Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • तो गुरांना घेऊन जंगलात गेला आणि वाघ समोर आला

    News34 chandrapur

    चिमूर – गुरांना जंगलात चराईसाठी घेऊन जाणाऱ्या गुराख्याला दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करीत ठार केल्याची घटना रविवारी 29 ऑक्टोबर ला घडली.

     

    चिमूर तालुक्यातील विहिरगाव येथे राहणारे 45 वर्षीय मधुकर धाडसे असे मृतकाचे नाव आहे.

    दुपारच्या सुमारास विहिरगाव येथील गुराखी व गुरेढोरे मालक यांनी 8 जणांचा समूह बनवीत गुरे चराईकरिता विहिरगाव वनविभागातील कम्पार्टमेंट क्रमांक 859 मध्ये गेले.

     

    त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने मधुकर वर हल्ला चढवीत त्याला ठार केले, सदरची माहिती वनविभागाला मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या चमूने मधुकर चा मृतदेह शवविच्छेदन करिता उपजिल्हा रुग्णालयात आणला, मृतक मधुकर हा विवाहित असून त्याला एक मुलगी आहे.

  • भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामन्यादरम्यान चंद्रपुरात कोट्यवधी रुपयांचा सट्टा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – IPL नंतर क्रिकेट च्या महासंग्राम वर्ल्ड कप भारतात सुरू झाले असून आज 29 व्या मॅच मध्ये भारत विरुद्ध इंग्लड चा सामना लखनौ येथे खेळल्या गेला, भारताने 50 षटकात 229 धावा बनविल्या, मात्र या मॅच दरम्यान चंद्रपुरात कोट्यवधी रुपयांचा सट्टा लागला असल्याची माहिती समोर आली आहे.

     

    वर्ल्ड कप 2023 च्या 29 व्या मॅच मध्ये आज भारत विरुद्ध इंग्लंड चा क्रिकेट सामना रंगला, या सामन्या दरम्यान चंद्रपुरातील नाहीसे झालेले सट्टेबाज पुन्हा परतले आहे, सामन्या दरम्यान कोट्यवधी रुपयांचा सट्टा लागला अशी माहिती मिळाली आहे.

     

    सध्या अंचलेश्वर गेट, महाकाली वॉर्ड, रघुवंशी कॉम्प्लेक्स, तुकुम, रामनगर, दादमहल, भिवापूर, जटपुरा गेट भागात सट्टे बाजानी आपले बस्तान मांडत सट्टे बाजीचा खेळ सुरू केला आहे, शहरातील विविध ठिकाणी 20 ते 50 मोबाईल ऍक्टिव्ह करीत सट्टेबाज आपलं नेटवर्क चालवीत आहे, या मध्ये अनेक राजकीय पदाधिकारी सुद्धा गुंतले आहे, सध्या सट्टा घेणारा व लावणारा हे आपसात व्हाट्सएपच्या माध्यमातून एकमेकांसोबत सम्पर्क साधत आहे.

  • चंद्रपूर मनपाच्या चांदा सिटी हेल्पलाईन वर तक्रारीचा डोंगर

    News34 chandrapur

    चंद्रपूर   – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मागील वर्षी करण्यात आलेल्या चांदा सिटी हेल्पलाईन ॲप तक्रार निवारण कार्यप्रणालीस उत्तम प्रतिसाद मिळाला असुन सदर ॲपवर आतापर्यंत विविध विषयांच्या ४१७२ तक्रारी प्राप्त झाल्या असुन यापैकी ४१५० तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.

     

    चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी पालिकेची सुत्रे हाती घेतल्यापासुन मनपाद्वारे देण्यात येणाऱ्या सेवा लोकभिमुख होण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. यापुर्वी नागरीकांच्या तक्रारी या पत्र स्वरूपात किंवा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातुन प्रशासनास प्राप्त व्हायच्या व त्याचे निराकरण व्हावयास ही वेळ लागायचा. मात्र प्रशासनाचे कामकाज गतिमान व्हावे या दृष्टीने आयुक्तांच्या संकल्पनेतुन २५ ऑक्टोबर रोजी चांदा सिटी हेल्पलाईन ॲपची सुरवात करण्यात आली होती.

