Category: ग्रामीण वार्ता

ग्रामीण वार्ता (Gramin Varta) विभागात वाचा news34.in वर चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बातम्या आणि घडामोडी. शेतकरी योजना, ग्रामपंचायत राजकारण, स्थानिक विकास प्रकल्प, कृषी आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित सर्व महत्त्वाचे अपडेट्स येथे उपलब्ध आहेत. चंद्रपूर ग्रामीण भागातील समस्या, यशोगाथा आणि सकारात्मक बदलांना आम्ही प्राधान्य देतो. ग्रामीण भागातील विश्वासार्ह माहितीसाठी नियमित भेट द्या.

  • शेतात काम करताना हृदयविकाराचा झटका; ४० वर्षीय युवा शेतकऱ्याचा मृत्यू

    Young Farmer Death : पोंभूर्णा/चेक कोसंबी १४ डिसेंबर २०२५ (News३४): शेतात कापूस वेचण्याचे काम करत असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ४० वर्षीय युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना दि. १४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली आहे. वैभव ऊराडे (वय ४०) रा. चेक कोसंबी नं. १ असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, या आकस्मिक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, युवा शेतकरी वैभव ऊराडे हे आपल्या शेतात कापूस वेचण्याच्या कामात मग्न होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक त्यांना छातीत तीव्र वेदना जाणवल्या आणि ते शेतातच कोसळले. हे पाहताच सोबत काम करणारे कापूस वेचणारे मजूर आणि कुटुंबातील लोकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली.

    कुटुंबीय व मजुरांनी त्यांना तात्काळ पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती वैभव ऊराडे यांना मृत घोषित केले. प्राथमिक तपासणीत मृत्यूचे कारण ‘हृदयविकाराचा तीव्र झटका’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. Young Farmer Death

    या घटनेमुळे ऊराडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. केवळ चाळीस वर्षांच्या तरुण वयात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने चेक कोसंबी नं. १ आणि परिसरात शोककळा पसरली आहे. मृतक वैभव ऊराडे यांच्या मागे त्यांची पत्नी, दोन लहान मुली, आई-वडील, भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबाची मोठी हानी झाली आहे.

  • EVM हॅकिंगभीती पुन्हा चर्चेत; चंद्रपुरात काँग्रेसची प्रशासनाला मागणी

    EVM hacking fear : राजुरा ११ डिसेंबर २०२५ (News34) :– राज्यात नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच, मतमोजणी पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे (EVM) मशीनच्या सुरक्षिततेविषयी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान पार पडले असले तरी, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३ डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी २१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्यामुळे या दीर्घकाळात स्ट्राँग रूम सुरक्षिततेचा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे. (हे हि वाचा – चंद्रपूर मनपा निवडणूक, आप ला संधी द्या, मोफत शिक्षण, पाणी, रुग्णालय यासारख्या अत्याधुनिक सुविधा)

    देशभरात मत चोरी आणि EVM हॅकिंगचे दावे गाजत असताना सर्वसामान्य मतदारांमध्ये EVM विषयी अविश्वासाचे वातावरण दिसून येत आहे. इलेक्ट्रॉनिक यंत्र असल्याने सॅटेलाइट किंवा मोबाईल इंटरनेटच्या माध्यमातून EVM हॅकिंगची भीती जनतेत व्यक्त होत आहे.

    या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील स्ट्राँग रूम परिसर पूर्णपणे सुरक्षित राहावा, कोणताही बाह्य नेटवर्क सिग्नल किंवा इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेप होऊ नये यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांना निवेदन सादर करून स्ट्राँग रूम परिसरात जॅमर बसवण्याची तातडीची मागणी केली आहे. धोटे यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले की, नागरिकांचा EVM व मतदान प्रक्रियेवरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने अत्याधुनिक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे असून त्यात जॅमर स्थापनेला प्राधान्य द्यावे.

  • वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा बळी; चंद्रपूर जिल्ह्यातील ‘बळी’चा आकडा ४२ वर

    tiger attack fatalities : चंद्रपूर १० डिसेंबर २०२५ (News३४) : चिमूर तालुक्यातील शंकरपूरजवळील कवडशी देश गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शंकरपूर-कवडशी रस्त्यालगत शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एका ५२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे मंगळवारी (दि. ९) उघडकीस आले. शेषराव नथु झाडे (वय ५२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (हे हि वाचा – चंद्रपुरातील वाघीण निघाली सह्याद्रीला)

    🔍 शोधानंतर लागला मृतदेह

    मिळालेल्या माहितीनुसार, शेषराव झाडे हे सोमवारी (दि. ८) सायंकाळी शंकरपूर येथे बाजारहाट करण्यासाठी गेले होते. मात्र, त्यानंतर ते रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत. त्यांचा संपर्क न झाल्याने कुटुंबीयांनी मंगळवारी सकाळी शोध घेण्यास सुरुवात केली. दिवसभर शोध घेऊनही ते न सापडल्याने, मंगळवारी सायंकाळी गावकऱ्यांनी शेतशिवारात संयुक्त शोध मोहीम सुरू केली.

    शोध मोहिमेदरम्यान, शंकरपूर आणि कवडशीला जोडणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एमएसईबी (महावितरण) कार्यालयाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहावरील जखमा आणि परिसरातील परिस्थितीवरून त्यांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. tiger attack fatalities

    📈 मानव-वन्यजीव संघर्षाचा वाढता धोका

    शेषराव झाडे यांच्या मृत्यूमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्षातील बळींचा आकडा पुन्हा वाढला आहे. चंद्रपूर जिल्हा हा मोठ्या प्रमाणात वनसंपदा आणि वन्यजीव (विशेषतः वाघ) असलेली संवेदनशील जागा आहे.

    आजवर जिल्ह्यात झालेल्या या संघर्षामध्ये एकूण ४२ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये सर्वाधिक बळी वाघाच्या हल्ल्यात झाले आहेत, ज्यांची संख्या ३८ आहे. याव्यतिरिक्त, बिबट्याच्या हल्ल्यात २ तर अस्वल आणि हत्ती यांच्या हल्ल्यात प्रत्येकी अशा एकूण ४२ नागरिकांचा बळी गेला आहे. वन्यजीव लोकवस्तीत येत असल्याने आणि शेतकरी व मजूर शेतीच्या कामासाठी जंगलात जात असल्याने हा संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. वन विभागाने या वाढत्या धोक्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

  • चंद्रपुरात रस्ता दुरुस्तीचा गोंधळ: निकृष्ट रस्त्यामुळे गावकऱ्यांचा आक्रोश

     Gadchandur Awarpur road condition : कोरपना तालुक्यातील गडचांदूर – आवारपूर – कळमना – वणी हा राज्य मार्ग अतिशय वर्दळीचा असून या मार्गावरून दररोज अवजड वाहतुकीची मोठी रेलचेल असते. या महत्त्वाच्या रस्त्यावर दूध डेअरी परिसरात मोठे खड्डे व फुटकळ अवस्थेमुळे नागरिक त्रस्त आहेत. सध्या दुरुस्तीचे काम सुरू असले तरी कंत्राटदार कृष्णा सरकार यांच्या एजन्सीकडून सुरू असलेले काम अत्यंत निकृष्ट असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत.

    27 नोव्हेंबरला दिलेले आश्वासन वाया — तक्रारीनंतरही बोगस काम सुरूच

    नागरिकांच्या तक्रारीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता शुभम अडेटवार यांनी गुणवत्तापूर्ण काम करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात पुन्हा तेच बोगस काम सुरू असल्याने नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला.
    आवारपूर येथे आज दर्जाहीन काम बंद पाडण्यात आले. तर नेहरू शाळेजवळ दुरुस्ती केलेला रस्ता फक्त दोन दिवसांतच पूर्ण उखडून गिट्टी उघड्यावर दिसू लागली, यामुळे पीडब्ल्यूडी विभागाचे गंभीर दुर्लक्ष उघड झाले आहे. (हे हि वाचा : धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी २० हजार रुपये बोनस द्या – सुधीर मुनगंटीवार)

