Tag: ताडोबा जंगल सफारी

  • Tadoba-Andhari new safari scheme for locals । प्रतिभाताई धानोरकरांचा पुढाकार; ताडोबाच्या बफर गेटवर स्थानिकांना आरक्षित जिप्सी सफारी

    Tadoba-Andhari new safari scheme for locals

    Tadoba-Andhari new safari scheme for locals : चंद्रपूर (दिनांक ०४ ऑक्टोबर २०२५): ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पुढाकाराने, ताडोबाच्या बफर विभागात आता स्थानिकांना जिप्सी सफारी साठी विशेष व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

    Also Read : भाऊंचा दांडिया, विजेत्यांना मिळाली लाखोंची बक्षिसे

    या निर्णयानुसार, आगरझरी बफर गेटवर आता दर बुधवारी सकाळच्या सत्रासाठी सर्वच्या सर्व सहा जिप्सी सफारी वाहने (६ सीटर) केवळ चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यकारी समितीने दिनांक ०३ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. Tadoba local jeep safari booking Chandrapur

    जिप्सी बुकिंग आणि शुल्क तपशील

    • कोणासाठी: केवळ चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक नागरिक
    • कुठे: आगरझरी बफर गेट
    • कधी: दर बुधवारी (सकाळच्या सत्रासाठी)
    • वाहन संख्या: एकूण ६ जिप्सी (६ सीटर)
    • शुल्क: एका जिप्सीसाठी (६ सीटर) ₹ ५००० (पाच हजार रुपये)
    • अंमलबजावणी: बुधवार, दिनांक ०८ ऑक्टोबर २०२५ पासून.

    बुकिंगची प्रक्रिया

    या जिप्सी सफारीची बुकिंग पर्यटनाच्या ७ दिवस आधीपासून एक दिवस आधीपर्यंत करता येणार आहे. बुकिंगसाठी नागरिकांना उपसंचालक (कोर), ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर यांच्या कार्यालयातील क्रुझर बुकिंग काउंटर येथे सकाळी ११:०० ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत संपर्क साधावा लागेल.

    क्रुझर सफारीची सवलत कायम

    स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी ताडोबा प्रशासनाने यापूर्वीच ९ सीटर क्रुझर सफारी सेवा सुरू ठेवली आहे. मोहर्ली प्रवेशद्वारासाठी ४ क्रुझर आणि कोलारा प्रवेशद्वारासाठी ३ क्रुझर सध्या कार्यरत आहेत. या क्रुझरद्वारे दररोज एकूण १२६ पर्यटकांना सकाळ आणि दुपारच्या फेरीत प्रवेश मिळतो. या क्रुझर सफारीचे शुल्क केवळ ₹ ७२०/- असून, यावर कॅमेरा शुल्कामध्ये १०० टक्के सूट देण्यात आली आहे.

    हा नवीन जिप्सी उपक्रम सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येत आहे. याला मिळणाऱ्या प्रतिसाद आणि यशावर आधारित पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने स्पष्ट केले आहे. वन्यजीव पर्यटन आणि स्थानिकांचे हित यांचा समन्वय साधण्याचा हा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे.

  • Tadoba Jungle Safari : ताडोबा जंगल सफारीचे पर्यटकांना मिळाले बोगस तिकीट

    Tadoba Jungle Safari : ताडोबा जंगल सफारीचे पर्यटकांना मिळाले बोगस तिकीट

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्यात सर्वाधिक वाघांची संख्या असलेला जिल्हा म्हणून आज चंद्रपूरची ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पामुळे ओळख आहे, वर्ष 2023 मध्ये ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात ठाकूर बंधूनी ऑनलाइन तिकीट विक्री च्या नावाने ताडोबा प्रशासनाची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली होती, मात्र आता पुन्हा काही पर्यटकांची जंगल सफारी च्या नावाने फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दुर्गापूर पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे. Tadoba tiger project

     

    छत्रपती संभाजी नगर येथे राहणारे 54 वर्षीय मनीष बावसकर यांनी जून 2023 ला बावसकर कुटुंब व नातेवाईक असे एकूण 18 जणांसाठी ताडोबा सफारी केयुज कडुकर या इसमाकडून बुक केली होती. यासाठी 25 मार्च महिन्यात केयुज कडुकर यांच्या फोन पे वर बावसकर यांनी तब्बल 25 हजार 500 रुपये, 27 मार्च 3 हजार रुपये व 14 एप्रिलला 10 हजार 400 रुपये असे एकूण 38 हजार 900 रुपये पाठविले होते. Jungle safari

     

     

    काही अपरिहार्य कारणामुळे बावसकर हे ताडोबा सफारी साठी येऊ शकले नाही, बावसकर यांनी पुन्हा ताडोबा सफारीसाठी कडुकर यांच्यासोबत सम्पर्क साधला आधीचे पैसे कडुकर यांचेकडे जमा होते, त्यांनतर बावसकर यांनी नोव्हेंबर 2023 ला 5 हजार फोन पे द्वारे कडुकर यांना पाठवीत 27 जानेवारी 2024 ची ताडोबा बुकिंग कन्फर्म केली. Online booking

     

     

    27 जानेवारीला बावसकर कुटुंब हे सफारी साठी ताडोबा येथील मोहरली गेटजवळ आले असता त्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्याला बुकिंग चे तिकीट दाखविले असता कर्मचाऱ्यांनी ते बोगस असल्याचे सांगितले, आपली फसवणूक झाली असे बावसकर यांच्या लक्षात आले, त्यांनी तात्काळ याबाबत दुर्गापूर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.

     

     

    दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला असता काही तासात आरोपी केयुज कडुकर ला अटक करण्यात आली.

     

    पोलीस तपासात कडुकर यांनी 6 जानेवारीला मुंबई येथील 58 वर्षीय राकेश वाजपेयी यांचीसुद्धा अश्याच प्रकारे फसवणूक केली होती, फिर्यादी बावसकर व वाजपेयी यांची कडुकर यांनी बुकिंग च्या नावाखाली तब्बल 66 हजार 400 रुपयांनी फसवणूक केली, पोलिसांनी आरोपी कडुकर यांच्यावर कलम 420, 66(ड) व माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अनव्ये गुन्हा दाखल केला.

     

    याबाबत वनविभाग सध्या काही बोलायला तयार नाही, मात्र आरोपी केयुज कडुकर यांचे 5 वर्षांपूर्वी ताडोबा येथे होम स्टे होते, मात्र त्यांच्या बोगस कामामुळे वनविभागाने कडुकर यांचे होम स्टे बंद केले होते, त्यांनतर सुद्धा सफारीसाठी आलेल्या पर्यटकांशी ओळखी करीत पुन्हा ताडोबा मध्ये यायचं असेल तर मला सम्पर्क करा मी सफारी बुकिंग करतो असे दर्शवायचा.

     

    सदरची यशस्वी कारवाई दुर्गापूर पोलीस निरीक्षक लता वाडीवे, पोलीस उपनिरीक्षक गिरीश मोहतुरे, पोलीस कर्मचारी खुशाल खेडेकर, योगेश शार्दूल, योगराज काळसरपे, प्रमोद डोंगरे, मनोहर जाधव यांनी केली.

  • ताडोबा व्याघ्रप्रकल्पात होत आहे देशातील पहिला प्रयोग

    ताडोबा व्याघ्रप्रकल्पात होत आहे देशातील पहिला प्रयोग

    News34 chandrapur

    नागपूर/चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत पर्यटनासाठी इलेक्ट्रिकल वाहनांना प्रोत्साहन देण्यात येणार असून प्रत्येक गेटवर या वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे. देशात प्रथमच इलेक्ट्रिक वाहनांचा पर्यटनासाठी उपयोग करण्यात येत आहे. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकासाचे विशेष प्रशिक्षण सुरु करण्याच्या सूचना, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या.