     

    या कार्यप्रणालीनुसार इंटरनेटच्या गुगल प्ले स्टोअरमधून चांदा सिटी हेल्पलाईन हे ॲप डाउनलोड केल्यानंतर किंवा टोल फ्री क्रमांक १८००-१२३-७९८० येथे संपर्क करून व ८५३०००६०६३ या व्हॉट्स ॲप क्रमांकावर तक्रार करता येते. तक्रारीत संबंधित परिसर, विभाग, तक्रार पाठवणाऱ्याचे नाव, मोबाइल नंबर, पत्ता, तक्रारीचे स्वरूप लिहून पाठवावे लागते. याच तक्रारीत गरज भासल्यास संबंधित तक्रारीचा फोटोही अपलोड करता येतो. चांदा सिटी हेल्पलाईन ॲपचे नाव व संपर्क क्रमांकांची प्रसिद्धी एसएमएस,फोन कॉल, ऑटो मायकिंग, सोशल मीडिया व इतर प्रसिद्धीमाध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात करून ज्यास्तीत ज्यास्त नागरीकांपर्यंत हे क्रमांक पोचविण्यात आले आहे.
    या ॲपवर स्वच्छता,समाज कल्याण -दिव्यांग,महिला व बालकल्याण,रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, NULM, विद्युत व दिवाबत्ती, रेन वॉटर हार्वेस्टिंग, मोकाट जनावरे, बांधकाम,नगर रचना बिल्डींग परवाना, पाणी पुरवठा, कर, उद्यान, अवैध बांधकाम, अमृत योजना, अवैध होर्डिंग, अतिक्रमण, अग्निशमन व इतर नागरी सुविधांच्या दृष्टीने नागरीकांना तक्रार करता येते.तक्रार प्राप्त झाल्यानंतर ४८ तासांच्या आता निराकरण करण्याची जबाबदारी संबंधित विभागीय अधिकारी व संबंधित विभागप्रमुख यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

     

    अधिकारी स्तरावर तक्रार निश्चित दिवसात मार्गी लागली नाही तर हीच तक्रार पुढे टप्प्याटप्प्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वर्ग होते. तक्रारींचे निराकरण कितपत झाले किंवा पेंडंसी आहे का ? याचा आढावा आयुक्तांद्वारे नियमित घेतला जात असल्याने संबंधित तक्रारी त्वरेने निकाली काढल्या जात आहेत.मनपाद्वारे देण्यात येणाऱ्या नागरी सुविधांबाबत कुठलीही तक्रार असल्यास चांदा सिटी हेल्पलाईन ॲपचा वापर करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • नागरिकांनो महावितरणच्या इज ऑफ लिव्हिंग सेवेचा लाभ घेतला का?

    News34 chandrapur

    चंद्रपूर /जुनी सदनिका किंवा दुकान खरेदी करतानाच वीजजोडणी किंवा बिल देखील स्वतःच्या नावावर करून घेण्याची सोय खरेदीदारांना महावितरणकडून उपलब्ध झाली आहे. यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाची संगणक प्रणाली महावितरणशी जोडण्यात आली आहे. जुनी मालमत्ता खरेदीदारांनी दस्तनोंदणीपूर्वी ‘पब्लिक डेटा एन्ट्री’ करताना वीजबिलाच्या नावात बदल करण्याचा पर्याय निवडल्यास त्याबाबतची पुढील प्रक्रिया महावितरणकडून स्वयंचलित पद्धतीने करण्यात येत आहे.

     

    ‘इज ऑफ लिव्हिंग’ नुसार महावितरणकडून ग्राहकसेवा देण्याची सूचना उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यानुसार महावितरण आणि नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संयुक्त सहकार्यातून वीजबिलामध्ये नावात बदल करण्याची स्वयंचलित प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यापूर्वी जुने घर किंवा दुकानाची खरेदी केल्यानंतर वीजजोडणी किंवा बिलावरील नाव बदलण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे तसेच ओळखपत्र, इंडेक्स दोन व इतर कागदपत्रे अपलोड करण्याची स्वतंत्र प्रक्रिया करावी लागत होती. तथापि दस्तनोंदणीच्या वेळीच वीजबिल नावावर करून घेण्याची सोय उपलब्ध झाल्यामुळे वीजग्राहकांचा मोठा वेळ वाचणार आहे. आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत या तत्पर सेवेचा जुने घर किंवा दुकानाच्या खरेदीदारांनी लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

     

    नोंदणी व मुद्रांक विभागाने (आयजीआर) मालमत्तांची नोंदणी करण्यासाठी ‘पब्लिक डेटा एन्ट्री’ हे पोर्टल कार्यान्वित केले आहे. जुन्या घराची किंवा दुकानाच्या दस्तनोंदणीपूर्वी ‘पब्लिक डेटा एन्ट्री’ मध्ये माहिती भरताना वीजजोडणी किंवा बिलाच्या नावात बदल करण्याचा पर्याय निवडणे आवश्यक आहे. दस्तनोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संगणकीय प्रणालीद्वारे प्राप्त अर्जानुसार महावितरणकडून स्वयंचलित पद्धतीने वीजबिलावरील नाव बदलण्याची प्रक्रिया सुरु होईल. याबाबत ६० दिवसांच्या आत संबंधित मालमत्ता खरेदीदारास ‘एसएमएस’द्वारे कळविले जात आहे व प्रक्रिया शुल्क ऑनलाइन भरण्यासाठी वेबलिंक पाठविण्यात येत आहे. यासोबतच प्रक्रिया शुल्काचे इन्व्हाईस महावितरणच्या अधिकृत www.mahadiscom.in या संकेतस्थळावर व मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे.

     

    एकाच नावाने मालमत्तेची खरेदी झाली असल्यास अर्जदाराने कोणतेही दस्ताऐवज अपलोड करण्याची गरज नाही. तर एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे खरेदी असल्यास ज्या व्यक्तीच्या नावे वीजजोडणी करायची त्यासाठीची संमती व ना हरकत प्रमाणपत्र मागविण्यात येईल. याबाबत संबंधित नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर महावितरणकडून ‘एसएमएस’ द्वारे संदेश व वेबलिंक पाठविली जात आहे. तथापि, ‘एसएमएस’ पाठविल्यानंतर ६० दिवसांच्या आत प्रक्रिया शुल्काचा भरणा केला नाही किंवा आवश्यकतेनुसार ना हरकत प्रमाणपत्र वेबलिंकद्वारे अपलोड केले नाही तर नावात बदल करण्याची प्रक्रिया आपोआप रद्द होईल. त्यानंतर वीजजोडणीच्या नावात बदल करण्यासाठी ग्राहकांना सध्याच्या पद्धतीनुसार स्वतंत्रपणे कार्यवाही करावी लागेल.

     

    जागेच्या खरेदीपूर्वी थकबाकी तपासून घ्या- जागेच्या पूर्वीच्या मालकाने किंवा ताबेदाराने न भरलेल्या वीजबिलांची थकबाकी नंतरच्या नवीन मालक / ताबेदाराकडून वसूल करण्याचा अधिकार वीज वितरण कंपन्यांना असल्याचा निकाल मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्यामुळे जुने घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी वीजबिलाची थकबाकी तपासून घेणे आवश्यक आहे.

  • शिक्षण क्षेत्रातील शिक्षित नागरिकांचे अघोरी कृत्य

    News34 chandrapur

    चंद्रपूर – सत्ता प्राप्तीसाठी माणूस कुठल्याही स्तरावर जाऊ शकतो याचा प्रत्यय चंद्रपूर जिल्हात आला आहे.जिल्हातील राजुरा शहरातील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत बापूजी पाटील मामुलकर प्रतिष्ठानच्या निवडणूकीपुर्वी अघोरी प्रकार पुढे आला.

    आपल्यालाच सत्ता मिळावी,यासाठी संस्थेतील एका संचालकाने इत्तर संचालकांच्या घरी काळा धागा बांधला, हळद, कुंकू लावले.संशयास्पद वस्तू ठेवल्या.या वस्तू निदर्शनास येताच संचालक हादरले. सीसीटीव्हीमूळे हा प्रकार उघडकिस आला.या अघोरी प्रकाराची तक्रार राजुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.संचालक मेघा नलगे आणि त्यांचे तीन नातेवाईक यांच्या विरोधात ही तक्रार आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

     

    प्राप्त माहितीनुसार,जिल्हातील राजुरा शहरातील बापूजी पाटील मामुलकर प्रतिष्ठान या संस्थेतर्फे काही शाळा संचालित आहेत.या संस्थेमध्ये संचालक म्हणून अविनाश जाधव, एडवोकेट अरुण धोटे, सुमनताई मामुलकर, अरुण धोटे,डॉक्टर एस. एम. वारकड, बी. यु. बोर्डेवार ,सुदर्शन निमकर, मेघा नलगे, दत्तात्रय येगीनवार ,राजेंद्र जाधव हे सदस्य आहेत.संस्थेचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने सहाय्यक धर्मदाय आयुक्त चंद्रपूर यांच्या आदेशाने निवडणूक घेण्यात आली.

     

    सत्ता आपल्याकडे असावी यासाठी विरोधातील सहा संचालकांच्या घरात काळा धागा, हळद, कुंकू लावले काही संशयास्पद वस्तू ठेवल्यात. अविनाश जाधव, एडवोकेट अरुण धोटे ,डॉक्टर एस. एम. वारकड, बी. यु. बोर्डेवार ,दत्तात्रय येगिनवार यांच्या घरी या वस्तू आढळून आल्यात.हा प्रकार सीसीटीव्ही कैद झाला.हा प्रकार उघळकीस येताच एकच खळबळ उडाली.

     

    सत्ता प्राप्तीसाठी थेट जादुटोण्याचा आधार घेतल्याने या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे.या प्रकाराणे संचालकांचे कुटुंबिय भयभीत झाले आहेत.हा प्रकार उघडकीस येताच घरी व शेजारच्या सीसीटीव्ही फुटेज बघितल्या गेले.त्यात तिन महिला व एक पुरूष दिसून आला.

    असा घडला प्रकार…

    संचालक घरी नसतांना त्यांचा घरी तीन महिला, एक पुरुष गेलेत. कुटुंबियांना त्यांनी पाणी मागलेत.पाणी आणण्यासाठी ते गेले असता नेमके त्याच वेळी सोफ्याच्या आत काही वस्तू त्यांनी ठेवल्यात.दरम्यान या प्रकाराची तक्रार राजुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

     

    सीसीटीव्ही फुटेज, ऑडीओ रेकाॅर्डींग व सापडलेल्या वस्तू राजुरा पोलिस ठाण्यात जमा करण्यात आल्या आहेत.या प्रकाराची तक्रार प्राप्त झालेली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांनी दिली. सध्या या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आली नाही.

  • चंद्रपूर जिल्ह्यात उभे राहणार 52 नवीन तलाठी कार्यालय

    News34 chandrapur

    चंद्रपूर : ग्रामीण भागात नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच गावपातळीवरील प्रशासकीय कारभार उत्तम रितीने चालावा, यासाठी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष पुढाकारामुळे 52 नवीन तलाठी कार्यालयाची निर्मिती होणार आहे. त्यासाठी विशेष बाब म्हणून 18 कोटी 19 लक्ष 24 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. याबाबत महसूल व वनविभागाने 17 ऑक्टोबर 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.

     

    चंद्रपूर हा नक्षलग्रस्त आणि दुर्गम भाग असल्याने तेथील गावांमध्ये प्रशासकीय कामकाम उत्तमरित्या चालावे, गावातील नागरिकांना आवश्यक असलेले महत्वाचे दाखले, कृषीविषयक नोंदी / कागदपत्रे वेळेत मिळावेत, यासाठी नवीन तलाठी कार्यालयांची आवश्यकता होती. याबाबत प्रशासनाकडून सुरवातीला 7 कोटी 80 लक्ष रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र कर्मचा-यांच्या निवासस्थानासह तलाठी कार्यालयाची निर्मिती करण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला सुचना केल्या. त्यानुसार विशेष बाब म्हणून 18 कोटी 19 लक्ष 24 हजार रुपयांचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात आला. राज्य शासनाने या प्रस्तावाला नुकतीच मंजूरी दिली असून नवीन तलाठी कार्यालय व कर्मचा-यांच्या निवासस्थानाचा मार्ग मोकळा झाला आहे. यात पोंभुर्णा तालुक्यात 11, चंद्रपूर तालुक्यात 6, बल्लारपूर तालुक्यात 7 आणि मुल तालुक्यात 28 असे एकूण 52 नवीन तलाठी कार्यालये उभारण्यात येणार आहे.

     

    गावपातळीवरील राज्य शासनाचा महत्वाचा घटक म्हणून तलाठ्यांकडे अनेक प्रशासकीय कामे सोपविण्यात आली आहेत. यात गावपातळीवरील 21 गाव नमुने तयार करणे, ते अद्ययावत करणे, वारसान नोंदी घेणे, खरेदी-विक्री व्यवहारानुसार सातबारावर फेरफार नोंदी घेणे, नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसानीचे पंचनामे करणे, नागरिकांना नुकसान भरपाईबाबत प्रक्रिया राबविणे, त्याचा अहवाल शासनाकडे सादर करणे, रहिवासी व उत्पनाचा दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्र नागरिकांना उपलब्ध करून देणे, गावाची पैसेवारी निश्चित करणे, पीक कापणी प्रयोग, ई-पीक पाहणी आदी महत्वाच्या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, कृषी गणना करणे, सातबारा वाटप करणे, ऑनलाईन सातबारा नागरिकांना उपलब्ध करून देणे आदी महत्वाच्या कामामुळेच तलाठी हा गावपातळीवरील प्रशासनाचा मुख्य कणा मानला जातो.

     

    या ठिकाणी होणार नवीन तलाठी कार्यालये

    पोंभुर्णा तालुक्यातील वेळवामाल, चेकबल्लारपूर, डोंगरहळदी, उमरी पोतदार, घोसरी, देवाडा (बुर्ज), देवाडा (खुर्द), नवेगाव मोरे, जाम तुकुम, फुटाना मोकासा आणि चेक ठाणेवासना. चंद्रपूर तालुक्यातील अजयपूर, पिंपळखुट, जुनोना, पद्मापूर, बोर्डा, दुर्गापूर चांदा रयतवारी. बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव, मानोरा, कवडजाई, कळमना, विसापूर, कोठारी, बामणी, मूल तालुक्यातील मरेगाव, भादुर्णी, उश्राळाचक, केळझर, राजगड, पिपिरी दीक्षित, भेजगाव, चिंचाळा, सुशी दाबगाव, ताडाळा, नांदगाव, मूल, राजोली, नवेगाव, कोसंबी, कांतापेठ (रै), चिरोली, गडीसुर्ला, बोंडाळा (भुज), मारोडा, चिखली माल, चिमढा, हळदी गावगन्ना, बोरचांदली, सिंताळा, जुनासुर्ला, बेलघाटा माल आणि डोंगरगाव येथे नवीन तलाठी कार्यालय निर्माण होणार आहे.

  • व्हिडीओ टाकून कुणी असं येत का ? देवेंद्र फडणवीस

    News34 chandrapur

    मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपला कार्यकाळ पूर्ण करतील, आगामी निवडणूका त्यांच्या नेतृत्वाखाली होणार, मी पुन्हा येईन, एखादा व्हिडीओ असा टाकला तर कुणी व्हिडीओ टाकून असं येत का अशी स्पष्ट प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

     

    राज्याच्या विकासाकरिता आम्ही सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहो, ते आपला कार्यकाळ पूर्ण करणार अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांना दिली.

     

    ट्वीटर आलेल्या त्या व्हिडीओ बाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की एखाद्याला यायचं असेल तर ते व्हिडीओ टाकून येतात काय? एखाद्या व्हिडिओचा असा वेगळा अर्थ लावणे हा वेडेपणा आहे.

  • चंद्रपुरात वाढते अपघात, प्रशासन “टक्केवारीत” खुश

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जिल्ह्यात मागील काही दिवसात अपघाताच्या घटना वाढल्या आहे, विशेषतः चंद्रपूर शहरात सातत्याने अपघात होत आहे, यामध्ये निष्पाप जीवांचे बळी जात आहे. मात्र प्रशासन कोणतेही उपाययोजना करताना दिसत नाही, उलट मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अपघाताची टक्केवारी घटल्याचे सांगून आरटीओसह संबधीत प्रशासन स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानत आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी शहरातील अतिक्रमण काढण्यास अन्य उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे.

     

    चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो, औद्योगिकीकरण असल्याने जिल्ह्यात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, वाहनांची संख्या जास्त असल्याने अपघातांचे प्रमाण ही जास्तच आहे, मागील काही दिवसांपासून महामार्गावर नव्हे तर शहरात अपघाताची मालिका सुरू झाली आहे, मागील आठवड्यात आठ वर्षीय बालकासह अपघातात 7 जणांना आपला जीव गमावला लागला, त्यापूर्वी एका शिक्षीकेसह अन्य नागरिकांना बळी गेला आहे. ही चिंताजनक बाब आहे, मात्र यावर आजही प्रशासनाने नियंत्रण आणलेले नाही. विशेष म्हणजे 27 ऑक्टोबर ला शहरातील रहमतनगर येथे सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला, त्या मुलाचा अपघात पोलिसांच्या वाहनामुळेच झाला.

     

    अपघाताबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच रस्ता सुरक्षा समितीची बैठक झाली, त्यामध्ये जानेवारी ते ऑगस्ट वर्ष 2023 या कालावधीत 534 अपघातांची नोंद झाली असून 233 जणांनी अपघातात आपला जीव गमावन्याचे शासन दरबार नोंद आहे.

    या अपघातात दुचाकी अपघातांची संख्या 275 असून यामध्ये 129 जणांचा मृत्यू झाला, बैठकीत नियमाबद्दल चर्चा करण्यात आली होती मात्र ते नियम प्रत्यक्षात लागू झालेच नाही.
    महामार्गावर अनेक अपघात होत असतात मात्र आता चंद्रपूर शहरात अपघातात वाढ झाली आहे.

     

    4 सप्टेंबर 2023 ला चंद्रपुरातील बापट नगरमध्ये झालेल्या अपघातात शिक्षिकेला आपला जीव गमवावा लागला. त्याचदिवशी सायंकाळी 2 अपघातात दोघांनी आपला जीव गमावला. त्यांनतर ऑक्टोबर महिन्यात लागोपाठ झालेल्या दुचाकी वाहनांच्या अपघातात 7 जणांनी आपला जीव गमावला, सतत होणाऱ्या अपघातात निष्पाप नागरिकांचे बळी जात आहे. त्याला जबाबदार कोण हा प्रश्न आहे.

     

    अतिक्रमनात झपाट्याने वाढ

    चंद्रपूर-नागपूर महामार्गावर अतिक्रमण वाढले आहे. अनेकांनी रस्त्यावर आपला कब्जा केला आहे, एरवी रस्त्याच्या कडेला सामान्य नागरिकांनि दुचाकी वाहन लावले तर तात्काळ वाहतूक विभाग वाहन उचलून नेतात. मात्र चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील असलेल्या दुचाकी वाहनांच्या शोरूमसह अन्य व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. एवढेच काय तर अर्धा अधिक रस्त्यावर नवीन दुचाकी, चारचाकी वाहने विक्रिसाठी ठेवल्या आहे. मात्र वाहतूक पोलिसांसह अन्य प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. यामागे आर्थिक कारण दडले असल्याचे बोलल्या जात आहे.
    अतिक्रमण काढण्यात यावे यासाठी प्रशासनाला अनेकदा निवेदने देण्यात आली मात्र कोणताही उपयोग झाला नाही.

    प्रशासनाने स्वतः थोपटली आपली पाठ

    मागच्या वर्षीच्या तुलनेत अपघातांची संख्या कमी असून मृतकाचा आकडा सुद्धा कमी आहे, उलट 30 टक्के नागरिक यंदा वाचले, मृतकाच्या आकड्यात 30 टक्क्यांची कमी आली असे अधिकारी ताठ मानेने सांगत आहे, ही टक्केवारी कमी असली तरी निष्पाप नागरिकांचा बळी तर जात आहे ना?  मृतकाची संख्या 30 टक्क्यांनी कमी असली तर तो आकडा शून्यावर आणण्याची जबाबदारी कुणाची आहे? याचं भान अधिकाऱ्यांनी ठेवायला हवं. प्रशासन सध्या मागील वर्षीच्या तुलनेत “टक्केवारी” कमी झाल्याचे सांगून खुश असल्याचे दिसत आहे.

