वरोरा – चिमूर रस्त्याचे काम पूर्ण करून विकासाची साडेसाती दूर करा – आमदार प्रतिभा धानोरकर

महामार्गाचे जाळे

News34 chandrapur

चंद्रपूर : जिल्ह्यात राज्य व राष्ट्रीय महामार्गाचे जाळे निर्माण करून विकासाच्या मुख्य प्रवाहात चंद्रपूर जिल्हा यावा असे स्वप्न होते. मात्र, याच विकासाला मागील साडेसहा वर्षांपासून साडेसाती लागली आहे. वरोरा – चिमूर रस्ता अर्धवट असल्यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून विकासाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे तात्काळ या मार्गाचे काम पूर्ण करण्याकरिता स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष देऊन हा प्रश्न पूर्ण करण्याची विनंती आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

 

वरोरा – चिमूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ E मध्ये ४२.७५ किमीच्या २८४ करोड रुपयांच्या विकास कामाला दि. ४ मार्च २०१७ ला सुरवात झाली. हे काम ३ मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.त्यानंतर सुधारित वाढीव मुदत देऊन ३० जून २०२३ करण्यात आली. सद्यस्थितीत संबंधित विभागाकडे चौकशी केली असता हे काम ९० टक्के पूर्णत्वास असून येत्या ३१ जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती दिली.

 

मात्र अजूनही ४-५ किमी चार पदरी रोडचे काम बाकी असून रोड साईड ड्रेनेज १ किमी, १ पाईप कल्व्हर्ट, २ मायनर ब्रिजेस, ८ निवारा शेड व पार्किंग, ४.५ किमी स्ट्रीटलाईट व हायमास्ट बाकी असून गत २-३ महिन्यात लहान मोठ्या अपघातात अनेकांनी जीव गमावले तर काहींना कायम अपंगत्व आले. या जीवघेण्या अपूर्ण कामास त्वरित पूर्णत्वास न नेल्यास ग्रामस्थांना घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा देखील आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिला आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *