चंद्रपूर जिल्ह्यातील महिला सरपंचाचा पंतप्रधान मोदी करणार सत्कार

News34

15 August 2023

चंद्रपूर :  केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने जिल्हयातील “हर घर जल” योजनेअंतर्गत चांगले काम केलेल्या व्यक्तींना लाल किल्ला, दिल्ली येथे स्वातंत्र्यदिनी 15 ऑगष्ट रोजीच्या समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील लाखापुर येथील सरपंच चंद्रकला मेश्राम यांचा यात समावेश असून स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीमती मेश्राम यांचा सत्कार होणार आहे.

 

चंद्रपुर जिल्हयात जल जीवन मिशन अंतर्गत कामे सुरु आहेत. अनेक ठिकाणी कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. काही ठिकाणी कामे पूर्ण झाली असून त्या गावात प्रत्येक घरी नळाव्दारे पाणी पोहचले आहे. जिल्हयातील अनेक गावे हर घर जल घोषित झालेली आहेत. अनेक ठिकाणी त्या गावातील सरपंच किंवा तेथील ग्रामपंचायत सदस्य समिती, स्वयं सहायता बचत गट यांनी चांगले काम केले आहे.

लाखापुर येथील 140 कुटुंबापैकी 101 नागरिकांच्या घरी जल जीवन मिशन अंतर्गत नळ कनेक्शन मिळाले आहे, विशेष म्हणजे यासाठी सरपंच मेश्राम यांनी गावातील पाण्याचा स्त्रोत म्हणून विहिरीच्या आत बोअर मारली आहे, कारण गावात जवळपास नदी नसल्याने त्यांनी विहिरीतून पाण्याचा उपसा करण्याचे काम करीत सदर योजना पूर्णत्वास आणली.

महाराष्ट्र राज्यात फक्त कोल्हापूर व चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे ही योजना पूर्णत्वास आली आहे.

केंद्र शासनाने चंद्रपुर जिल्हयातील ब्रम्हपुरी तालुक्यातील लाखापुर येथील सरपंच चंद्रकला मेश्राम यांनी, जलजीवन मिशन योजनेमध्ये दिलेल्या योगदानाची दखल घेतली आहे. 15 ऑगष्ट रोजी दिल्ली येथे होणा-या समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी सरपंच चंद्रकला मेश्राम आणी त्यांचे पती यांना उपस्थित राहण्याबाबतचे निमंत्रण केंद्र शासनाकडून देण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला चंद्रपुर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) नुतन सावंत यांना महाराष्ट्र राज्याकडून या कार्यक्रमाचे नोडल अधिकारी म्हणुन नियुक्त करण्यात आले आहे.
चंद्रकला मेश्राम यांच्या निवडीबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

चंद्रपुर जिल्हयातील महिला सरपंच यांचा देशाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्यावर सन्मान होणे, ही चंद्रपुर जिल्हयासाठी अभिमानाची बाब आहे. याच पावलावर पाऊल ठेवून इतरांनी प्रेरणा घ्यावी व गावाचा विकास साधावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी
विवेक जॉन्सन यांनी केले आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *