Tag: मराठी बातम्या

  • चंद्रपुरात पसरली धुक्याची चादर

    चंद्रपुरात पसरली धुक्याची चादर

    News34 chandrapur

    चंद्रपूर – पहाटेपासून आज चंद्रपूर जिल्ह्यात धुक्याची चादर पसरली आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे वातावरणात बदल पाहायला मिळत आहे. ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस तर आज सकाळी मोठ्या प्रमाणात धुके पडले आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अडचण निर्माण होत असून तापमानात घट झाली आहे.

    सकाळी बाहेर फिरायला पडलेले नागरिक सुद्धा आजचे वातावरण बघून संभ्रमात पडले, कधी पाऊस तर कधी पावसात थंडी असे बदल नागरिक आता रोज बघत आहे, मात्र अचानक घर, मार्ग, उद्यान हे आज धुक्याच्या चादरेखाली लपल्याने आता नेमका वातावरणात काय बदल होणार याबाबत नागरिकांची आज चर्चा रंगली होती.

     

    यावर चंद्रपुरातील पर्यावरण तज्ञ सुरेश चोपणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली…

     

    अवकाळी पाऊस व वातावरणात झालेला बदल यामुळे चंद्रपुरात धुक्याची चादर पसरली, हवेतील बाष्प मोठ्या प्रमाणात असल्याने आज चंद्रपुरात हा बदल झाला असून हे चित्र पुन्हा 2 दिवस दिसणार.

    सध्या दक्षिण भारतात वादळी पाऊस वाढल्याने राज्यात थंडीचे प्रमाण वाढण्याचे हे संकेत आहे अशी प्रतिक्रिया पर्यावरण तज्ञ सुरेश चोपणे यांनी news34 सोबत बोलताना दिली.

  • चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा गुड गव्हर्नन्स पुरस्काराने होणार सन्मान

    चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा गुड गव्हर्नन्स पुरस्काराने होणार सन्मान

    News34 chandrapur

    चंद्रपूर – दि सीएसआर जर्नलच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराचे हे सहावे वर्ष आहे. ना. सुधीर मुनगंटीवार यांना ‘दि सीएसआर जर्नल चॅम्पीयन ऑफ गुड गव्हर्नन्स’ हा पुरस्कार सुशासन (सर्वोत्तम प्रशासन) राखण्यात यशस्वी ठरत असल्याबद्दल दिला जात आहे.

     

    मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे येत्या शनिवार, दि. 9 डिसेंबरला देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री. मुनगंटीवार यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. प्रशासनाला विश्वासात घेऊन प्रत्येक शासकीय योजना, अभियान आणि उपक्रमांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यात श्री. मुनगंटीवार यांचा विशेष हातखंडा आहे. राज्य सरकारची कल्याणकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यापासून ते गरजूंना शासनाकडून न्याय मिळवून देईपर्यंत प्रत्येक बाबतीत ते सातत्याने पाठपुरावा करीत असतात. त्यामुळेच दि सीएसआर जर्नलच्या वतीने उत्तम प्रशासनासाठी दिल्या जाणाऱ्या विशेष पुरस्कारासाठी श्री. मुनगंटीवार यांची निवड करण्यात आली आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. प्रसिद्ध कवी कुमार विश्वास, क्रिकेटपटू युवराज सिंह आणि मिथाली राज, अभिनेत्री भूमी पेडणेकर आदींना या विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

     

    महाराष्ट्राच्या वन,सांस्कृतिक आणि मत्स्यव्यवसाय या तीनही खात्यांचा माध्यमातून ना.सुधीर मुनगंटीवार यांनी ऐतिहासिक अन् धडाडीचे निर्णय घेतले आहे . मग अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण हटविणे असो वाघनखे आणण्याचा केलेला लंडन येथील सामंजस्य करार,रायगडावर भव्यदिव्य केलेला शिवराज्यभिषेक सोहळा तसेच‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’, आपल्या देशातील संसदेला आणि अयोध्येतील श्रीराम मंदिराला चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातून काष्ठ पाठविण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार,’जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्यगिताचा दर्जा आणि आता घेण्यात येणाऱ्या तालुकास्तरावर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा अश्या निर्णयामुळे ना. सुधीर मुनगंटीवार हे चॅम्पीयन ऑफ गुड गव्हर्नन्स या पुढाकाराचे खरे मानकरी ठरतात अशी भावना व्यक्त होत आहे.

     

    चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

    चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आता आणखी एका प्रतिष्ठेच्या पुरस्काराची भर पडल्यामुळे चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे, अशी ऊत्स्फूर्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

    कर्तृत्वाचा गौरव

    ना. श्री. मुनगंटीवार यांना 1999 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे सर्वश्रेष्ठ वक्ता म्हणून गौरविण्यात आले होते. यासोबतच दि नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाईंडचा मेमोरियल अवॉर्ड आफ्टरनून व्हॉईसच्या वतीने बेस्ट परफॉर्मिंग पॉलिटिशियन, लोकमत आणि ज्युनियर चेंबर इंटरनॅशनलच्या वतीने ‘मॅन अॉफ द इयर’,महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील प्रगतीसाठी इंडिया टूडे सारख्या प्रतिष्ठीत समूहाने दोन वेळा पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. मॅग्ना प्रकाशन संस्था व होथूर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘सोसायटी एक्सलेन्स’ दिव्यांगांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लेफ्टनंट जी. एल. नर्डेकर स्मृती पुरस्कार, वृक्षलागवडीच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल छाया दीक्षित फाउंडेशन चा विशेष पुरस्कार ,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील दीर्घ सेवेसाठी कर्मवीर मा. सा. कन्नमवार स्मृती पुरस्कार, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज द्वारा व्यापार मित्र पुरस्कार अशा विशेष पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

  • ओबीसी समाजाच्या न्यायिक मागण्यांसाठी दोघांचे अन्नत्याग आंदोलन सुरू

    ओबीसी समाजाच्या न्यायिक मागण्यांसाठी दोघांचे अन्नत्याग आंदोलन सुरू

    News34 chandrapur

    चिमूर – ओबीसींच्या न्याय मागण्या अद्यापही मान्य न झाल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने चिमूर क्रांतीभूमीतून 7 दिसेंबर पासून राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे चिमूर तालुका अध्यक्ष अक्षय लांजेवार व अजित सुकारे यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू झाले आहे.

     

    चंद्रपूर येथे ओबीसींच्या मागन्यासाठी रविंद्र टोंगे. विजय बल्की आणि प्रेमानंद जोगी यांनी 11 सप्टेंबर पासून आंदोलन सुरू केले होते. दरम्यान ओबीसींच्या शिष्टमंडलासोबत शासनाच्या झालेल्या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 सप्टेंबरला चंद्रपुरात येऊन अन्नत्याग आंदोलन आश्वासन देऊन सोडविले होते. परंतु ओबीसींच्या न्याय मागण्या अद्यापही मान्य झाल्या नाही. त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने चिमूर क्रांतीभूमीतून 7 डिसेंबर पासून राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे तालुका अध्यक्ष अक्षय लांजेवार व अजित सुकारे यांचे आंदोलन सुरू झाले आहे.

     

    चिमूर नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज यांचे दर्शन घेऊन रलीच्या माध्यमातून अन्नत्याग आंदोलक अक्षय लांजेवार व अजित सुकारे यांना तहसील कार्यालयच्या बाजूला उपोषण मंडपात उपोषणाला बसविण्यात आले.

     

    यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर, राज्य उपाध्यक्ष डॉ सतीश वारजूकर, ओबीसी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शाम लेडे, राष्ट्रिय ओबीसी प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, दिनेश कष्टी. माधव डूकरे, अशोक सोनटकके, मारोती अतकरें, चिमूर चे तालुकाध्यक्ष उपस्थित होते

  • चंद्रपूरमधील ऐतिहासिक रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी इको-प्रोचे आंदोलन

    चंद्रपूरमधील ऐतिहासिक रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी इको-प्रोचे आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी इको-प्रोने हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने रोज ‘एक दिवस एक आंदोलन’ आंदोलनाची साखळीची सुरुवात केली. या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी, इको-प्रोच्या सदस्यांनी रामाळा तलावाच्या काठावर निदर्शने आंदोलन करत एसटीपी बांधकामाला तातडीने सुरुवात करण्याची मागणी केली आहे.

