Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • News34 चा दणका – चंद्रपुरातील व्हिडीओ गेम पार्लर कायमचे बंद होणार

    News34 चा दणका – चंद्रपुरातील व्हिडीओ गेम पार्लर कायमचे बंद होणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपुरात नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लर बाबत 18 सप्टेंबर ला News34 ने बातमी प्रकाशित केली होती, त्या बातमीची चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेत कारवाईचा सपाटा सुरू केला होता, याबाबत 13 व्हिडीओ गेम पार्लरचा अहवाल प्रशासनाने नाकारला असून यासोबत जिल्ह्यातील व्हिडीओ गेम पार्लर कायमचे बंद होणार अशी चिन्हे आहेत.

     

    चंद्रपूर जिल्ह्यात व्हिडीओ गेम च्या नावाने सुरू असलेल्या जुगाराचा News34 ने पंचनामा करीत बातमी प्रकाशित केली होती, सदर बातमीने चंद्रपूर पोलीस व जिल्हा प्रशासन खळबळून जागे झाले होते, प्रशासनाने नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लर ची तपासणी सुरू केली, अनेकांचे परवाने नूतनीकरण झाले नसल्याची माहिती उघडकीस आली होती.

     

    चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलिसांनी नियमबाह्य पध्दतीने सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लरवर धाडी मारल्या, मंजूर असलेल्या व्हिडीओ गेम मशीन सोबत अधिकच्या मशीन पोलिसांना आढळून आल्या होत्या, पोलीस व प्रशासनाचा कारवाईचा धडाका सुरू केला होता.

     

    जिल्हाधिकारी गौडा यांनी व्हिडीओ गेम पार्लर धारकांची बैठक बोलावली व 15 ऑक्टोबर पर्यंत परवाण्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले, कालावधी संपल्यावर पोलीस विभागाने अहवाल व परवाना नूतनीकरण नाकारले, प्रशासनाच्या कठोर भूमिकेमुळे व्हिडीओ गेम पार्लर संचालकांचे धाबे दणाणून गेले.

     

    प्रशासनातील अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता आता जिल्ह्यातील नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लरवर कारवाई होणार अशी माहिती दिली आहे.

  • चंद्रपुरात ६२ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेचे उदघाटन

    चंद्रपुरात ६२ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेचे उदघाटन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – नाटक हे समाज जागृतीचे प्रभावी माध्यम आहे. समाजातील विविध समस्या सुध्दा या माध्यमातून सोडविल्या जातात. चंद्रपूर , गडचिरोली , भंडारा , गोंदिया या चार जिल्ह्यात विखुरलेली झाडीपट्टी रंगभूमी हे या परिसराचे सांस्कृतिक वैभव आहे. चंद्रपूरातील कलावंतांनी नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त करत अटकेपार झेंडे रोवले आहेत. त्यांचा कलाविष्कार उत्तरोत्तर यशस्वी व्हावा अशा शुभेच्छा देत या विभागाचा आमदार म्हणून  कलावंतांच्या सोबत सदैव आहे व राहील तसेच चंद्रपूरच्या नाट्यक्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन अशी ग्वाही आ. किशोर जोरगेवार यांनी दिली.

     

    ६२ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या चंद्रपूर केंद्रावरील प्राथमिक फेरीचा उद्घाटन सोहळा स्थानिक प्रियदर्शिनी नाट्यगृहात २० नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. दीपप्रज्वलन आणि घंटानाद करून आ. जोरगेवार यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले .यावेळी मंचावर ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ . विद्याधर बन्सोड, निवासी उपजिल्हाधिकारी श्री संजय पवार, स्पर्धेचे परीक्षक श्री सुहास जोशी, सौ प्रतिभा पाटील, श्री संजय दखणे यांची उपस्थिती होती.
    कलावंत मंडळीनी पुरस्कारांच्या मागे न धावता उत्तमोत्तम कलाकृती रसिकांना देण्यावर भर द्यावा व चंद्रपूरची रंगभूमी अधिक समृध्द करावी असे मत प्रा. डॉ विद्याधर बन्सोड यांनी व्यक्त केले. यावेळी श्री संजय पवार , परीक्षक श्री सुहास जोशी यांनी देखील स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.
    उद्घाटन प्रसंगी सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी चित्रफितीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. मराठी रंगभूमी अधिकाधिक समृद्ध व्हावी , कलावंत , तंत्रज्ञ यांच्या विविध मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील असून लवकरच त्यात यश येईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
    कार्यक्रमाचे संचालन स्पर्धा समन्वयक श्री सुशील सहारे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री श्रीनिवास मुळावार यांनी केले. उद्घाटन सत्रानंतर हम चंद्रपूर या संस्थेने अमेय दक्षिणदास लिखित चैताली बोरकुटे  कटलावार दिग्दर्शित द कॉन्शन्स या नाटकाचा प्रयोग झाला. या प्रयोगाला नाट्यरसीक प्रेक्षकांची लक्षणीय उपस्थिती होती.
  • जिलेबी वाटप – बीआरएस च्या आंदोलनाची चंद्रपूर जिल्ह्यात चर्चा

    जिलेबी वाटप – बीआरएस च्या आंदोलनाची चंद्रपूर जिल्ह्यात चर्चा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी राजकीय नेते वेगवेगळ्या आंदोलनातून आपली भूमिका ठेवत असतात. अश्याच एका आंदोलनातून बिआरएसने जिल्हाचे लक्ष वेधले आहे. तेलंगणा-महाराष्ट्राला जोडणाऱ्या राज्यमार्गाचे काम मागील पाच वर्षांपासून रखळले आहे. या मार्गावर अपघाताची संख्या वाढली आहे. हा प्रश्न घेत बिआरएसने गांधीगीरी करीत सरकारचे चिमटे काढले.

     

    जिल्हात संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा गावात बीआरएसने आज ( सोमवार ) राज्यमार्गाचा प्रश्न घेत अनोखे आंदोलन केले.या राज्यमार्गाचे भूमिपूजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. आज भूमिपूजनाला पाच वर्ष झालेत मात्र मार्गाचे काम अपूर्ण आहे.या मार्गाने तेलंगणा राज्यातील आणि महाराष्ट्रातील वीस गावातील नागरिक ये जा करतात.मार्गांवर अनेक ठिकाणी गिट्टी पसरविली आहे. अनेक ठिकाणी मार्ग खोदलेला आहे. यामुळे मार्गांवर अनेक अपघात झाले आहे. अनेकांच्या जीव गेला आहे. तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.

     

    या मार्गाच्या प्रश्न महत्त्वाचा असतानाही लोकप्रतिनिधींनी आवाज उठविला नाही.हा प्रश्न घेत आज बीआरएसने आंदोलन केले.धाबा बसस्थानक चौकात भारत राष्ट्र समितीचे नेते भूषणजी फुसे यांचा नेतृत्वात गांधीगिरी आंदोलन झाले.पाच वर्षाचा कालावधी घेऊन अतिशय उत्कृष्ट मार्ग केला,असा उपहासात्मक टोला करीत फुसे यांनी सरकार,आमदार आणि प्रशासनाचे जिलेबी वाटून चिमटे काढलेत.

     

    आंदोलनात मोठ्या संख्येने गोंडपिपरी तालुक्यातील जनता उपस्थित होती. आंदोलनाचे नेतृत्व भूषण भुसे यांनी केले.आंदोलनात राकेश चिलकुरवार, सन्नी रेड्डी, सुरज उपरे, इस्लाम शेख, उमाकांत वाघमारे, सुभाष हजारे, महेंद्र ठाकूर यांनी लोकप्रतिनिधीवर ताशेरे ओढले .गोंडपिपरी तालुक्यातील बीआरएसचे देवानंद डोंगरे, अरुण बोरकर, रमेश बोरकर आंदोलनात उपस्थित होते.

  • चंद्रपूर शहरातील अपघातात वाढ, 12 नागरिकांचा बळी

    चंद्रपूर शहरातील अपघातात वाढ, 12 नागरिकांचा बळी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 4 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या चंद्रपूर शहरातील अपघाताच्या मालिकेत 12 नागरिकांनी आपला जीव गमवावा लागला आहे, मात्र अजूनही हे अपघात कमी करण्यासाठी प्रशासनाने पाऊले उचलली नाही. त्याचा परिणाम आज पायदळ चालणाऱ्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला.

     

    सप्टेंबर महिन्यात नागपूर रोडवर शिक्षिकेचा अपघात, त्याचदिवशी सायंकाळी आदर्श पेट्रोल पंप समोर दुचाकी अपघात, बंगाली कॅम्प चौकाआधी ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू, एकाच दिवशी शहरात 3 नागरिक अपघातात ठार झाले होते.

     

    त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात बाबूपेठ येथे बापलेकाचा मृत्यू, रामसेतू पुलाजवळ 2 युवकांचा मृत्यू, नागपूर रोडवरील विद्या निकेतन शाळेसमोर 2 युवकांचा मृत्यू, नगीनाबाग येथे सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलाचा अपघातात मृत्यू, नोव्हेम्बर महिन्यात वरोरा नाका चौकात युवकाचा अपघातात मृत्यू तर आज 20 नोव्हेम्बरला पायदळ चालणाऱ्या युवकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली.

     

    2 महिन्यात तब्बल 12 नागरिकांनी अपघातात आपला जीव गमावला आहे, महामार्गावर होणारे अपघात आता शहरापर्यंत पोहचले आहे, अपघात होण्याची कारणे News34 ने आधीच प्रकाशित केली होती, त्या वृत्तांनंतर चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी स्टंट करणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई करीत स्वतःची पाठ थोपटली.

     

    शहरातील मार्गावर वाढणारे अतिक्रमण, अतिवेगात दुचाकी वाहन चालविणारे युवक व अल्पवयीन मुले यांच्यावर परिवहन विभाग व वाहतूक विभागाचे लक्ष नाही, त्यामुळेचं शहर अपघातयुक्त बनले आहे.

     

    20 नोव्हेम्बरला शहरातील रामनगर पोलीस स्टेशन समोरून छत्तीसगड निवासी 32 वर्षीय टिकम पटेल हे पायदळ जात असताना आंध्रप्रदेश डेपो मधील बस क्रमांक AP01Z0084 ही चंद्रपूर बस स्थानक कडे अतिवेगात जात असताना एसटी बस पटेल हा बसच्या मागील चाकात अडकला, या अपघातात पटेल यांचा जागीच मृत्यू झाला.

    रामनगर पोलिसांनी बस चालक 52 वर्षीय स्वामीदास गोदरी ला अटक केली असून पुढील तपास करत आहे.

  • चंद्रपुरात वाघाचा हल्ला, 1 ठार

    चंद्रपुरात वाघाचा हल्ला, 1 ठार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्यात सर्वात जास्त वाघांची संख्या असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात आता मानव-वन्यजीव संघर्षांच्या घटनेत वाढ होत असून सोमवार 20 नोव्हेम्बरला बाबूपेठ भागात वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून यावर्षी आतापर्यंत तब्बल 21 नागरिकांनी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात आपला जीव गमावला.

     

    बाबूपेठ भागातील जुनोना जंगलातील शनी मंदिरात 53 वर्षीय मनोहर वाणी हे सकाळी पूजा करण्यासाठी गेले होते, त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने मनोहर यांच्यावर हल्ला करीत ठार केले.

     

    शनी मंदिर परिसरात तब्बल 300 ते 400 मीटर अंतरावर मनोहर यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला, घटनेची माहिती मिळताच आम आदमी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

     

    कुडे यांनी वनविभागाला सदर घटनेची माहिती देत मृतकाच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली, मनोहर हे घरचे कर्ते पुरुष होते, घरची आर्थिक परिस्थिती बिकट असून त्यांना 2 मुली आहे.

     

    वनविभागाशी चर्चा केल्यावर तपास पूर्ण झाल्यावर वनविभागातर्फे आर्थिक मदत देण्याचे आश्वासन कुडे यांना मिळाले.

     

    बाबूपेठ भागातील जंगल परिसरात मागील काही दिवसांपासून 2 वन्यप्राणी नियमित फिरत आहे, ज्यामध्ये बिबट व वाघाचा समावेश आहे, सदर दोन्ही वाघाचा तात्काळ बंदोबस्त करीत या परिसरात 2 पिंजरे वनविभागाने लावावे अशी मागणी करण्यात आली, वाघाचा बंदोबस्त न केल्यास राजू कुडे यांनी वनविभाग विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

     

    20 नोव्हेम्बरला घडलेल्या घटनेमुळे सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे, याठिकाणी दररोज नागरिक मॉर्निंग वॉक करायला जातात.

  • क्रिकेटचं काय घेऊन बसलाय? तुमच्या मूलभूत प्रश्नांसाठी हा नेता करतोय अनोखे आंदोलन

    क्रिकेटचं काय घेऊन बसलाय? तुमच्या मूलभूत प्रश्नांसाठी हा नेता करतोय अनोखे आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – महाराष्ट्र-तेलंगणाला जोडणाऱ्या गोंडपिपरी -पोडसा राज्यमार्गावरील धाबा -गोंडपिपरी मार्गाचे काम मागील पाच वर्षांपासून संथगतीने सुरु आहे. अद्यापही काम पूर्णतःवास गेलेले नाही. या मार्गावरून प्रवास करणे जीवघेणे ठरत आहे. या मार्गाच्या प्रश्नाला घेऊन बीआरएसचे नेते भूषण फुसे सोमवारला अनोखे आंदोलन करीत आहे. या आंदोलनाकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. विशेष म्हणजे हा मार्ग राजुरा विधानसभा क्षेत्रात येतो. भुसे यांनी पुकारलेला एल्गार विद्यमान आमदारांना चांगलाच झोमणारा ठरणार आहे.

     

    पाच वर्षांपूर्वी विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी धाबा गोंडपिंपरी मार्गाचे भूमिपूजन केले.

     

    आज पाच वर्षे झाले तरी बारा कि.मी. अंतराच्या हा मार्ग अद्यापही पूर्णत्वास गेलेला नाही. या मार्गावर अधून मधून अपघाताच्या घटना घडत असतात. अपघाताच्या घटना काहींना जीव गमावा लागला. तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. या मार्गाला घेऊन लोकप्रतिनिधी आणि प्रशासना संदर्भात कमालीचा संताप जनतेत दिसून येत होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधीनी ठोस पाऊल उचलले नाही. अश्यात बीआरएसचे नेते भूषण फुसे या मार्गाचा प्रश्न घेऊन उदयाला ( सोमवार ) आंदोलन करीत आहेत. धाबा बसस्थानक परिसरात हे आंदोलन होत आहे. या आंदोलन चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. आंदोलनात मोठ्या संख्येने जनता सहभागी होणार असल्याचे फुसे यांनी सांगितले.

  • चंद्रपुरात अस्थिविसर्जन करतेवेळी घडली मोठी दुर्घटना

    चंद्रपुरात अस्थिविसर्जन करतेवेळी घडली मोठी दुर्घटना

    News34 chandrapur

    विसापूर ( चंद्रपूर ): बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव ( पोडे ) येथील चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पोडे यांचे मोठे वडील घनश्याम झित्राजि पोडे यांचे ११ नोव्हेंबर रोजी निधन झाले होते. त्यांचे अस्थिविसर्जन आज रविवार ( दि.१९ ) दुपारी २ वाजता दरम्यान वर्धा – इराई संगमावर गेले. दरम्यान मुलगा व भाचा नदीच्या प्रवाहात बुडत होते.त्यांना वाचविण्यासाठी उपसभाती गोविंदा पांडुरंग पोडे यांनी नदी पात्रात उडी घेतली.दोघांना वाचविण्याच्या प्रयत्नात तिघानाही वर्धा नदीपात्रात जलसमाधी मिळाली. ही मनाला चटका लावणारी व ह्रदयदायक घटना बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव ( पोडे ) जवळ वर्धा – इराई नदीच्या संगमावर घडली.

     

    बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव ( पोडे ) येथील राहणारे व चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पांडुरंग पोडे ( ४७), त्यांचा एकुलता मुलगा चेतन गोविंदा पोडे ( १६ ) व त्यांचा भाचा गणेश रवींद्र उपरे ( १७) असे वर्धा नदी पात्रात जलसमाधी मिळालेयाची नावे आहेत.

     

    गोविदा पोडे हे बल्लारपूर पंचायत समितीचे देखील माजी सभापती होते. एकाच कंटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे पंचक्रोशित शोककळा पसरली आहे. वर्धा नदी पात्रात कुटुंबातील सदस्यां समोर तिघे वाहून गेल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.दरम्यान शोध मोहिमेत सायंकाळी ५.४५ वाजता गोविंदा पोडे यांचा मुलगा चेतन पोडे याचे प्रेत नावाड्यानी बाहेर काढले.अन्य दोघांच्या प्रेताचा शोध मोहीम सुरु आहे.
    नांदगाव ( पोडे ) येथील गोविंदा पोडे यांचे मोठे वडील घनश्याम पोडे यांचे ११ नोव्हेंबर रोजी वृदापकाळाने निधन झाले होते.

     

    आज रविवारी त्यांच्या अस्थिविसर्जन करण्यासाठी कुटुंबीय वर्धा – इराई नदीच्या संगमावर दुपारी १ वाजता गेले होते. पूजा अर्चना करून अस्थी विसर्जन करण्यात आले. त्यावेळी चेतन पोडे व गणेश उपरे हे नदी पात्राच्या पाण्यात पोहत होते.त्यावेळी गोविंदा पोडे यांनी दोघांनाही पाण्याच्या बाहेर या,म्हणून आवाज दिला.त्यावेळी ते बाहेर निघत असताना वाहत्या पाण्याच्या प्रवाहात वाहू लागले.

     

    मुलगा व भाचा यांना वाचविण्यासाठी गोविंदा पोडे यांनी नदी पात्रात उडी घेऊन त्यास वाचविण्याचा भरपूर प्रयत्न केला.मात्र ते देखील कुटुंबातील अन्य सदस्यासमोर वाहत्या पाण्याचा प्रवाहात वाहून गेले.
    या घटनेची माहिती होताच चंद्रपूरचे एस.पी.रवींद्रसिहं परदेशीं, बल्लारपूर पोलीस निरीक्षक निरिक्षक उमेश पाटील, चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीशसिहं राजपूत, बल्लारपूरच्या तहसीलदार डा.कांचन जगताप आणि परिसरातील नागरिकांनी धाव घेतली.

     

    दोघांचे प्रेत बाहेर काढले

    चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पोडे,त्यांचा मुलगा चेतन पोडे व भाचा गणेश उपरे यांना वर्धा नदी पात्रात जलसमाधी मिळाली. या दुर्दैवी घटनेतील मृतक गोविंदा पोडे यांच्या मुलाचे प्रेत शोध मोहिमे दरम्यान सायंकाळी ५. ४५ वाजता चेतन याचा तर सायंकाळी ६.४५ वाजता भाचा गणेश उपरे यांचे प्रेत बाहेर काढण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला.

  • 13 बछड्यांची माय, माया वाघिणीचा मृत्यू?

    13 बछड्यांची माय, माया वाघिणीचा मृत्यू?

    News34 chandrapur

    चंद्रपूर –  ऑगस्ट महिण्यापासून बेपत्ता असलेली ताडोबाची क्विन टि 12 माया वाघिणीचे ताडोबा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात शनिवारी गस्तीदरम्यान अवशेष आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मागील चार महिण्यापासून टि 12 वाघिणीचे पर्यटकांना दर्शन होणे बंद झाले होते. तेव्हापासून पर्यटक आणि वन्यप्रेमींमध्ये माया वाघिणीच्या अस्तित्वाविषयी चिंता व्यक्त केली जात होती. ह्या बाबतची ताडोबा अंधारी राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने ह्या विषयी अधिकृत माहिती दिली आहे.

     

    T-12 ही वाघिणी ही माया नावाने ताडोबात सर्वपरिचीत होती. ती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य पांढरपवणी भागातील प्रबळ वाघिण होती. तिचा जन्म डिसेंबर 2010 मध्ये जन्म झाल्याची नोंद आहे. जून 2014 पासून टि 12 वाघिणीने पाच वेळा शावकांना जन्म दिला आहे. सन 2015, 2017, 2020 आणि 2022 मध्ये एकूण 13 शावकांचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जैवविविधता वाढण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे. ह्यातील काही शावकांचा नैसर्गिक दृष्ट्या मृत्यू झाला आहे.