    दुरुस्तीमध्ये आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पाळली नाही

    नियमांनुसार खड्ड्यांना चौकोनी कट करणे,डस्ट माती नीट साफसफाई करणे,योग्य गिट्टीचा थर देणे,बिटुमिनस कोट टाकणे,रोलरने कम्पॅक्शन करणे ही प्रक्रिया बंधनकारक आहे.मात्र प्रत्यक्षात मातीवरच सरळ गिट्टी टाकून दुरुस्ती केली जात असल्याचे समोर आले आहे. गुणवत्तेचा पडताळा न करताच चाललेल्या कामामुळे रस्त्याचे आयुष्य कमी होईल व काही महिन्यांत पुन्हा खड्डे पडतील, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

    गावकरी आक्रमक – चक्काजाम आंदोलनाचा इशारा

    आवारपूर परिसरात नागरिकांमध्ये आज प्रचंड आक्रोश पाहायला मिळाला. सर्वपक्षीय शिष्टमंडळ सोमवारी सरोळी बांधकाम उपविभागाचे अधिकारी शुभम अडेटवार यांची भेट घेणार आहे.
    दुरुस्तीच्या कामाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने 10 डिसेंबरला आवारपूर येथे चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. Gadchandur Awarpur road condition

    “गावात मातीवरच गिट्टी टाकून रस्ता दुरुस्ती केली जात आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. कंत्राटदार कृष्णा सरकार यांच्याकडे तक्रार केली असता, ‘मी बाहेर गावाला आहे, दोन दिवसांनी येऊन बघते’ असे सांगण्यात येते. पण नागरिकांच्या जीविताचा प्रश्न आहे. दर्जेदार रस्ता व्हावा म्हणून आम्ही चक्काजाम आंदोलनाला सज्ज आहोत.” बाळकृष्ण काकडे,
    उपसरपंच, ग्रामपंचायत आवारपूर

    “सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. मागील दहा वर्षांपासून आम्ही या खराब रस्त्याचा त्रास सहन करतो आहोत. दुरुस्तीच्या कामात मोठा भ्रष्टाचार होत असून पीडब्ल्यूडी अधिकारी शुभम अडेटवार कंत्राटदाराचे संरक्षण करीत आहेत.” कल्पतरू कन्नाके,
    सदस्य, ग्रामपंचायत आवारपूर

    निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गुणवत्तायुक्त दुरुस्ती, जबाबदारांवर कारवाई आणि कामाचा पारदर्शक अहवाल याची मागणी गावकऱ्यांनी केली असून 10 डिसेंबरचा चक्काजाम आंदोलनाचा इशारा प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरणार आहेत.

  • चिंतलधाबा आरोग्य क्रांती: ६१ लाखांचे PHC भूमिपूजन!

    आ. मुनगंटीवार यांच्यामुळे सौरऊर्जा व ग्रामीण सुविधा उभारणीला नवी गती

    rural health center : चंद्रपूर – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे चिंतलधाबा गावाने सर्वांगीण विकासाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. गावाच्या आरोग्यसेवा बळकटीकरणाच्या दृष्टीने दि. ५ डिसेंबर रोजी चिंतलधाबा येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. तसेच, कार्पेट निर्मिती व प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटनही आ.मुनगंटीवार यांनी केले असून, या उपक्रमामुळे  स्थानिक महिलांसाठी रोजगाराची नवी दालने खुली झाली आहेत. (हे हि वाचा : पोंभुर्णा मध्ये महिला बचत गटाच्या बाजारपेठेचे भूमिपूजन)

    यावेळी, प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम, भाजपा तालुकाध्यक्ष हरिभाऊ ढवस, सरपंच सौ. शुभांगी कुत्तरमारे, उपसरपंच रोशन ठेंगणे, विनोद देशमुख, राहुल पाल, रवि मरपल्लीवार, अजय मस्के, माविमचे जिल्हा समन्वयक प्रदीप काथोडे, दशरथ फरकडे आदींची उपस्थिती होती.

    आरोग्य उपकेंद्रासाठी तब्बल ६१.१९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामुळे गावातील नागरिकांना आवश्यक आरोग्यसेवा आपल्या परिसरातच मिळणार आहेत.

    गावाच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील असलेल्या सरपंच व उपसरपंच यांच्या मागण्यांना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे ठोस बळ मिळाले आहे. चिंतलधाबाच्या विकासासाठी त्यांच्या या प्रयत्नांना आता वेग आणि दिशा मिळत असून गाव सर्वांगीण प्रगतीकडे वाटचाल करत आहे.

    दुसरे पूर्ण सौरऊर्जेवर चालणारे गाव करण्याचा मानस

    नागरिकांनी मांडलेल्या दोन प्रमुख मागण्यांचाही विचार करण्यात आला. यामध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णयही तत्काळ घेण्यात आला आहे. बांधकाम विभागाला अंदाजपत्रक तयार करण्याचे आ.सुधीर मुनगंटीवार यांनी निर्देश दिले. चिंतलधाबाची विजेची समस्या सोडविण्यासाठी महावितरणसोबत सविस्तर बैठक घेण्यात येणार आहे. यापूर्वी उथळपेठ हे गाव १००% सोलार करण्यात आले होते; त्याच धर्तीवर चिंतलधाबा हे महाराष्ट्रातील दुसरे पूर्ण सौरऊर्जेवर चालणारे गाव करण्याचा मानस आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. त्यादृष्टीने आगामी वर्षभरात या सोलार प्रकल्पाबद्दल गतीने काम करण्याचे निर्देशही देण्यात आले. rural health center

    आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशांमुळे चिंतलधाबा गावाच्या विकासाला नवे बळ मिळणार असून आरोग्य, ऊर्जा आणि मूलभूत सुविधांच्या उन्नतीला निर्णायक दिशा मिळेल. आगामी काळातही नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्याने आणि जबाबदारीने कार्यरत राहू, असा ठाम विश्वास कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला.

    कार्पेट निर्मिती व प्रशिक्षण केंद्र

    चिंतलधाबा येथे महिला आर्थिक विकास महामंडळ आणि लोकर संशोधन संघ, मुंबई यांच्या संयुक्त उपक्रमातून स्वयं सहायता महिला बचत गटाच्या कार्पेट निर्मिती व प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.कार्पेट निर्मितीचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर येथील तरुणी व महिला यांच्या प्रशिक्षण कौशल्याचा भविष्यात विचार व्हावा, त्यांना स्थिर उत्पन्न मिळावे यासाठी येत्या सहा महिन्यात त्यांना मानधन देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.यासाठी प्रशिक्षणार्थी तरुणी व महिलांची यादी तयार करावी.

    कायम सक्षम आरोग्य सुविधेचा मानस

    आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांना अधिक बळ देताना आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी अलीकडेच कळमना येथे २ कोटी ६८ लाखांचे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उमरी पोतदार येथे ८ कोटी ७५ लाखांच्या प्राथमिक आरोग्य संकुलाचे लोकार्पण केले आहे. अर्थमंत्री असताना शिर्डी साईबाबा संस्थानमार्फत ७.५ कोटींचे एमआरआय मशीन, १.५ कोटींची मोबाईल कॅन्सर व्हॅन उपलब्ध करून देऊन जिल्ह्यातील आरोग्यसेवेला नवी दिशा देण्यात आली. तसेच १३ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे, ३२ स्मार्ट आरोग्य केंद्रे, ६ स्मार्ट रुग्णालये, मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल यांसारख्या भव्य प्रकल्पांमुळे चंद्रपूर जिल्ह्यात सक्षम आणि आधुनिक आरोग्यव्यवस्था उभी करण्याचा मोठा उपक्रम त्यांनी साध्य केला.