     

    इको-प्रोचे बंडू धोतरे यांनी सांगितले की, रामाळा तलाव शहराच्या मध्यभागी असून तो शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. मात्र, या तलावात मच्छीनाला आणि जलनगरमधून येणारे सांडपाणी सोडले जात आहे. यामुळे तलाव प्रदूषित होत आहे. तलावात वाढणारी इकॉर्नीया, भुजलाचे प्रदूषण, तलावाच्या लगतच्या जलस्त्रोत प्रदूषित होणे, तलावाच्या घाण पाण्याची दुर्गधी यासारख्या समस्या निर्माण होत आहेत. रामाळा तलावाच्या इको-प्रोच्या सत्याग्रह-आंदोलन नंतर जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आश्वासन नंतर फक्त खोलीकरण झाले, मात्र सांडपाणी मुक्त करण्यास ‘एसटीपी’ बांधकाम प्रस्ताव मात्र प्रलंबित आहे.

     

    इको-प्रोने या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी यापूर्वीही अनेक आंदोलने केली आहेत. मात्र, प्रशासनाने या समस्यांवर खोलकरण वगळता कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे इको-प्रोने हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने ‘एक दिवस एक आंदोलन’ आंदोलनाची साखळीची सुरुवात केली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून इको-प्रो प्रशासनाकडे रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी आवश्यक ती पावले उचलायला सांगणार आहे.

     

    आंदोलनात सहभागी झालेल्या इको-प्रोच्या कार्यकर्त्यांनी ‘एसटीपी चे बांधकाम, रिटेंनीग वॉल चे बांधकाम त्वरीत पुर्ण करा’, ‘वाचवा वाचवा ऐतिहासीक रामाळा तलाव वाचवा’, ‘मुक्त करा मुक्त करा रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करा’ अशा घोषणा दिल्या.

     

    इको-प्रोने या आंदोलनाच्या निमित्ताने विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद अध्यक्ष, मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठविन्यात येणार आहे. या निवेदनात त्यांनी रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी एसटीपी बांधकामाला तातडीने सुरुवात करण्याची मागणी केली आहे. या मागण्याबाबत लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही इको-प्रोने दिला आहे.

     

    या आंदोलनात इको-प्रोचे बंडू धोतरे, नितीन रामटेके, अब्दुल जावेद, रवी गुरनुले, कुणाल देवगिरकर, जयेश बैनलवार, सुनील पाटील, मनीष गावंडे, प्रमोद देवांगण, आकाश घोडमारे, राजू काहिलकर, स्वप्नील मेश्राम, सचिन धोतरे, मनीषा जैस्वाल, खुशबू जैस्वाल, प्रगती मार्कंडवार, प्रकाश निर्वाण, अतुल इंगोले, संदीप इंगोले, सुबोध संगमवार, शुभम खोब्रागडे, विशाल किन्नाके आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

     

    हिवाळी अधिवेशन निमित्त विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद अध्यक्ष, मुख्यमंत्री व पर्यावरणमंत्री यांचेकडे इको-प्रोची राज्यव्यापी मागणी केली आहे.

    “चंद्रपूरसह राज्यातील अन्य अनेक शहरातील तलावांची सुध्दा हीच अवस्था असल्याने ही सर्व तलावे प्रदुषणमुक्त, सांडपाणीमुक्त करीत त्याचे पर्यावरणीयदृष्टया महत्व जाणुन संवर्धन करणेकरीता ‘महाराष्ट्र शहरी तलाव सांडपाणी-प्रदुषणमुक्त योजना’ राबविणे काळाची गरज आहे. राज्यातील शहरा-शहरातील हा तलावाच्या स्वरूपातील नैसर्गीक व ऐतीहासीक वारसा नष्ट होण्यापासुन वाचविण्यासाठी शासनाचा मोठा उपक्रम ठरू शकेल. या संदर्भात राज्य शाशनाने अभियान राबवित दर्लक्षित व नष्ट होऊ पाहणारे तलावांना नवसंजीवणी देण्यात यावे” बंडू धोतरे, अध्यक्ष इको-प्रो चंद्रपूर

  • चंद्रपूर महानगरपालिकेत ‘फाऊंटेन घोटाळा’

    चंद्रपूर महानगरपालिकेत ‘फाऊंटेन घोटाळा’