     

    ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत निसर्ग पर्यटनासंबंधी नियमन करणे तसेच व्याघ्र प्रकल्प व सभोवतालच्या क्षेत्राच्या सोयी सुविधांच्यादृष्टिने वाढ करण्यासाठी विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या स्थानिक सल्लागार समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.

     

    यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक कुशाग्र पाठक, ताडोबा कोअरचे उपसंचालक नंदकिशोर काळे, अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, मानद वन्यजीव रक्षक विवेक करंबळेकर, उपविभागीय अधिकारी श्रीमती शिवनंदा लंगडापूरे, मोहर्लीच्या सरपंच श्रीमती सुनिता कातकर, कोलाऱ्याच्या श्रीमती शोभाताई कोइचाळे, निसर्ग पर्यटन मंडळाचे धनंजय बापट, ट्रॅक्स संस्थेच्या श्रीमती पुनम धनवटे, इको-प्रो संस्थेचे बंडू धोतरे, मुकेश भांदककर, किरण मनुरे, योगेश दुधपचारे, अनिल तिवाडे, संजय मानकर, प्रफुल्ल सावरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

     

    ताडोबा-अंधारी या प्रकल्पामध्ये वाघाचे सर्वाधिक वास्तव्य असल्यामुळे देश व विदेशातील पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. पर्यटकांना आवश्यक सुविधा निर्माण करतांनाच वन्यजीव तसेच जंगलाचे संरक्षण महत्वाचे आहे. कोअर तसेच बफर क्षेत्रात पर्यटकांसाठी निर्धारित क्षेत्रात सुमारे दीडशे पेक्षा जास्त वाघांचे वास्तव्य आहे. पर्यटकांना या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी गाईड, वाहन चालक तसेच हॉस्पीटॅलीटी उद्योगामध्ये रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत. या परिसरात सुमारे 82 गावे असून त्यापैकी 62 गांवातील कुटुंबांना विविध रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. उर्वरित गावांसाठी कौशल्य विकास विभागातर्फे विशेष प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्यात.

     

    ताडोबा येथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी एनआयसी तर्फे विकसीत केलेल्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध असून पर्यटकांच्या सुविधेसाठी हेल्प लाईन क्रमांक,स्वतंत्र मदत केंद्र उपलब्ध आहे. पर्यटन वाढीला प्रोत्साहन देतांनाच पर्यटकांच्या प्रतिक्रीया नोंदवून त्यानुसार आवश्यक सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. पर्यटनाच्या दृष्टिने विविध उपक्रम राबवितांना पर्यटकांचा सहभाग कसा वाढेल यावर विशेष भर देऊन पर्यटन विकासाचा आराखडा तयार करा, या सुविधांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी यावेळी दिल्या.

     

     

    रिसॉर्टमधील ध्वनीप्रदुषण प्रतिबंधासाठी समिती
    ताडोबा-अंधारी प्रकल्पाच्या बफर क्षेत्राबाहेर हॉटेल्स, रिसॉर्ट्स संदर्भात आवश्यक परवानगी तसेच बांधकाम नियमानुसार असल्याबाबतची तपासणी करतांनाच येथे ध्वनीप्रदुषण तसेच मोठ्या प्रमाणात विद्युत दिव्यांची प्रखर रेाषणाई संदर्भात वन, महसूल तसेच स्थानिक पदाधिकारी यांची समिती गठित करुन येत्या तीन महिन्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्यात.