     

    ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत नियमीत होणा-या कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातुन शास्त्रशुध्द पध्दतीने होणा-या संशोधनामध्ये 2014 पासून या वाघांची नियमीत नोंद होत होती. परंतु मार्च 2023 ते मे 2023 या कालावधीत कॅमेरा ट्रॅपच्या सहाय्याने सुरू असलेल्या फेस 4 मध्ये तीची शेवटची नोंद झाली होती. ऑगस्ट 2023 मध्ये ताडोबा तलावाजवळील पंचामध्ये गस्त करीत असलेल्या क्षेत्रीय वन कर्मचा-यांना तिचे शेवटचे दर्शन झाले होते आणि त्यानंतर ती पूर्वीच्या गृह क्षेत्रात दिसत नव्हती. तेव्हापासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी तसेच पर्यटकांमध्ये तिच्या मृत्यू बाबत शंका घेतली जात होती. ताडोबातील तिच्या सध्याच्या अस्तित्वाविषयी पर्यटन प्रेमींमध्ये चिंता व्यक्त केली जात होती.

     

    त्यामुळे ताडोबाच्या व्यवस्थापानाने वन विभागामार्फत तिच्या गृहक्षेत्रामध्ये आणि लगतच्या वन परिक्षेत्रामध्ये 7 ऑक्टोबर 2023 पासून मोठ्या प्रमाणात कॅमेरा ट्रॅप आणि नियमित गस्त करून शोध मोहीम सुरु केली होती. तिच्या गृहक्षेत्र म्हणजेच ताडोबा आणि कोलारा वनपरिक्षेत्रातील सर्व वनक्षेत्रात क्षेत्रीय कर्मचा-यानी पिंजून काढले होते. या संसोधन प्रक्रियेत T-07, T-114, T-115, T-158, T-16, T-120, T. 138, T- 164, T- 168, T-181 आणि T-100 असे एकूण 11 विविध वाघ त्यामध्ये 6 माद्या आणि 5 नर निरीक्षणामध्ये आढळून आले.

     

    7 ऑक्टोबर 2023 पासून सुरू असलेल्या संशोधन प्रक्रियेमध्ये टि 12 (माया) वाघिणीचे अस्तीत्व आढळून आले नाही. त्यामुळे तिला शोधण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. 16 ते 18 नोव्हेंबर 2023 या कालावधीत कौर क्षेत्रातील कार्यरत सर्व वनाधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी वन्यजीव संशोधक, विशेष व्याघ्र संरक्षण दलातील सर्व कर्मचारी आणि रोजंदारी वनमजुर अशा सुामरे 150 वन कर्मचा-यांना 5 गटांमध्ये विभागून कौर क्षेत्रातील विविध ठिकाणी पायदळ गस्त करण्यात आली.

     

    यासोबतच कॅमेरा ट्रॅप, ड्रोन कॅमेरा यांच्या सहायाने कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. या ऑपरेशनचे नेतृत्व ताडोबा-अंधारी व्याप प्रकल्पाचे उपसंचालक (कोर) नंदकिशोर काळे यांनी केले. ताडोबा अंधारी व्याध्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनात तसेच विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे, सहाय्यक वनसंरक्षक गणेश मिसाळ, कोर क्षेत्रातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ रविकांत खोब्रागडे, जिवशास्त्रज्ञ प्राजक्ता हुशंगाबादकर यांच्या उपस्थितीत सुरु होते.

     

    शनिवारी ताडोबा वनपरिक्षेतील ताडोबा नियतक्षेत्रातील (बीट) कंपार्टमेंट क्रमांक 82 मध्ये शोध पथकांना काही अवशेष निदर्शनास आले अवशेषांमध्ये वाघाच्या सांगाड्याचा समावेश असल्याचे दिसून आले. ते सुमारे 100 चौ.मी. वनक्षेत्रात विखुरलेले होते. सर्व अवशेष एकत्र करण्यात आले. सदर अवशेष संसोधन आणि विश्लेषणासाठी पशुवैद्यकिय अधिकारी आणि जीवशास्त्रज्ञांद्वारे डिएन विश्लेषणासाठी गोळा करण्यात आले. वन्यजीव पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सदर अवशेष कुजण्याच्या प्रगत अवस्थेत होते. पुढील शवविच्छेदन तपासणीसाठी अवशेष योग्य नव्हते. या क्षेत्रात आणि परिसरामध्ये कोणतेही मानवी हालचाल व कृती आढळून आली नाही.

     

    टि 12 माया वाघिणीचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाल वर्तविला आहे. गोळा केलेले काही नमुने तात्काळ नॅशनल सेंटर फॉर सायन्स (NCBS) आणि सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी बंगलौर येथे विश्लेषणासाठी पाठविले जाणार आहेत. चालू असलेले वैज्ञानिक संशोधन व अभ्यासादरम्यान गोळा करण्यात आलेल्या माहितीद्वारे T-12 वाघाच्या डीएनए नमुन्यांशी जुळले जाऊ शकतात आणि या संदर्भातील अहवाल 30 नोव्हेंबर 2023 प्राप्त होणार आहे. टि 12 वाघिणीच्या स्थितीबाबत अंतिम डीएनए विश्लेषण अहवालानंतर माया वाघिणीचे सत्य समोर येणार असल्याचे ताडोबा व्यवस्थापनाने सांगितले आहे.

  • चंद्रपूर पोलीस दलात हे चाललंय तरी काय?

    चंद्रपूर पोलीस दलात हे चाललंय तरी काय?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी घरफोडीच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी निघाल्याने पोलीस दलावर नामुष्की ओढावली आहे, आधीच जर त्या कर्मचाऱ्यांवर आवर घातला असता तर आज ही वेळ आली नसती अशी चर्चा पोलीस विभागात दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

     

     

    स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत नरेश डाहूले यांना रामनगर पोलिसांनी घरफोडीच्या गंभीर गुन्ह्यात अटक केली, मिळालेल्या माहितीनुसार आरोपी नरेश डाहूले यांना ऑनलाइन गेम, जुगार व शेअर मार्केटचा चांगलाच छंद जडला होता, मात्र या छंदात त्यांनी लाखो रुपये गमावले, 22 लाखांचे कर्ज झाल्यावर आता ते फेडायचं कसं हा विचार त्याच्या मनात आला, आणि त्याने पोलीस वर्दीत राहून गुन्हेगारीचा मार्ग निवडला.

     

    रात्री एकटं निघायचं आणि रेकी करायचं असा प्रकार डाहूले यांनी सुरू केला, त्यानंतर बाहेरगावी गेलेल्या नागरिकांच्या घरात एखाद्या अट्टल गुन्हेगारासारखा प्रवेश करीत रोख व सोन्याचे दागिने चोरायचे, असा प्रकार सुरू झाला.

     

    पहिल्या गुन्ह्यात मिळालेले यश डाहूले यांना दुसऱ्या पराक्रमासाठी कामी आलं, त्यानंतर त्यांनी घरफोडीचा सपाटा सुरू केला, मात्र रामनगर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या नजरेत डाहूले आले आणि त्यांना अटक झाली.

     

    विशेष म्हणजे डाहूले यांचा घरफोडी गुन्ह्यात सहभाग आहे ही बाब आधीच पोलिसांच्या कानात आली होती, मात्र त्यांना वॉर्निंग देऊन सोडण्यात आले, त्याचा फायदा डाहूले यांनी घेतला.

     

    याआधी सुद्धा पोलीस दलात असे प्रकार घडले…

    पोलीस एखाद्या गुन्ह्यात सहभागी आणि त्याला अटक झाली हा प्रकार पहिल्यांदा घडलेला नाही, मात्र अश्या अनेक गुन्ह्यात पोलिसांचा सहभाग आढळला, मात्र त्याची तक्रार झाली नाही, याबाबत News34 च्या हाती संपूर्ण माहिती मिळालेली आहे.

     

    यामध्ये चंद्रपुरातील एका भागात जुगार खेळताना काहींवर कारवाई झाली मात्र त्या खेळातील रक्कम परस्पर लाटण्यात आली, दुसऱ्या प्रकारात 26 जानेवारीला शहरातील एका घरात सुरू असलेल्या जुगारावर धाड मारण्यात आली, जुगार खेळणाऱ्यांची नावे नोंदविली, रक्कम जवळ ठेवली मात्र त्या गुन्ह्याची नोंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली नाही. सदर बाब News34 ने उघडकीस आणली होती हे विशेष.

     

    असे अनेक कर्मकांड आहे ज्यामध्ये पोलिसांचा सहभाग आढळला आहे, मात्र त्याबाबत तक्रार कुठेही करण्यात आली नाही, पोलिसांचा सेनापती मजबूत असेल तर असे प्रकार घडायला नको, मात्र सेनापती कमजोर असेल तर अशे प्रकार जिल्ह्यात अविरत सुरुचं राहतील.

  • 4 राज्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांनाच भाजपची पसंती

    4 राज्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांनाच भाजपची पसंती

    News34 chandrapur

    मुंबई : देशातल्या 4 प्रमुख राज्यांमध्ये निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीत भाजपच्या प्रचाराची धुरा मात्र महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस यांच्या शिरी असल्याचं दिसतंय. कारण, 3 राज्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या 15 सभा आणि रोड शो झाले आहेत. तर, येत्या काही दिवसांत अजून प्रचारसभा फडणवीस घेणार आहेत. राष्ट्रीय नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर यामुळे पुन्हा एकदा यानिमित्ताने शिक्कामोर्तब झालंय.

     

    मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार हा शिगेला पोहोचलाय. या राज्यांमध्ये भाजपच्या प्रचारासाठी प्रचारप्रमुख म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनाच मागणी येत असल्याचं दिसून येतंय. आतापर्यंत फडणवीस यांच्या 3 राज्यांमध्ये 15 सभा आणि रोड शो झाले आहेत. तर, पुढच्या आठवड्यांत राजस्थान आणि तेलंगणा राज्यांमध्ये त्यांचे दौरे आहेत. त्यामुळे देशातल्या भाजपच्या आश्वासक नेत्यांपैकी एक नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच पाहिलं जात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

    कुठे झाल्या सभा?

    मध्यप्रदेशमध्ये 18 सप्टेंबर, 10 आणि 15 नोव्हेंबर असे 3 दिवस 3 दौरे झाले आहेत. धार, इंदोर, महू, बुरऱ्हाणपूर, पांढुर्णा, सौंसर या ठिकाणी एकूण 8 सभा आणि रोड शो देवेंद्र फडणवीस यांनी घेतले. तर, छत्तीसगडमध्ये 30 ऑक्टोबरला 1 दिवस 1 दौरा झाला. धमतरी, रायपूर येथे 2 सभा आणि रोड शो फडणवीसांनी केले. राजस्थानमध्ये 14 सप्टेंबर 1 दिवस 1 दौरा पार पडला. केसरी, नासिराबाद, किशनगड, अजमेर उत्तर येथे एकूण 5 सभा फडणवीसांनी घेतल्या. तर, पुढच्या आठवड्यांत राजस्थान आणि तेलंगणा राज्यांमध्ये त्यांचे दौरे आहेत.

     

    देवेंद्र फडणवीस यांनाच पसंती का?

    भाजपने मध्यप्रदेशसह इतर तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन करण्याचा मनसुबा आखलाय. या सगळ्याच राज्यांमधल्या प्रचारात भाजपने प्रचारात आघाडी घेतली आहे. पण, भाजपच्या या प्रचाराचं महाराष्ट्र कनेक्शन देखील आहे. कारण, देवेंद्र फडणवीस स्वतः या राज्यांमध्ये जाऊन झंझावाती प्रचार दौरे करतायत. बिहार, गोवा या राज्यांमध्ये भाजपला बळकट करण्यात देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी कळीची भूमिका पार पाडली होती. गोव्यात अशक्य वाटत असलेला विजय त्यांनी खेचून आणला होता. तर, बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यापेक्षा जास्त जागा भाजपने मिळवल्या होत्या.

     

    बिहारच्या प्रचाराची धुरा देखील फडणवीस यांनीच पेलली होती. त्यामुळे देशातल्या राजकारणात आश्वासक नेतृत्व म्हणून आलेल्या देवेंद्र फडणवीस यांना आता पक्षातूनही तितकीच ताकद मिळतेय. त्यामुळेच सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत देवेंद्र फडणवीस यांना भाजपने पुढे केल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे. दरम्यान, सध्याच्या निवडणूक प्रचार सभा आणि दौरे करताना फडणवीस यांना स्थानिकांनाकडूनही पाठिंबा मिळत असल्याचं दिसतंय. मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये त्यांच्या सभांना मोठी गर्दी झाली होती.