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर शहराच्या जटपूरा प्रभागातील प्रियदर्शनी चौक, हिंदुस्तान लालपेट प्रभागातील कामगार चौक, तुकुम प्रभागातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, शास्त्रीनगर प्रभागातील एसटी वर्कशॉप जवळील शहीद भगतसिंग चौक,भानापेठ प्रभागातील रामाळा तलाव या ठिकाणी फाउंटेन उभारणी व बांधकामाच्या कामा करिता 17 फेब्रुवारी 2023 रोजी चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे एक निविदा प्रसिद्ध करण्यात आली. एकूण जवळपास सव्वादोन कोटी रुपये अंदाजपत्रकीय किंमत असलेल्या या निविदा प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी दिनांक 6 डिसेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला. मर्जीतल्या कंत्राटदाराला काम देण्यासाठी आयुक्त बिपिन पालीवाल यांनी या निविदा प्रक्रियेत अनेक नियम पायदळी तुडवले, अंदाजपत्रकामध्ये चार-चार पटीने कामाची किंमत वाढवून अवास्तव दर टाकले तसेच निविदा प्रक्रियेत अपात्र ठरणाऱ्या मर्जीतील कंत्राटदाराला पात्र केले व पात्र असलेल्या इतर कंत्राटदारांना हेतू पुरस्कार अपात्र ठरविल्याचा आरोप माजी नगरसेवक देशमुख यांनी केलेला आहे. या संपूर्ण घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून आयुक्त बिपिन पालीवाल यांचे विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी जनविकास सेनने केली. याबाबत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा जनविकास सेनेने दिलेला आहे.

     

    असा झाला घोटाळा…

     

    नागपूर येथील प्रशांत मद्दीवार यांच्या एजन्सीला फाउंटेन उभारणी व बांधकामाचे काम देण्यासाठी नियमांना बगल देण्यात आल्याचा आरोप देशमुख यांनी केलेला आहे.
    प्रशांत मद्दीवार या एजन्सीकडे पुरेसा अनुभव नसल्यामुळे निविदा प्रक्रियेत जाणीवपूर्वक ‘जॉईंट व्हेंचर’ ची तरतूद करण्यात आली.
    प्रशांत मद्दीवार या एजन्सीने दिल्ली येथील ‘एक्वारियस टेक्नॉलॉजी’ या एजन्सी सोबत जॉईन वेंचर चे पत्र सादर केले.

    मात्र याच निविदा प्रक्रियेत ‘एक्वारस टेक्नॉलॉजी’ या एजन्सीने एम एस भांडारकर व अंकुश गोडबोले यांच्या एजन्सी सोबत सुद्धा जॉईन्ट वेंचरचे पत्र दिले. एका निविदा प्रक्रियेमध्ये एखाद्या एजन्सीला एकाच कंत्राटदारासोबत जॉईंट वेंचर करता येते. त्यामुळे एक्वारस टेक्नॉलॉजी सोबत जॉईन वेंचर करणाऱ्या तीनही एजन्सीला अपात्र ठरविणे गरजेचे होते. परंतु तसे करण्यात आले नाही.

     

    निविदा प्रक्रियेत पात्र ठरण्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालय किंवा महामंडळामध्ये निविदेतील कामाच्या किमतीच्या 80% चे एक काम किंवा 50% चे दोन काम किंवा 40% ची तीन कामे पूर्ण केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. प्रशांत मद्दीवार या एजन्सीने काम पूर्ण केल्याचे पत्र सादर केले नाही. केवळ चार लक्ष रुपयांचे कार्यादेश जोडले. निविदा प्रक्रियेत कार्यादेश ग्राह्य धरण्यात येत नाही. काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देणे आवश्यक असते. प्रशांत मद्दीवार या एजन्सीकडे पुरेशा किमतीचे काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र नसतानाही या एजन्सीला पात्र ठरवून प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी वेळ देण्यात आला.

     

    या निविदा प्रक्रियेतील चार कामे प्रशांत मद्दीवार या एजन्सीला अंदाजपत्रकीय किमतीपेक्षा केवळ 0. 91 टक्के कमी दराने मंजूर करण्यात आले. प्रियदर्शनी चौक ,कामगार चौक व एसटी वर्कशॉप येथिल कामांची काही देयके सुद्धा अदा केली आहे. आयुक्त बिपिन पालीवाल यांनी अशा प्रकारे कंत्राटदाराशी संगनमत करून शासकीय निधीची अफरातफर केल्याने त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी देशमुख यांनी केलेली आहे.