  • पोंभूर्णा येथे महिला बचतगट बाजारपेठेचे भूमिपूजन

    Pombhurna Market Bhumipujan : चंद्रपूर ६ डिसेंबर (News३४) – महिला सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबनासाठी सातत्याने कार्यरत असलेले राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते दि. ५ डिसेंबर रोजी पोंभूर्णा येथे महिला बचत गट बाजारपेठेचे भूमिपूजन झाले. या उपक्रमाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी रोजगाराच्या नव्या अध्यायाची सुरुवात होत असल्याचा आनंद आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. या बाजारपेठेच्या माध्यमातून केवळ पोंभूर्णाच नव्हे, तर संपूर्ण बल्लारपूर मतदारसंघातील महिलांच्या सक्षमीकरणाला आणि स्वावलंबनाला नवी दिशा मिळेल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (हे हि वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे प्रश्न सोडविण्यासाठी खासदार धानोरकरांचा पाठपुरावा)

    पोंभूर्णा येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून आयोजित महिला बचत गट बाजारपेठ भूमिपूजन सोहळा आणि बचत गट महिला मेळाव्याला अतिरिक्त मुख्य कार्याधिकारी कल्पनाताई क्षीरसागर, प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष बंडू गौरकार, तहसीलदार मोहनीश शेलवटकर, नगरपंचायत मुख्याधिकारी निखिल लांडगे, तालुका अध्यक्ष हरीश ढवस, सुलभाताई पिपरे, ऋषी कोटरंगे, अजित मंगळगिरीवार, विनोद देशमुख, गुरुदास पिपरे, ज्योती बुरांडे, वैशाली बोलमवार, अजय मस्के, गंगाधर मडावी, बंडू बुरांडे, ईश्वर नैताम, ओमदास पाल आणि आदि मान्यवरांची उपस्थिती होती. Pombhurna Market Bhumipujan

    या सोहळ्यात उमेदच्या ‘यशोगाथा’ पुस्तिकेचे विमोचन तसेच कृषी विभागाच्या एआय आधारित शेतीविषयक माहितीपत्रकाचे लोकार्पण आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

    लाडक्या बहिणींच्या स्वप्नांना बळ

    आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘मुल, पोंभूर्णा आणि बल्लारपूर येथील बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. आज पोंभूर्णा येथे १ कोटी रुपये निधीतून होत असलेल्या बाजारपेठेच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने यशस्वी पाऊल टाकण्यात आले आहे, ही अतिशय समाधानाची बाब आहे. पोंभूर्णा येथील महिला बचतगटांच्या बाजारपेठेचे भूमिपूजन निश्चितच बल्लारपूर मतदारसंघातील लाडक्या बहिणींच्या स्वप्नांना बळ देईल.’

    हजारो मुली व महिलांसाठी रोजगाराच्या संधी

    यावेळी त्यांनी बल्लारपूरमध्ये सुरु असलेल्या एसएनडीटी कॉलेजमुळे ६२ कौशल्याधारित अभ्यासक्रमांद्वारे हजारो मुली व महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे विशेषत्वाने सांगितले. महिला व शेतकरी बांधवांसाठी चंद्रपूर जिल्ह्यात उभारण्यात येत असलेली ८० कोटी रुपयांची महाराष्ट्रातील सर्वात मोठी आधुनिक बाजारपेठ स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा आधार देणार असल्याचा विश्वास आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    आपल्या लाडक्या बहिणी सक्षम व्हाव्यात

    ते पुढे म्हणाले, ‘आपल्या लाडक्या बहिणी सक्षम व्हाव्यात, आत्मनिर्भर व्हाव्यात हा केवळ आपला ध्यास नाही, तर सामाजिक बांधिलकी आहे. महिलांच्या हाताला रोजगार मिळणे म्हणजे एका कुटुंबाची, एका समाजाची आणि पुढील पिढीची प्रगती होय. यासाठी बचतगटांनी कष्टाने तयार केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या परिश्रमाला योग्य किंमत मिळावी, त्यांच्या उत्पादनांना खात्रीशीर मागणी निर्माण व्हावी आणि त्यांचे उत्पन्न वाढत राहावे, यासाठी सशक्त, कायमस्वरूपी आणि आधुनिक बाजारपेठ निर्माण करणे हा आपल्या प्रयत्नांचा केंद्रबिंदू आहे.’