     

    अधिकाऱ्यांचा संवेदनशीलपणा संपला

    यंदा मृतक कमी आहे असे सांगणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्या कुटुंबांच्या घरी एकदा डोकावून बघावं.ज्यांच्या घरचा कमावता पुरुष दुचाकी अपघातात ठार झाला, एक आठ वर्षाचा मुलगा अपघातात गेला, 3 दिवसांनी त्याच्या वडिलांनी सुद्धा जगाचा निरोप घेतला, यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? याचं उत्तर अधिकाऱ्यांनी द्यायलाच हवं.

    कारवाई कुणावर?

    शहरात अक्षरशः स्टंट करणारे दुचाकीस्वार यांच्यावर कारवाई अत्यंत कमी प्रमाणात होत आहे. शहरात झालेल्या अपघाताला जबाबदार हे स्टंट करणारे दुचाकीस्वारचं आहे, मात्र हे वाहतूक पोलिसांच्या हाती कधी लागत नाही, आजही शहरात ट्रिपल सिट ने अल्पवयीन बालक प्रवास करतात, त्यांच्यावर कारवाई नाही, इतकेच नव्हे तर शहरात लागलेले सीसीटीव्ही कॅमेरे कशासाठी आहे? ट्रिपल सिट व स्टंट करणारे दुचाकी स्वार त्या कॅमेऱ्यात कैद होत नाही काय? हा प्रश्न आहे.

     

    वाहतूक विभागात इतिहास

    चंद्रपूरच्या इतिहासात चंद्रपूर वाहतूक नियंत्रण शाखेत पहिल्यांदाच 2 पोलीस निरीक्षकांची वर्णी लागली असली तरी चंद्रपुरात वाहतुकीचे तीनतेरा वाजलेले आहे.

     

    विशेष म्हणजे वाहतूक विभागाच्या बाजूलाचं अवैध ट्रॅव्हल्स स्टॅण्ड लागले आहे, तत्कालिन पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी वाहतूक विभागाच्या बाजूला असलेले ट्रॅव्हल्स स्टॅण्ड बंद केले होते, त्यानंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक नियती ठाकेर यांनी सुद्धा त्या आदेशाचा मान राखत स्टॅण्ड बंद केले, मात्र पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

     

    सध्याचे पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांची पोलिस प्रशासनावर पकड ढिली होत असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. त्यामुळेच शहरात वाहतूक अनियंत्रित होत असल्याचेही बोलल्या जात आहे. लहान सहान कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या पोलीस अधीक्षकांना शहरातील अपघात कसे काय दिसत नाही, हा प्रश्नच आहे.

    शहरातील सिग्नल ची अवस्था काय?

    शहरातील अति वर्दळीचा प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकातील सिग्नल व कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस शोभेची वास्तू ठरत आहे, नागरिक 12 सेकंद पूर्वी सिग्नल तोडून जातात, यामध्ये कर्मचाऱ्याचा दोष नसला तरी चौकात लागलेले कॅमेरे त्या नियमभंग करणाऱ्या नागरिकांना टिपत नसतील का?

    चंद्रपूर नागपूर मार्गावर बापट नगर येथे सुरू करण्यात आलेला सिग्नल आधी सतत सुरू होता त्यांनतर काही दिवसांनी तो बंद झाला, विद्या निकेतन शाळेसमोर अपघात घडला, त्या अपघातात दोघांनी आपला जीव गमावल्यावर तो सिग्नल पुन्हा सुरू झाला.

     

    सामान्यांचा अंत बघू नका

    शहरात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. निष्पाप बळी जात आहे आणि प्रशासन मात्र उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. परिणामी आता सामान्य नागरिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • चंद्रपूर मेडिकल कॉलेज मध्ये गरोदर महिलेचा मृत्यू

    News34 chandrapur

    चंद्रपूर:- सौ. अर्शिला रूपेश मेश्राम, वय-२३ वर्षे, राह. नवेगाव (वाघाडे) ता. गोंडपिपरी जि. चंद्रपूर येथील गरोदर महिलेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने  दि.२३/१०/२०२३ रोजी रात्री १२.०० वाजता च्या दर्म्यान गोंडपिपरी येथील शासकिय रूग्णालय येथे तिच्या पतीने भर्ती करण्यासाठी नेले होते. रूग्णालयातील कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी सदर महिलेची प्रकृती बिघडत असल्याचे पाहून तीला एका तासात शासकीय जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे रेफर केले.

     

    पहाटे २.३० ते ३.०० वाजताच्या दरम्यान ते वैद्यकिय महाविद्यालय, चंद्रपूर येथे पोहोचले. तसेच तीला प्रस्तुती वार्डात भर्ती करून घेण्यात आले. तेव्हा तिच्यावर उपचार सुरू असतांना दि. २४/१०/२०२३ ला सायं. ७.३० वाजता च्या दरम्यान सदर महिलेचा मृत्यु झाला. प्रसूतीच्या काळात रुग्णालयात संबंधित डॉक्टरांच्या दुर्लक्षीतपणामुळे सदर मातेचा बाळासह मृत्यु झाला असल्याचे परिवारातील सदस्यांचे म्हणने आहे.

     

    तेव्हा सदर घटनेचे गाभीर्य लक्षात घेता भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांना सदर घटनेची दूरध्वनी वरून माहिती मिळताच  तत्काळ पदाधिकाऱ्यांना रुग्णालयात पाठवून घटनेची माहिती घेण्यास सांगितले आणि पावडे यांनी जिल्हा महामंत्री ब्रिजभूषन पाझारे,अनु. जमाती मोर्चा जिल्हाध्यक्ष धनराज कोवे,बंडू गौरकार,साजिद भाई, प्रवीण उराडे,आकाश मस्के,अमित निरंजन यांच्या सोबत जिल्हाधिकारी यांची भेट घेतली व निवेदन दिले.

     

    या घटनेची सखोल चौकशी व्हावी व दोषी असलेल्या संबंधीत डॉक्टर व कर्मचारी यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील अनेक सोई सुविधा आणि रुग्णांच्या मदती साठी गठित केलेली समिती द्वारे वेळोवेळी केलेल्या सूचनाने अनेक सुविधा होत आहेत. मात्र ह्या घटनेची चौकशी करण्याचे     जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. आणि अश्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये या साठी ठोस उपाय करण्यात यावे अशी विनंती केली आहे. दिलेल्या निवेदनाला जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

  • चंद्रपुरात पोलिसांच्या वाहनाने सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा मृत्यू

    News34 chandrapur

    चंद्रपूर : भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराने ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात विरुद्ध दिशेने येणाऱ्या पोलीस वाहनाला धडक दिली. यात युवक ठार झाल्याची घटना शुक्रवारी घडली. हा अपघात महानगरातील रहेमतनगर परिसरात घडला. प्रणील प्रमोद चिंचोळकर (२९) रा. नगिनाबाग चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे. चंद्रपूर शहरात आठवडाभरात 7 मृत्यू झाले आहे.

     

    मिळालेल्या माहितीनुसार, प्रणील हा दुचाकी क्रमांक एमएच ३४/बीजे ७८२० या क्रमांकाच्या दुचाकीने बिनबा गेटकडून सिस्टरकॉलनीकडे येत होता. तर शहर पोलिसांचे वाहन क्रमांक एमएच ३४/६०६६ हे सिस्टरकॉलनीकडून बिनबागेटमार्गे शहर पोलीस ठाण्याकडे जात होते.

     

    रहेमतनगर येथील मस्जिदजवळ समोर असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करून प्रणील पुढे जाण्यासाठी निघाला. एवढ्यात समोरून दुसरे वाहन आल्याने प्रणीलने ब्रेक मारले. त्यामुळे गाडी घसरून प्रणील हा विरुद्ध दिशेने येणाऱ्या शहर पोलिसांच्या वाहनाच्या मागील चाकात आला. यात डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

     

    दरम्यान, घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठीगर्दी केली. त्यामुळे या मार्गावर काही वेळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. रामनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक फाल्गून घोडमारे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे मृतक प्रणील हा सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाचा मुलगा असल्याची माहिती आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.