     

    आदरातिथ्य उद्योगामध्ये स्थानिकांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे किमान 50 टक्के रोजगार बफर क्षेत्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्राधान्याने द्यावा अशा सूचना करतांना श्रीमती बिदरी यांनी बफर क्षेत्रात होम स्टे करिता स्थानिक कुटुंबांनाच प्राधान्य आहे. बफर क्षेत्रातील सर्व रिसॉर्ट्स , होमस्टे नियमितीकरणासाठी तपासणी करावी व नियमबाह्य असलेल्यांवर त्वरीत कार्यवाही करावी. या क्षेत्रातील सर्व जीप्सीधारक हे स्थानिक असावे व मंजुर पर्यटन आराखड्यानुसार त्यांची नोंदणी करावी. गाईड यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी तसेच विदेशी पर्यटकांच्या दृष्टिने इंग्रजी व हिंदी भाषेचे प्रशिक्षण, व्याघ्र प्रकल्पात असलेले वन्यजीव, पक्षी तसेच वृक्षांबद्दलची संपूर्ण माहितीबाबत विशेष प्रशिक्षण आयोजित करावे अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.

     

    इरई सिंचन प्रकल्पाच्या बॅक वॉटर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा वावर आहे. परंतु या क्षेत्रात तारेचे कुंपण टाकून शेती करण्यात येत आहे. त्यामुळे वन्यजीवांना पिण्याच्या पाण्यापर्यंत पोहचणे शक्य होत नाही. त्यामुळे महाजनकोच्या माध्यमातून सर्व अतिक्रमण काढुन तेथे वृक्षारोपणासारखा उपक्रम राबविण्याला प्राधान्य देण्यात यावे अशी सूचना करतांना श्रीमती बिदरी यांनी पर्यटकांसाठी उपलब्ध जीप्सी तसेच पर्यटक शुल्कामध्ये वाढ करण्याच्या दृष्टिने प्रस्ताव तयार करावा, तसेच बफर क्षेत्रात पर्यटकांसाठी आवश्यक नियम तयार करुन त्यानुसार पर्यटनाचा मार्ग निश्चित करावा असेही श्रीमती बिदरी यांनी सांगितले.

     

    प्रारंभी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांनी स्थानिक सल्लागर समितीच्या मागील बैठकीचे इतिवृत्त सादर करुन त्यावर केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. यावेळी श्रीमती पूनम धनवटे, बंडू धोतरे, धनंजय बापट, योगेश दुधपजारे तसचे सरपंच श्रीमती शोभाताई कोचाडे व सुनिता कातकर यांनी विविध सूचना मांडल्या. त्याअनुषंगाने अहवाल सादर करावा असे यावेळी विभागीय आयुक्तांनी सांगितले.

  • ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प झाले हाऊसफुल्ल

    ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प झाले हाऊसफुल्ल

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्यात सर्वात जास्त वाघ, आणि वाघाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प येथे सध्या देशी-विदेशी पर्यटकांची हाऊसफुल्ल गर्दी होत आहे.

     

    ख्रिसमस आणि न्यू इयर निमित्त आलेल्या सलग सुट्यांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांनी गर्दी केली आहे. गेल्या काही वर्षात राज्यातील व्याघ्र प्रकल्पांच्या प्रवेश प्रक्रियेत उत्तम सुसूत्रता आली आहे. याचा थेट परिणाम म्हणजे पर्यटकांना त्यांची सर्व बुकिंगस घरी बसल्या ऑन-लाईन करता येतात आणि त्यामुळे ताडोबाला पोचणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे.

     

    जवळपास २ हजार चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेलं जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पट्टेदार वाघाच्या दर्शनासाठी प्रसिध्द असलं तरी शेकडो प्रकारचे पशु-पक्षी, फुलपाखरं, झाडं-वेली पर्यटकांना नेहमीच खुणावत असतात. हिवाळ्यात तर ताडोबाच्या या सौंदर्याला आणखीनच साज चढलाय. त्यामुळे अनेक पर्यटक इथला निवांत पणा अनुभवण्यासाठी ताडोबाला भेट देतात.

  • विद्यार्थ्यांना दिलेला शब्द पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केला पूर्ण

    विद्यार्थ्यांना दिलेला शब्द पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केला पूर्ण

    News34 chandrapur

    चंद्रपूर : राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या पुढाकाराने बल्लारपूर तालुका क्रीडा संकूल येथे राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून देशभरातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशातून जवळपास 3 हजार खेळाडू जिल्ह्यात दाखल होत आहे. वाघांच्या भुमीत येणा-या विविध राज्यातील खेळाडूंना जगप्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची मोफत टायगर सफारी करण्याच्या सुचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार पहिल्याच दिवशी विविध राज्यातील 336 खेळाडूंनी मोफत टायगर सफारीचा मनसोक्त आनंद लुटला.

     

    राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने पर्यटन समिती स्थापन करण्यात आली असून वनविभागाच्या वतीने खेळाडूंना मोफत टायगर सफारीचे नियोजन करण्यात आले आहे. यात सोमवारी सकाळच्या सत्रात 169 खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, व्यवस्थापक तर दुपारच्या सत्रात 167 खेळाडू अशा एकूण 336 जणांना मोफत सफारी घडविण्यात आली.

     

    सकाळच्या सत्रात केंद्रीय विद्यालय संघटनचे 55 खेळाडू, महाराष्ट्राचे 63 आणि पश्चिम बंगालचे 51 तर दुपारच्या सत्रात हिमाचल प्रदेशचे 46 खेळाडू, पंजाब 65, जम्मू काश्मिर 41 आणि ओडीसाचे 15 अशा एकूण 336 खेळाडूंनी मोफत ताडोबा सफारीचा आनंद लुटला. यावेळी सर्व खेळाडूंना वनविभागाच्या वतीने वेलकम किट देण्यात आली. यात टी-शर्ट, कॅप, किचन, ताडोबा डायरी मॅगझीन व ताडोबाची माहिती पुस्तिकेचा समावेश होता. तसेच सर्वांना सकाळी उत्तम नाश्ता व दुपारी जेवण देण्यात आल्याचे वनविभागाने कळविले आहे.

     

  • राज्यातील 75 हजार विद्यार्थ्यांना मोफत व्याघ्र पर्यटनाचा आनंद मिळणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

    राज्यातील 75 हजार विद्यार्थ्यांना मोफत व्याघ्र पर्यटनाचा आनंद मिळणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर : आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पर्यटन नकाशामध्ये ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा समावेश आहे, ही जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे. पर्यावरण तसेच वनांचे महत्व समजण्यासाठी ताडोबा पर्यटन ही महत्वाची बाब झाली असून हे एक चालते – बोलते विद्यापीठच आहे, असे विचार राज्याचे वन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

     

    ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सफारीकरीता पर्यटन वाहनांचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. नियोजन भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला ताडोबा अंधारी प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक जितेंद्र रामगावकर, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्र परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., राहूल पावडे, देवराव भोंगळे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

     

    गतवर्षी देश-विदेशातील जवळपास 3 लाखांच्या वर पर्यटक ताडोबा व्याघ्र प्रकल्प बघण्यासाठी आले, असे सांगून वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ताडोबा प्रकल्पातील सोयीसुविधा उत्तम व्हाव्यात, यादृष्टीने काही महत्वाचे निर्णय घेतले असून सिंगापूरच्या आर्किटेक्चरला डिझाईन बनविण्याचे काम देण्यात आले आहे. देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात सुंदर टायगर सफारी ताडोबाची राहील, यासाठी आपण प्रयत्नशील आहो. अतिशय महत्वाच्या व्यक्ती येथे येत असतात. त्यामुळे टायगर सफारीकरीता गाड्या टप्प्याटप्प्याने बदलविण्याचा निर्णय घेण्यात आला. यातील पहिल्या टप्पात आज सहा गाड्यांचे लोकार्पण होत आहे, असे वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

     

    राज्यातील 75 हजार विद्यार्थ्यांना मोफत व्याघ्र पर्यटनाचा आनंद मिळणार:

    चंद्रपूर जिल्ह्यात राहणा-या गरीबातील गरीब विद्यार्थ्यांनाही ताडोबाची व्याघ्र सफारी व्हावी, त्यांना वनांचे निरीक्षण जवळून करता यावे तसेच पर्यावरणाचा अभ्यास व्हावा, यासाठी जिल्ह्यातील 7500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ‘चला जाणूया वनाला’ या उपक्रमांतर्गत मोफत वनपर्यटन, व्याघ्र दर्शन घडविण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर राज्यातील 75 हजार विद्यार्थ्यांना ताडोबासह राज्यातील इतर अभयारण्यात वन व वाघ्र पर्यटनाचे मोफत नियोजन करण्यात येणार आहे.

    नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत नवीन क्रुझर वाहनांसाठी 92 लक्ष 79 हजार रुपयांचा निधी

    ताडोबा वन्यजीव कोअर विभागात जिप्सी व कॅन्टर वाहनाद्वारे पर्यटक सफारीचा आनंद घेतात. कोअर विभागातील बरेच रस्ते एकेरी व छोटे असल्याने कॅन्टर वाहन जाण्यास अडचण निर्माण होते. तसेच या वाहनांच्या आवाजामुळे इतर पर्यटकांना त्रास होतो. त्यामुळे कँटरद्वारे सफारी करणाऱ्या पर्यटकांना दर्जेदार पर्यटनाचा अनुभव देण्याच्या दृष्टीने नऊ आसनाचे क्रुझर पर्यटन वाहन सुरू करण्याची संकल्पना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली. यासाठी जिल्हा वार्षिक योजना (2022-23) नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत क्रुझर वाहन खरेदी करण्यासाठी 92 लक्ष 79 हजार रुपयांचा निधी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त झाला.
    नवीन क्रूझर वाहनात जंगल सफारीच्या दृष्टीने आवश्यक बदल करण्यात आले आहेत. ही वाहने मोहर्ली गेटवरून पर्यटकांसाठी नियमीत उपलब्ध राहतील. या वाहनांसाठी बुकींग व्यवस्था पूर्वीप्रमाणेच बुकींग मशीनद्वारे क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर कार्यालयात उपलब्ध राहील.

    महसूल विभागासाठी 10 नवीन बोलेरो :

    महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर गतीमान प्रशासन तथा आपात्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेंतर्गत महसूल विभागातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्यासाठी 10 नवीन बोलेरो गाड्यांचे लोकार्पण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

  • ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

    ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

    News34 chandrapur

    चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा भारतातील एक महत्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे. या व्याघ्र प्रकल्पाची जैवविविधता संपन्न व समृद्ध आहे. यामध्ये 80 प्रजातीचे सस्तन प्राणी, 280 पेक्षा पक्ष्यांच्या प्रजाती, 54 प्रजातीचे सरपटणारे प्राणी, 125 प्रजातींची फुलपाखरे, 670 पेक्षा अधिक वनस्पतींच्या प्रजातीने या वनाची समृद्धता वाढवली आहे. तर 79 टक्के वन हे बांबू वनाचे असून वाघाकरीता हा उत्तम असा अधिवास आहे. सन 2021-22 मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेनुसार या व्याघ्र प्रकल्पामध्ये 87 वाघाची नोंद झाली आहे.

     

    सन 1955 रोजी या वनाला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा प्राप्त झाला. सन 1986 मध्ये अंधारी अभयारण्य घोषित करण्यात आले आणि सन 1995 ला वाघांचा अधिवास अधिक सुरक्षित व अबाधित राखण्यासाठी या वनाला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देऊन गौरविण्यात आले आहे. या वनाच्या गाभा क्षेत्राचे काटेकोरपणे संरक्षण व संवर्धन व्हावे या हेतूने, सन 2010-11 मध्ये बफर क्षेत्र घोषित करण्यात आले. या बफर क्षेत्रात 90 पेक्षा अधिक गावे असून या ठिकाणच्या वन क्षेत्रातसुद्धा वाघाचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. म्हणून ही गावे व्याघ्र प्रकल्पाच्या विकासात्मक उपक्रमामध्ये जोडण्यात आली. साधारणत: 1 लाख लोकसंख्या असलेल्या या क्षेत्रात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेअंतर्गत विविध, सर्व स्तरावर विकासात्मक कामे करण्यात येऊ लागली आणि यातील स्थानिक विद्यार्थ्यांना निसर्ग शिक्षणासंदर्भात जनजागृती व्हावी या करीता “चला माझ्या ताडोबाला” हा महत्वपूर्ण व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवायला सुरवात झाली.

     

    याशिवाय, चंद्रपूर जिल्ह्यातील इतर वन क्षेत्रातसुद्धा वाघाचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्रात 2022-23 च्या व्याघ्र गणनेनुसार 414 वाघांची नोंद झाली. यापैकी 200 पेक्षा अधिक वाघ केवळ चंद्रपूर जिल्ह्यात आहे. म्हणून चंद्रपूरची ओळख वाघाचा जिल्हा अशी आहे.

     

    अशा या जैवविविधतेने संपन्न असलेल्या व्याघ्रभूमीचे संरक्षण व संवर्धन लोकसहभागातून व्हावे, स्थानिकांना वनाचे महत्व कळावे आणि विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यात एक जबाबदार नागरीक म्हणून वनसंवर्धन व संरक्षणासाठी योगदान द्यावे, या हेतूने, निसर्ग संवर्धनातून वनसंवर्धन हा उपक्रम नियमित राबविण्यात येत आहे. याकरीता सन 2015-16 पासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत बफर क्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी “चला माझ्या ताडोबाला” हा महत्वपूर्ण जन-जागृतीचा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांच्या मनात निसर्गाविषयी आवड निर्माण करणे आणि वने व वन्यजीव संवर्धनात त्यांचा सहभाग वाढविणे हा होय.

     

    सन 2022-23 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 135 शाळेतील 5 हजार विद्यार्थी या उपक्रमामध्ये उत्साहपूर्वक सहभागी झाले होते. तसेच जिल्ह्यातील 27 आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा सुद्धा सहभाग होता हे विशेष. यावर्षी सन 2023-24 मध्ये सुद्धा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार, दि. 29 नोव्हेंबर 2023 पासून या उपक्रमाची सुरवात मुल वनपरिक्षेत्रातील भगवानपूर, फुलझरी, करवण, काटवन व डोणी येथील शाळेपासून होत आहे. यातील भगवानपूर हे गाव सन 2007 मध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधून स्वयंइच्छेने पुनर्वसित झालेले गाव आहे. हे गाव कोळसा व बोटेझरी या दोन गावांना एकत्रित करून या गावाचे नाव भगवानपूर ठेवण्यात आले आहे. म्हणून या वर्षी प्रथम प्राधान्य या गावाला देण्यात आले आहे.

     

    चालू वर्षात प्रथम ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील व या व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वसित झालेल्या अशा सर्व गावातील एकूण 121 शाळेतील 5 हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ताडोबा वनभ्रमंती सोबतच निसर्ग शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात येईल आणि वने व व्याघ्र संवर्धनाची चळवळ अधिक प्रबळ या माध्यमातून करण्यात येईल, असे ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने कळविले आहे.

  • 2036 च्या ऑलम्पिक ची तयारी चंद्रपूर जिल्ह्यातून – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    2036 च्या ऑलम्पिक ची तयारी चंद्रपूर जिल्ह्यातून – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – वर्ष 2036 ला भारतात ऑलम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्याचा मानस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला होता, त्याअनुषंगाने चंद्रपुर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन 26 ते 31 डिसेंबर ला करण्यात येणार आहे. ही स्पर्धा म्हणजे वर्ष 2036 च्या ऑलम्पिक ची तयारी आहे अशी प्रतिक्रिया पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिली.

     

    स्कुल गेम फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या नियमानुसार दरवर्षी राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते, यंदा 14 वर्षाच्या आतील मुले/मुली क्रीडा स्पर्धा आयोजनाचा मान उत्तरप्रदेश राज्यातील गोरखपूर जिल्हा, 17 वर्षाखालील मुले/मुली पटना बिहार व 19 वर्षाच्या आतील मुले/मुली क्रीडा स्पर्धेचा आयोजनाचा मान चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र ला मिळाला आहे.

     

    याबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेत आयोजनाबाबत माहिती दिली.

    पालकमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले की ही स्पर्धा देशातील खेळाडू ऑलम्पिक स्पर्धेसाठी तयार व्हावे आमचा मानस आहे, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंना आगामी स्पर्धेबाबत प्रेरणा मिळेल.

     

    4 दिवस चालणाऱ्या स्पर्धेची सुरुवात 26 डिसेंम्बर ला नोंदणी च्या माध्यमातून होणार असून 27 डिसेंम्बर ला क्रीडा स्पर्धेचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे उपस्थित राहणार असून उदघाटन कार्यक्रमात देशाचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

     

    राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण 28 राज्य व 8 केंद्र शासित प्रदेश मिळून एकूण 3 हजार खेळाडू, 200 तांत्रिक अधिकारी, पंच, 500 स्पोर्टींग स्टाफ, स्वयंसेवक व जवळपास 500 पालकांचा सहभाग असणार आहे.

     

    आयोजित ऐथलीट खेळांमध्ये हॅमर थ्रो, हाय जम्प, लॉंग जम्प, जेव्हलीन थ्रो असे विविध खेळ होणार आहे.

    आयोजित स्पर्धेचे थेट प्रक्षेपण चंद्रपूर व बल्लारपूर शहरातील विविध भागात एलईडी टीव्ही द्वारे होणार आहे.

     

    राष्ट्रीय शालेय स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्पर्धेची मशाल प्रज्वलित करीत रायगड किल्ल्यापासून ते मंत्रालय पर्यंत व दुसऱ्या टप्प्यात गेट वे ऑफ इंडिया पासून ते चंद्रपूर जिल्ह्यात या मशालीचे आगमन होणार आहे, यादरम्यान रायगड, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर या जिल्ह्यातून मशालीचे आगमन होत असताना भव्य स्वागत व विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.

     

     

    आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेत 20 मैदानी बाबीचा समावेश आहे, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची जनजागृती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी जिल्ह्यातील क्रीडा संघटना, क्रीडा मंडळ, सामाजिक संघटना, समाजसेवी संस्था, नेहरू युवा केंद्र, स्काऊट गाईड यांच्या माध्यमातून विविध स्कुटर रॅली, टॉर्च रॅली व शोभायात्रा काढत क्रीडा क्षेत्रातील नामवंत खेळाडूंचा समावेश करून जिल्ह्यात क्रीडा वातावरण तयार करणार आहे.

     

     

    विशेष म्हणजे स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू, पालक व प्रशिक्षक व बाहेरून येणाऱ्या सर्व मान्यवरांसाठी मोफत ताडोबा जंगल सफारीचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे.

     

    ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा म्हणजे आपल्या राज्य व देशातील खेळाडूंची मिशन ऑलम्पिक ची तयारी आहे अशी माहिती पालकमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

    चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या खेळाडूंना आयोजनाबाबत समस्या उदभवू नये यासाठी नागपूर एअरपोर्ट, चंद्रपूर रेल्वे स्टेशन व बस स्थानक वरून बसेसची व्यवस्था, डिजिटल बुक, चॅट बॉट व टोल फ्री क्रमांकची व्यवस्था करण्यात आली आहे.