     

    कामाच्या प्रत्यक्ष किमतीपेक्षा अंदाजपत्रकात लाखो रुपयांची वाढ

     

    निविदा प्रक्रिया प्रसिद्ध करताना शेड्युल बी या प्रपत्रा मध्ये कामाचे सविस्तर दर दर्शवून त्याची बेरीज केली जाते. ही बेरीज म्हणजेच या कामाची एकूण अंदाजपत्रकीय किंमत असते.
    अंदाजपत्रकीय किंमत ‘बिल ऑफ कोटेशन’ म्हणजेच बीओक्यू या प्रपत्रा मध्ये दर्शविण्यात येते. कंत्राटदार मध्ये दर टाकून निविदा प्रक्रियेत भाग घेतात.
    शेड्युल बी मध्ये कामाची एकूण किंमत व बीयुकीमध्ये टाकलेली किंमत एकच असणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र या निविदा प्रक्रियेत शेड्युल बी पेक्षा लाखो रुपयांनी अधिक किंमत बीओक्यू मध्ये टाकण्यात आली. अंदाजपत्रकामध्ये अशा प्रकारे लाखो रुपये वाढवून कंत्राटदाराला लाभ पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला.

     

    पात्र ठरणाऱ्या चांगल्या कंपन्यांना अपात्र केले

     

    या निविदा प्रक्रियेत भाग घेणारी अहमदाबाद येथील क्लासिक फाऊंटेन व लखनऊ येथील त्रिवी फाउंटेन या एमएसएमई या वर्गात मोडणाऱ्या कंपन्या आहेत. अशा कंपन्यांना प्राधान्य देण्याचे सरकारचे धोरण आहे. या कंपन्यांना अनामत रक्कम मधून सूट सुद्धा देण्यात येते. या दोन्ही एजन्सीज कडे करोडो रुपयांची कामे करण्याचा अनुभव आहे. तसेच या दोन्ही एजन्सी स्वतः फाउंटेन तयार करणाऱ्या कंपन्या आहेत. मात्र या दोन्ही एजन्सीला निविदा प्रक्रियेत अपात्र ठरविण्यात आले.शरद काळे या नागपूरच्या एजन्सीला सुद्धा अशाच प्रकारे अपात्र केले. अपात्र ठरवताना कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार या एजन्सीज सोबत केला नाही. एकतर्फी कारवाई करण्यात आली. आपल्या मर्जीतील प्रशांत मद्दीवार व स्वयंभू या एजन्सीला लाभ पोहोचवण्यासाठी आयुक्त बिपिन पालीवाल यांनी सर्व नियम पायदळी तुडवले.

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने अभिवादन

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने अभिवादन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : आज विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील आम आदमी पार्टी च्या वतीने गांधी चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले.

     

    या वेळेला आम आदमी पक्षाचे नेते सुनील मुसळे यांनी आपले मत मांडताना बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला त्यांनी सांगितले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समाजातील सर्व घटकांना माणूस म्हणुन जगण्याचा हक्क अधिकार मिळवून देण्याचे त्यांनी काम केले. कामगारांपासून स्त्रिया पर्यंत सर्व अधिकार संविधानामध्ये त्याची तरतूद करून जगाला हेवा वाटावा असा सुंदर संविधान त्यांनी या देशाला दिले. असे महामानवाचे उपकार मानावे तेवढे कमी आहे म्हणून केवळ देशात नाही तर जगामध्ये या महामानवाला मागणारे अनुयायी पाहायला मिळतात. तसेच जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार आम आदमी पक्ष हा बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गावरती काम करत असून येणारा काळ हा सुशिक्षित युवांचा तथा आम आदमी पक्षाचा असेल असे त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.

     

    यावेळी वरिष्ठ नेते सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, जिल्हा संघटन मंत्री भिवराज सोनी, जिल्हा कोषाध्यक्ष सरफराज शेख, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष मधुकर साखरकर, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे, महानगर महासचिव तबससूम शेख, महानगर सह संघटन मंत्री सिकंदर सागोरे, महानगर ओबीसी आघाडी अध्यक्ष प्रशांत धानोरकर, महानगर कोषाध्यक्ष स्वप्नील घाघरगुंडे, मंगला मुके, नागसेन लाभाने इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.