सहकार्यातून उभारलेले हे अत्याधुनिक रुग्णालय पूर्वविदर्भातील आदिवासी, ग्रामीण आणि सर्वसामान्य लोकांसाठी जीवदानाचा नवा आशादायी केंद्रबिंदू ठरणार आहे.

    पैश्याचा बाजार : नगरपरिषद निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा घोडेबाजार

    अर्थमंत्री, वनमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री आणि पालकमंत्री म्हणून कार्यरत असताना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टी, सततच्या प्रयत्न आणि विकासाभिमुख कार्यपद्धतीतून साकारलेला हा सर्वात मोठा आरोग्य प्रकल्प पूर्वविदर्भासाठी ‘नवजीवनाचा आशादायी प्रकाश’ देणारा ठरणार आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी २०१४ पासून या प्रकल्पासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. २०१८ मध्ये शासन निर्णयानंतर उभारणीला गती मिळाली आणि आज हे केंद्र पूर्णत्वास आले आहे. येत्या २२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मा.मोहनजी भागवत व राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार असून पूर्व विदर्भासाठी हे रुग्णालय महत्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे.

    रुग्णालयाची वैशिष्ट्ये
    तळमजला + ४ मजले : १,००,०००+ चौ. फूट बांधकाम,१४० बेडचे अत्याधुनिक कॅन्सर उपचार केंद्र,Linear Accelerators (२), ब्रेकीथेरपी, मॅमोग्राफी, 3D/4D अल्ट्रासाऊंड, डिजिटल एक्स-रे,केमोथेरपी, सर्जिकल ऑन्कोलॉजी, प्रगत प्रयोगशाळा अत्याधुनिक सुविधा या रुग्णालयात उपलब्ध आहे.

  • Chandrapur polling percentage | चंद्रपूर नगरपरिषद निवडणूक; निवडणुकीत पैसे वाटप ईव्हीएम फोडली

    Chandrapur polling percentage : चंद्रपूर ३ डिसेंबर (News३४) – ९ नगरपालिका व १ नगरपंचायतीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान पार पडले, २१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने लोकशाहीच्या उत्सवाची ऐशीतैशी केल्याचे चित्र दिसून आले. गडचांदूर, राजुरा अश्या अनेक भागात खुलेआम सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप करण्यात आले, त्याचे व्हिडीओ समाजमाध्यमात चांगलेच व्हायरल झाले मात्र प्रशासनाने अद्याप त्यांच्यावर कारवाई केली नाही.

    गोंधळ : गडचांदूरात मतदाराने फोडली ईव्हीएम मशीन

    चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, चिमूर, गडचांदूर, मूल, नागभीड, राजुरा, वरोरा नगरपरिषद व भिसी नगरपंचायत साठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले. घुग्गुस नगरपरिषदेची निवडणूक २० डिसेंबर तर मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे.

    कुठे किती मतदान?

    नगरपरिषद निवडणुकीसाठी एकूण ३ लक्ष ३९ हजार ४९ मतदार लोकशाहीच्या उत्सवात मतदानाचा हक्क बजावणार होते मात्र यापैकी २ लक्ष १३ हजार ४९१ मतदारांनी मतदान केले, जिल्ह्यातील एकूण मतदानाची टक्केवारी ६२.९७ टक्के होती.सर्वात कमी मतदानाची टक्केवारी बल्लारपूर ५५.३१ टक्के तर गडचांदूर नगरपरिषदेची ५९.५० टक्के तर सर्वात जास्त मतदानाची टक्केवारी भिसी नगरपंचायतीसाठी झाले. Chandrapur polling percentage

    • बल्लारपूर नगरपरिषद – ५५.३१ टक्के एकूण मतदार ८३ हजार ८२१, मतदान ४६ हजार ३६०
    • भद्रावती – ६०.५६ टक्के एकूण मतदार ५२ हजार ५७२, एकूण मतदान ३१ हजार ८३६
    • ब्रह्मपुरी – ६७.९० टक्के, एकूण मतदार ३३ हजार ७७९, एकूण मतदान – २२ हजार ९३६
    • चिमूर – ७२.१२ टक्के, एकूण मतदार – २२ हजार ५५७ तर मतदान १६ हजार २६७
    • गडचांदूर – ५९.५० टक्के, एकूण मतदार २४ हजार ४५७ तर एकूण मतदान १४ हजार ५५२
    • मूल – ६८.०८ टक्के एकूण मतदार २१ हजार ७४५, एकूण मतदान – १४ हजार ८०३
    • नागभीड – ७८.५३ टक्के, एकूण मतदार – २० हजार ९९२ तर एकूण मतदान १६ हजार ४८५
    • राजुरा – ६१.८० टक्के, एकूण मतदार – २६ हजार ८५५ तर एकूण मतदान – १६ हजार ५९७
    • वरोरा – ६०.७१ टक्के, एकूण मतदार – ४३ हजार ३२९ तर प्रत्यक्षात मतदान – २६ हजार ३०६
    • भिसी नगरपंचायत – ८२.१९ टक्के, एकूण मतदार – ८ हजार ९४२, प्रत्यक्षात मतदान – ७ हजार ३४९

    वोट चोरीचा ठप्पा लागलेल्या राजुरा विधानसभेत मतदानात मोठा गोंधळ उडाला, गडचांदूर शहरात नगारा वर ईव्हीएम बटन दाबल्यावर कमळ चिन्हाचा लाईट लागला म्हणून मतदाराने थेट ईव्हीएम मशीन फोडून टाकली, यानंतर मतदान केंद्रावर चांगलाच गोंधळ उडाला होता. भाजप पदाधिकारी तर थेट रस्त्यावर खुलेआम पैसे वाटताना दिसले. भाजप शिस्तप्रिय पक्ष आहे असे जनतेला सांगायचे आणि स्वतः लोकशाहीची चेष्टा करायचं हे काम सत्ताधारी भाजपने चालविले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीत सत्ताधारी भाजपने लोकशाहीची चेष्टा करून टाकली असे चित्र २ डिसेंबर रोजी सर्व जनतेने बघितले.

  • india post electric vehicle initiative । इंडिया पोस्ट मधील पोस्टमॅनला मिळणार इलेक्ट्रिक दुचाकी

    india post electric vehicle initiative : मुंबई ३ डिसेंबर (News३४) : मुंबईतील नागरिकांना शेवटच्या टप्प्यातील वितरण सेवा अधिक कार्यक्षम, आधुनिक आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी इंडिया पोस्ट, मुंबई विभागाने एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. पार्सलच्या संख्येत झालेली वाढ आणि वितरणाची उत्पादकता वाढवण्याची गरज लक्षात घेऊन, इंडिया पोस्टने पारंपरिक पायी वितरणाऐवजी ‘स्मार्ट मोबिलिटी’चा नवा पर्याय स्वीकारला आहे.

    ई-वाहनाद्वारे होणार जलद वितरण

    इंडिया पोस्ट, मुंबई विभागाने ‘स्मार्ट मोबिलिटी इनिशिएटिव्ह’ अंतर्गत, टीव्हीएस व्हेईकल मोबिलिटी सोल्युशन्स (TVS VMS) च्या सहकार्याने टपाल वितरकांसाठी (पोस्टमन/पोस्टवूमन) इलेक्ट्रिक दुचाकींची संपूर्ण सेवा प्रणाली सुरू केली आहे.

    निवडणूक : चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूरात मतदाराने फोडली ईव्हीएम

    • वितरण केंद्रे: मुंबई जीपीओ, सायन, दादर, काळबादेवी आणि चाकाला यांसारख्या नव्याने स्थापन केलेल्या स्वतंत्र वितरण केंद्रांवर टपाल वितरकांना टीव्हीएसच्या इलेक्ट्रिक गाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
    • सेवा: या वाहनांच्या माध्यमातून नियमित मेल, अकाऊंट्स मेल (नोंदणीकृत/स्पीड पोस्ट) आणि पार्सलसह सर्व प्रकारच्या टपाल सेवांचे वितरण केले जाईल.

    पर्यावरणपूरक आणि किफायतशीर उपक्रम

    या उपक्रमांतर्गत, एकूण २११ इलेक्ट्रिक दुचाकी तैनात करण्यात आल्या आहेत. या गाड्यांचे सुरळीत, पर्यावरणपूरक आणि किफायतशीर संचालन सुनिश्चित करण्यासाठी टपाल कार्यालयांमध्ये समर्पित चार्जिंग स्टेशन्स (Charging Stations) देखील बसविण्यात आले आहेत.

    ४ डिसेंबर रोजी शुभारंभ

    हा पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) ४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता चाकाला एमआयडीसी पोस्ट ऑफिस येथून सुरू केला जाईल. याप्रसंगी महाराष्ट्र आणि गोवा सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल श्री. अमिताभ सिंग, इंडिया पोस्ट, मुंबई विभागाच्या टपाल सेवा संचालिका श्रीमती काया अरोरा आणि टीव्हीएस व्हेईकल मोबिलिटी सोल्युशन्सचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

  • Armed Forces Flag Day Fund । ध्वजदिन निमित्त चंद्रपूरमध्ये शहीदांच्या कुटुंबांचा सन्मान; ९ डिसेंबरला विशेष कार्यक्रम

    Armed Forces Flag Day Fund : चंद्रपूर २ डिसेंबर (News३४): देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या आणि सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या सशस्त्र दलातील जवानांच्या सन्मानार्थ दरवर्षी ७ डिसेंबर हा दिवस संपूर्ण देशभरात ‘सशस्त्र सेना ध्वजदिन निधी‘ (Armed Forces Flag Day Fund) म्हणून पाळला जातो. या निधी संकलनाचा शुभारंभ चंद्रपूर जिल्ह्यात ९ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते होणार आहे.

    या कार्यक्रमाच्या निमित्ताने ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन येथे भव्य सैनिक मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

    निवडणूक गोंधळ : गडचांदूरात मतदाराने फोडली ईव्हीएम मशीन

    हा कार्यक्रम विशेषतः शौर्य आणि सेवेचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे, ज्यात पुढीलप्रमाणे सत्कार होणार आहेत:

    • उत्कृष्ट निधी संकलन: ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू, स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
    • वीरांचा सन्मान: देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद सैनिकांच्या वीर पत्नी, वीर माता-पिता यांचा तसेच शौर्य चक्र प्राप्त सैनिकांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित गौरव केला जाईल.
    • माजी सैनिकांच्या पाल्यांना मदत: माजी सैनिकांच्या पाल्यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करून शैक्षणिक व इतर मदतीचा हात दिला जाणार आहे.

    जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक बांधवांना शौर्याचा हा सोहळा आणि मदतकार्याचा शुभारंभ कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.

  • Chandrapur farmers relief fund update । लोकसभेत दमदार मांडणीचा परिणाम! चंद्रपूर जिल्ह्याला 93.76 कोटींचा आर्थिक आधार

    Chandrapur farmers relief fund update : चंद्रपूर २ डिसेंबर (News३४) : जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आणि भरीव आर्थिक मदत मिळावी यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी  केंद्र आणि राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. याच प्रयत्नांचा भाग म्हणून, हिवाळी अधिवेशनात लोकसभेत (तारांकित प्रश्न क्र. ३३) त्यांनी हा गंभीर मुद्दा अत्यंत प्रभावीपणे मांडला. त्यांच्या या निर्णायक ‘आवाजा’ला मोठे यश मिळाले असून, केंद्र सरकारने दिलेल्या लेखी उत्तरात चंद्रपूर जिल्ह्यासाठी तब्बल ९३.७६ कोटी रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली आहे.

    प्रशिक्षण : बांबू प्रशिक्षण केंद्र व नागपूर विद्यापीठात महत्वाचा करार

    या महत्त्वपूर्ण मागणीमुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या हजारो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सरकारला अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न विचारून मदतीचा तपशील मागितला होता. त्यांनी विशेषत्वाने सोयाबीन व्यतिरिक्त इतर पिकांचे झालेले गंभीर नुकसान, यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची नेमकी संख्या आणि त्यांना पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून लवकरात लवकर पुरेसे आर्थिक साहाय्य उपलब्ध करण्यासाठी सरकारने उचललेली पाऊले यावर जोर दिला. Chandrapur farmers relief fund update

    खासदार धानोरकर यांच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्र्यांचे उत्तर

    याव्यतिरिक्त, पंचनामा करताना मृदा अपरदन आणि संपूर्ण पीक हानी यांसारख्या घटकांचा समावेश केला जात नसल्याच्या तक्रारींकडेही त्यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते.खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रश्नांना लेखी उत्तर देताना केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने चंद्रपूर जिल्ह्यासाठीची मदत स्पष्ट केली आहे. यात अतिवृष्टीमुळे बाधित सर्व पिकांसाठी जिल्ह्याला ९,३७६.५६ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, रब्बी पिकांसाठी सर्व बाधित शेतकऱ्यांकरिता ११,०३०.९४ लाख रुपयांची अतिरिक्त विशेष सहायता देखील जारी करण्यात आली आहे.

    केंद्राच्या हिश्श्याचे १५६६.४० कोटी रुपये राज्याला वर्ग

    मदत वितरणाच्या सद्यस्थितीबद्दल सांगायचे झाल्यास, २४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ‘ई-पंचनामा पेमेंट वितरण पोर्टल’च्या माध्यमातून १,१३,४५५ बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ८२,३७,५०,०४८ रुपयांची रक्कम  हस्तांतरित झाली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित दिलासा मिळाला आहे.आपत्ती व्यवस्थापनाची प्राथमिक जबाबदारी राज्य सरकारांची असली तरी, केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत आवश्यक ती मदत पुरवली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२०२६ साठी मंजूर झालेल्या निधीपैकी केंद्राच्या हिश्श्याचे १५६६.४० कोटी रुपये राज्याला वर्ग करण्यात आले आहेत.

    पूरस्थितीच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आंतर-मंत्रालयी केंद्रीय पथकाने ३ ते ५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत बाधित क्षेत्रांचा दौरा केला होता. पंचनामा प्रणालीबाबतच्या तक्रारींवर, महाराष्ट्र सरकारने अशी कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे केंद्राला कळवले आहे. एकंदरीत, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शेतकऱ्यांची बाजू लावून धरल्यामुळेच चंद्रपूरच्या शेतकऱ्यांना हा महत्त्वपूर्ण आणि त्वरित आर्थिक लाभ मिळाला आहे.  

  • Chandrapur Election Live Update । चंद्रपूर निवडणूक LIVE: सकाळपासून मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद पण…

    Chandrapur Election Live Update : चंद्रपूर २ डिसेंबर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यातील ९ नगरपालिका व एक नगरपंचायतीची सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली, सकाळपासूनच मतदार आपल्या केंद्रावर पोहोचत लोकशाही साठी मतदान करीत होते, यादरम्यान मतदारांना पैसे वाटप करण्याचे व्हिडिओ सुद्धा समोर आले आहे. जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये ब्रह्मपुरी, भद्रावती, नागभीड, चिमूर, राजुरा, बल्लारपूर, गडचांदूर, वरोरा मूल व भिसी नगरपंचायतीकरिता मतदान होत आहे.

    कारवाई : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३६३ जणांवर हद्दपारीची कारवाई

    नगराध्यक्ष पदासाठी एकूण जिल्ह्यात ६५ उमेदवार तर सदस्य पदासाठी १ हजार ८९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. घुग्गुस नगरपरिषदेची निवडणूक सह गडचांदूर, मूल, बल्लारपूर व वरोरा मधील काही प्रभागाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. २० डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. त्यासोबतच ३ डिसेंबर रोजी मतदानाचा निकाल सुद्धा हायकोर्टाच्या निकालाने पुढे ढकलण्यात आला असून आता जिल्ह्यातील सर्वत्र नगरपरिषद व नगरपंचायत चा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. Chandrapur Election Live Update

    १० नगराध्यक्ष व २२६ सदस्य निवडून द्यायचे आहे

    सकाळी मतदान सुरु झाल्यावर खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार सुभाष धोटे यांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात एकूण ३८९ मतदान केंद्रावर ३ लक्ष ३९ हजार ४९ नागरिक लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होणार असून १२२ प्रभागातील २२६ सदस्य व १० नगराध्यक्ष निवडून देणार आहे.

    सकाळ पासून सुरु झालेल्या मतदानाची सुरुवात संथ गतीने सुरु झाली होती, दुपारी १.३० वाजता जिल्ह्यात २५.५७ टक्के मतदान झाले होते तर सर्वात कमी मतदान 16.43 टक्के गडचांदूर शहरात झाले.

  • BRTC Nagpur University MoU । चिचपल्ली बीआरटीसी आणि नागपूर विद्यापीठात ऐतिहासिक सामंजस्य करार

    BRTC Nagpur University MoU : चंद्रपूर, दि. 01 डिसेंबर (News३४) : बांबू क्षेत्रातील शैक्षणिक उन्नती, संशोधन, कौशल्यविकास आणि उद्योजकता वाढीसाठी चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बीआरटीसी) आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार विद्यापीठाच्या कुलगुरू माधवी खोडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

    शिक्षण व्यवस्था : प्रतिभा धानोरकरांच्या प्रश्नामुळे उजेडात आले शालेय शिक्षणाचे गंभीर मुद्दे

    या करारामुळे बांबू तंत्रज्ञान, बांबू हस्तकला, बांबू फर्निचर डिझाईन, बांबू बांधकाम,  वन आधारित वास्तुकला व शाश्वत बांधकाम पद्धती आणि निसर्ग निर्वाचन यांसारख्या विषयांवर संयुक्त कार्यशाळा, सेमिनार, प्रशिक्षण शिबिरे आणि क्षेत्रीय भेटी आयोजित करण्यास दोन्ही संस्था एकत्र काम करतील. यामुळे विद्यार्थी–प्राध्यापक  विनिमय कार्यक्रम, तज्ज्ञ व्याख्याने आणि संशोधन क्षमतावृद्धीसाठी तांत्रिक देवाणघेवाण यांनाही गती मिळणार आहे. विद्यापीठाच्या  विद्यार्थ्यांसाठी बीआरटीसीमध्ये प्रत्यक्ष अनुभवाधारित इंटर्नशिप उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

    रिअल-टाइम प्रोजेक्ट्स, फील्ड असाइनमेंट्स आणि पर्यावरणपूरक विकास उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बांबू तंत्रज्ञानातील व्यावहारिक ज्ञान मिळणार आहे. अभ्यासक्रम निर्मिती, शैक्षणिक पाठबळ, प्रमाणन आणि बांबू तंत्रज्ञानावर केंद्रित संशोधन व डॉक्युमेंटेशनलाही विद्यापीठाकडून प्रोत्साहन दिले जाणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 शी सुसंगत अशा कौशल्याधारित अल्पमुदतीच्या क्रेडिट अभ्यासक्रमांची अंमलबजावणी बीआरटीसीतर्फे करण्यात येणार असून हे अभ्यासक्रम विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांमध्ये Choice-Based Credit System (CBCS) अंतर्गत उपलब्ध करून देण्याची तयारी आहे. बांबू प्रक्रियाकरण, हस्तकला, तंत्रज्ञान आणि उद्योजकता यामध्ये युवक, कारागीर आणि स्थानिक उद्योजकांना दिशा देणारे उपक्रम राबवणे हेही कराराचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. BRTC Nagpur University MoU

    यावेळी विद्यापीठाच्या कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे (चवरे), कुलसचिव डॉ. राजू हिवसे, बीआरटीसीचे संचालक मनोज कुमार खैरनार, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. उमेश पलीकुंडवार, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. राजश्री वैष्णव, आयआयएलचे संचालक डॉ. प्रकाश ईटणकर, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग संचालक डॉ. समित माहोरे, डॉ. निशिकांत राऊत, रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन, एलईडी महिला महाविद्यालयातील डॉ. सारिका दगडकर, वनपरिक्षेत्र अधिकारी ए. डी. मल्लेलवार तसेच हस्तकला निर्देशक किशोर गायकवाड यांची उपस्थिती होती.

    ५ वर्षाचा करार कालावधी

    या कराराचा कालावधी पाच वर्षांचा असून हा करार बांबू आधारित शाश्वत उपजीविका, रोजगारनिर्मिती, ग्रामीण विकास आणि हरित उद्योजकतेच्या दिशेने एक मोलाचे पाऊल मानला जात आहे. विशेषतः  विदर्भासारख्या बांबू समृद्ध भागास याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. बीआरटीसीच्या तांत्रिक अनुभवास विद्यापीठाच्या शैक्षणिक सामर्थ्याची जोड मिळाल्याने महाराष्ट्रातील बांबू क्षेत्रासाठी एक मजबूत, दीर्घकालीन आणि परिणामकारक सहकार्य मॉडेल उभे राहणार आहे. या करारामुळे बीआरटीसी चिचपल्लीचे स्थान राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील बांबू उत्कृष्टता केंद्र म्हणून अधिक भक्कम होईल, असा विश्वास यावेळी केंद्राचे संचालक मनोज खैरनार यांनी व्यक्त केला.

  • Maharashtra single teacher schools । खासदार धानोरकरांचा प्रश्न आणि लोकसभेत उघडकीस आले शालेय शिक्षणाचे दुर्दैव

    Maharashtra single teacher schools : चंद्रपूर १ डिसेंबर (News३४) : महाराष्ट्रामधील शालेय शिक्षणाची विदारक स्थिती आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होत असलेला खेळ आज लोकसभेत उघड झाला. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शिक्षण मंत्रालयाला धारेवर धरत राज्यातील शिक्षणाच्या गंभीर प्रश्नांवर तातडीने लेखी उत्तर मागितले.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी थेट विचारणा केली की, महाराष्ट्रातील तब्बल ८,१८७ शाळा फक्त एकाच शिक्षकावर चालत आहेत हे सत्य आहे काय? तसेच, या शाळांमधील रिक्त पदांमुळे शिक्षण गुणवत्तेचा बळी जात असताना, शिक्षण मंत्रालयाकडे या रिक्त जागा भरण्यासाठी कोणती ठोस कालमर्यादा आहे? 

    घटना – रेल्वेच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू

    त्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे, विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर, पायदळी तुडवणाऱ्या शाळांवर सरकार कोणती कठोर कारवाई करणार आहे, असा जाब विचारला. विशेषतः, राज्यातील आदिवासी आणि दुर्गम भागांमध्ये एकाच शिक्षकांवर चालणाऱ्या शाळांमुळे विद्यार्थ्यांचे कसे नुकसान होत आहे, यावर सरकारने कोणते जिल्हावार सर्वेक्षण केले आहे, याचे तपशील देण्याची मागणी त्यांनी केली.

    गंभीर प्रश्न आणि विदारक स्थिती उघड

    या गंभीर प्रश्नांवर शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी समाधानकारक उत्तर देणे टाळले. मंत्रालयाने ‘शिक्षण हा समवर्ती सूचीतील विषय आहे’ असे सांगत शाळांचे नियमन आणि शिक्षकांच्या सेवाशर्ती राज्य सरकारांच्या अखत्यारीत असल्याचे स्पष्ट केले. Maharashtra single teacher schools

    रिक्त पदांबाबत बोलताना, सरकारने ‘शिक्षकांची भरती ही सेवानिवृत्ती आणि राजीनाम्यांमुळे सतत चालणारी प्रक्रिया आहे’ असे हात झटकणारे विधान केले. केंद्र सरकार फक्त राज्यांशी पाठपुरावा करत आहे आणि वेळोवेळी सूचना देत आहे.

    ‘समग्र शिक्षा’ योजनेंतर्गत केंद्र सरकार केवळ ‘एकत्रित निधी पुरवते, पण या निधीचा विनियोग राज्य सरकारांनी करायचा असतो, असे सांगून केंद्राने आपली जबाबदारी झटकल्याचे चित्र आहे.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नामुळे, महाराष्ट्रातील गरीब आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य, केवळ कागदी घोडे नाचवणाऱ्या सरकारी धोरणांमुळे अंधारात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ‘समवर्ती सूची’च्या नावाखाली राज्या-राज्यांमध्ये टोलवला जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

  • Rinku Rajguru in Chandrapur । सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू चंद्रपुरात

    Rinku Rajguru in Chandrapur : बल्लारपूर ३० नोव्हेम्बर २०२५ (News३४) – भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, स्टार प्रचारक, राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा बल्लारपूर मतदारसंघाचे लोकनेते आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या भव्य जाहीर सभांचे सोमवार, दि. १ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. मुल आणि बल्लारपूर येथे होणाऱ्या या सभांना ‘सैराट’फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिची उपस्थिती विशेष आकर्षण ठरणार आहे.

    राजकीय – भाजप उमेदवारासाठी कांग्रेस महिला शहर अध्यक्षाचा राजीनामा

    मूल येथे सायंकाळी ५ वाजता आणि बल्लारपूर येथे सायंकाळी ७ वाजता या जाहीर सभा होणार आहेत. मूल येथील गुजरी चौकात आणि बल्लारपूर येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या जवळ (गांधी चौक), अभिनेत्री रिंकू राजगुरू नागरिकांशी संवाद साधणार आहे. युवक, महिला आणि सर्व नागरिकांसाठी ही प्रेरणादायी भेट ठरणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

    रिंकू राजगुरू यांचा ‘आशा’ हा चित्रपट येत्या 9 डिसेंबरला प्रदर्शित होणार असून यामध्ये महिलांची झगडणारी दुनिया, त्यांचा आत्मविश्वास आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी अतिशय भावस्पर्शी पद्धतीने मांडली आहे. या कथानकाच्या केंद्रस्थानी असलेल्या आशा सेविकेची प्रमुख भूमिका रिंकू राजगुरू  हिने साकारली आहे. रिंकूने साकारलेली ‘आशा’ ही फक्त आरोग्य यंत्रणेतील एक कर्मचारी नसून प्रत्येक महिला व प्रत्येक कुटुंबासाठी मार्गदर्शक आवाज आहे. त्यादृष्टीने आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सभांमध्ये रिंकू राजगुरू हिची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरणार आहे.