    भविष्यातील मजबूत समाजव्यवस्थेचा आधारस्तंभ

    महिला बचत गटांनी उद्योगातून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचे जे स्वप्न डोळ्यासमोर ठेवले आहे, ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण शासनस्तरावर, स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत आणि खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने सर्वतोपरी प्रयत्नशील आहोत. त्यांना प्रशिक्षण, वित्तीय मदत, विक्रीचे मार्ग आणि तंत्रज्ञानाची जोड मिळावी, यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील. महिलांच्या प्रगतीशिवाय समाजाचा विकास अपूर्ण आहे. म्हणूनच त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पुढे उचललेले प्रत्येक पाऊल भविष्यातील मजबूत समाजव्यवस्थेचा आधारस्तंभ ठरेल, याची जाणीव ठेवून आपण कार्यरत आहोत, असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.

  • जिल्हाधिकारी गौडा यांनी केली ईव्हीएम स्ट्रॉंग रूमची पाहणी

    EVM security guidelines : चंद्रपूर, दि. ०५ डिसेंबर (News३४) : नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी चंद्रपूर  विनय गौडा जी. सी. यांनी आज वरोरा तालुक्यात विविध कार्यांचा आढावा घेत क्षेत्रदौरा केला. सुरवातीला त्यांनी वरोरा येथील मतमोजणीसाठी ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनच्या स्ट्रॉंग रूमची पाहणी करून  सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि ईव्हीएम सुरक्षेसंदर्भात आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

    यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मौजे शेगाव बुद्रुक येथील झुडपी जंगल गट क्रमांक 1 ची पाहणी केली. सदर जमीन डी-लिस्टिंगसाठीचा प्रस्ताव वन विभागास पाठविण्याची प्रक्रिया महसूल विभागाने गतिमान करावी, असे निर्देश त्यांनी महसूल अधिकाऱ्यांना दिले. यानंतर चारगाव बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी  मधुकर भलमे यांच्या तूर उत्पादन व बियाणे उत्पादन शेताला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. (हे हि वाचा : ताडोबा अभयारण्यात नियमांचे उल्लंघन)

    शेतकऱ्यांना मार्गदर्शन

    तेलबिया उत्पादन वाढीसाठी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब, प्रयोगशील शेती आणि नाविन्यपूर्ण पद्धतींना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे सांगून कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याचे निर्देश त्यांनी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना दिले. EVM security guidelines

    या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी  संदीप भस्के, तहसीलदार योगेश कौटकर, पोलीस निरीक्षक श्री. तांबाडे, उपविभागीय कृषी अधिकारी कविता हरिणखेडे, मुख्याधिकारी नगरपरिषद वरोरा श्री. मेश्राम, तालुका कृषी अधिकारी श्री. राठोड, महसूल मंडळ अधिकारी अजय निखाडे यांसह तलाठी व कृषी सहाय्यक उपस्थित होते.

  • suicide due to family dispute case । युवकाने स्वतःला पेटवले

    suicide due to family dispute case : चंद्रपूर/गोंडपिपरी ४ डिसेंबर (News३४) : चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात कौटुंबिक वादातून एका ४० वर्षीय युवकाने स्वतःला जाळून घेऊन आत्मदहन केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. ३) दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत गंभीररित्या भाजलेल्या युवकाचा उपचारासाठी नागपूर नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.

    तंबाखू माफिया : शिंदेसेनेने पकडला लाखोंचा तंबाखू, प्रशासन निद्रावस्थेत

    प्राप्त माहितीनुसार, गोंडपिपरी जवळील दरूर गावामध्ये नामदेव वासुदेव सोनटक्के (वय ४०) या युवकाने बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास हे टोकाचे पाऊल उचलले. सोनटक्के यांनी स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

    नामदेव सोनटक्के हे या आत्मदहन प्रक्रियेत गंभीररित्या भाजले गेले. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनल्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात येत होते. मात्र, दुर्दैवाने उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. suicide due to family dispute case

    बुधवारी ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. कौटुंबिक कलहामुळे त्यांनी निराशेतून हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे दरूर गावावर शोककळा पसरली आहे.

    सध्या गोंडपिपरी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, नेमक्या कोणत्या कारणातून हा वाद झाला आणि नामदेव सोनटक्के यांनी आत्मदहन का केले, याबद्दल पोलीस अधिक माहिती गोळा करत आहेत.

  • tiger killed by train in Rajura । रेल्वेच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू

    tiger killed by train in Rajura : चंद्रपूर ३० नोव्हेम्बर (News३४) : बल्लारशहा-सिकंदराबाद डाऊन रेल्वे मार्गावर एका मालगाडीने धडक दिल्याने सात वर्षीय वाघीण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना रविवार, ३० नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजताच्या सुमारास राजुरा वन विभागाच्या चनाखा बीट मध्ये घडली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा वन्यजीवांसाठी रेल्वे मार्ग जीवघेणा ठरल्याचे सिद्ध झाले आहे.

    वन्यजीव हल्ला : अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

    मिळालेल्या माहितीनुसार, राजुरा वन विभागाच्या चनाखा बीटमधील विहिरगाव राऊंड, कक्ष क्रमांक १६० येथे रेल्वे रुळावरून मालगाडी जात असताना ही वाघीण रूळ ओलांडत होती. त्याचवेळी तिला रेल्वेने जोरदार धडक दिली. या धडकेत ती गंभीर जखमी होऊन रुळाच्या उजव्या बाजूला पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

    रेल्वे कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकारी आणि वन विभागाला याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच राजुरा येथील उपविभागीय वन अधिकारी एम. डी. गिरडकर आणि राजुरा वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. tiger killed by train in Rajura

    वन्यजीवांचा सुरक्षेचा प्रश्न गंभीर

    वन अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यात वाघिणीचे दात आणि सर्व अवयव शाबूत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पंचनामा पूर्ण झाल्यानंतर वाघिणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चंद्रपूर येथे पाठवण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेबाबत पुढील कार्यवाही राजुरा वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे करत आहेत. या घटनेमुळे वन्यजीव आणि रेल्वे मार्गालगतच्या भागातील त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

  • bear attack on farmers । सावली तालुक्यात अस्वलाचा शेतकऱ्यांवर हल्ला

    bear attack on farmers : सावली – सावली वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या पिरंजी माल येथील शेतशिवारात अस्वलाने हल्ला करुन दोन शेतकऱ्यांना जखमी केल्याची घटना (दि. 30) रोजी दुपारच्या सुमारास घडली. रोशन कोडापे (42) व मनोहर तोरपकवार (75) अशी जखमी शेतकऱ्यांची नावे असुन दोघेही पिरंजी माल येथील रहिवासी आहेत.

    निवडणूक : चंद्रपूर जिल्ह्यातील ह्या नगर परिषद निवडणूक पुढे ढकलली

    तालुक्यातील पिरंजी माल येथील शेतकरी नेहमीप्रमाणे सदर स्वत:ची गुर ढोरे चारण्याकरीता शेतशिवारात गेले होते. झुडपात दबा धरुन बसलेल्या अस्वलाने अचानक रोशन कोडापे याचेवर हल्ला चढविला व त्याला गंभीर जखमी केले. त्याला वाचविण्याच्याकरीता मनोहर तोरपकवार याने अस्वलाला पळवून लावण्याचा प्रयत्न केला असता त्याचेवरही हल्ला चढवून जखमी केले. दोघांनीही आरडाओरड केल्याने अस्वल जंगलाच्या दिशेने पळुन गेली. त्यामुळे दोघांचाही जिव वाचला. bear attack on farmers

    चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला

    चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला आहे, आतापर्यंत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ४१ नागरिकांचा बळी गेला आहे, अजूनही या संघर्षावर वनविभागाने ठोस पाऊले उचलली नाही आहे, ज्यामुळे या घटना सतत वाढत आहे.

    सदर घटनेची माहिती गावात होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना सावलीचे ग्रामिण रुग्णालयात उपचाराकरीता दाखल केले. रोशन कोडापे हा गंभीर जखमी असल्याने त्याला गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात पुढील उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहे. यावेळी वनपरीक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक राजु मुरकुटे यांनी तात्काळ 5000/- रुपयाची जखमींना पुढील उपचाराकरीता वनविभागामार्फत मदत दिली. यावेळी गावकऱ्यांनी अस्वलाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली