Tag: आमरण उपोषण

  • local security guards losing jobs । स्थानिकांना डावलले! सुरक्षा रक्षकांसाठी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा

    local security guards losing jobs

    local security guards losing jobs : चंद्रपूर – टाकळी जेनाच्या अरविंदो रियल्टी एंड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने (Aurobindo Realty and Infrastructure Private Limited Company) माजी सैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते मनोज ठेंगणे यांच्या मेपल 365 सुरक्षा सेवा प्रा. लि. मधील सर्व सुरक्षा रक्षकांना काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे 74 स्थानिक सुरक्षा रक्षकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात, मनोज ठेंगणे यांनी पत्रकार परिषदेत संकेत दिले आहेत की जर संबंधित सुरक्षा रक्षकाची नोकरी कायम केली नाही तर 20 जून रोजी कंपनीसमोर उपोषण केले जाईल. Fast unto death

    विद्यार्थ्यांसाठी एक खिडकी योजना राबवा – आमदार जोरगेवार


    पत्रकार परिषदेत मनोज ठेंगणे यांनी सांगितले की, टाकळी जेनाच्या अरविंदो रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही कोळसा खाण कंपनी आहे. या कंपनीने ऑगस्ट 2023 मध्ये मॅपल 365 सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक आणि (ex-serviceman) माजी सैनिक मनोज ठेंगणे यांच्याशी सुरक्षेसाठी करार केला होता. या सुरक्षा कंपनीअंतर्गत टाकळी आणि जेना गावातील स्थानिक नागरिकांमधून एकूण 74 रक्षक कंपनीच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते.

    करार रद्द केला

    सर्व स्थानिक लोक सुरक्षा एजन्सीमध्ये कार्यरत आहेत. परंतु अलीकडेच कंपनीने या सुरक्षा कंपनीसोबत केलेला करार रद्द केला आहे. या संदर्भात एक मेल देखील पाठवण्यात आला आहे. सुरक्षा सेवा कंपनीचे संचालक मनोज ठेंगणे यांनी आरोप केला आहे की अरविंदो कंपनीच्या अशा प्रकारच्या धोरणामुळे सुरक्षेसाठी तैनात असलेले 74 स्थानिक सुरक्षा रक्षक बेरोजगार होतील. त्यांनी सांगितले की अरविंदो कंपनी आता बिहारच्या एसआयएस सिक्युरिटी एजन्सीसोबत करार करणार आहे.

    74 स्थानिक सुरक्षा रक्षकांवर अन्याय

    संबंधित कंपनीने नागपूर, यवतमाळ, वर्धा, भंडारा येथील 60 सुरक्षा रक्षकांना कंपनीच्या आवारात आणले आहे. कोणत्याही कंपनीत स्थानिकांना प्राधान्य देण्याच्या सरकारने दिलेल्या सूचना असूनही, अरविंदो कंपनी त्याकडे दुर्लक्ष करत आहे. अरविंदो कंपनी आता विस्तार वाढत आहे. अशावेळी इतर राज्यांतील सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करून आम्हा 74 स्थानिक सुरक्षा रक्षकांवर अन्याय केला जात आहे. स्थानिक सुरक्षा रक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी 20 जूनपासून कंपनीसमोर अन्नत्याग उपोषण करणार असल्याचा इशारा माजी सैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते मनोज ठेंगणे यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिला आहे.

  • कोराडी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणावर तोडगा काढा – आमदार प्रतिभा धानोरकर

    कोराडी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणावर तोडगा काढा – आमदार प्रतिभा धानोरकर

    News34 chandrapur

    चंद्रपूर – महाराष्ट्रातील सर्व महाऔष्णिक विद्युत केंद्रातील उर्जा विभागातील प्रगत कुषल प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने महाऔष्णीक विद्युत केंद्र कोरोडी येथे उर्जा विभागातील प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी आपल्या मागण्या घेऊन 17 जानेवारी पासून आमरण उपोषणाकरीता बसले आहे. त्यासंदर्भात तात्काळ तोडगा काढण्याची मागणी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

     

    महाराष्ट्रातील सर्व  महाऔष्णिक विद्युत केंद्रातील प्रगत कुशल प्रषिक्षणार्थ्यांच्या वतीने 17 जानेवारी पासून विविध मागण्यांच्या संदर्भात आमरण उपोषणास सुरुवात केली असून त्यातील काही प्रशिक्षणार्थ्यांची प्रकृती खराब झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. आठ दिवस होऊन देखील शासनाने कुठलीही दखल न घेतल्याने आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्र व्यवहार करुन सदर आंदोलनावर तात्काळ तोडगा काढण्याची विनंती केली आहे.

     

    या आधी देखील आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी प्रकल्पग्रस्तांच्या रास्त मागण्या घेऊन विधानसभेत आवाज उठवला तसेच शासन दरबारी बैठकांचे आयोजन देखील केले. परंतू सरकार यावर गंभीर नसल्याची भावना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केली आहे.

     

    चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या प्रकल्पग्रस्त ऊर्जा विभागातील कुशल प्रशिक्षणार्थ्यांचा देखील या आंदोलनाला पाठींबा असून यासर्व मागण्या संदर्भात तातडीने पावले उचलावी अशी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात आमदार प्रतिभाताई धानेारकर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे.

  • आमरण उपोषण करणाऱ्या महिलांची देशमुख यांनी घेतली भेट

    आमरण उपोषण करणाऱ्या महिलांची देशमुख यांनी घेतली भेट

    News34 chandrapur

    चंद्रपूर – भद्रावती तालुक्यातील कर्नाटका एम्टा कोळसा खाणीच्या प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी मागील वीस दिवसांपासून बरांज-मोकासा गावातील सावित्रीच्या प्रकल्पग्रस्त लेकींचे आंदोलन सुरू आहे. कर्नाटका पाॅवर कंपनीच्या कोळसा खाणीच्या मार्गावर मंडप टाकून महिलांनी 14 डिसेंबर 2023 पासून साखळी उपोषण सुरू केले.27 डिसेंबर पासून बरांज-मोकासा येथील पल्लवी कोरडे या महिलेने आमरण उपोषण सुरू केले. आज या उपोषणाचा आठवा दिवस आहे.

    क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 3 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजेदरम्यान जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांचेसह घनश्याम येरगुडे,राहुल दडमल, अमोल घोडमारे व प्रविण बारसागडे यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्या तसेच आंदोलनात सहभागी सावित्रीच्या लेकींशी चर्चा केली.यावेळी उपस्थित असलेल्या शेकडो महिला आंदोलनकर्त्यांना देशमुख यांनी संबोधित केले.

     

    कोणत्याही प्रकल्पासाठी शेतजमीन किंवा घर देणारा शेतकरी-घर मालक हा त्या प्रकल्पाचा भागधारक म्हणून त्याला योग्य सन्मान व योग्य मोबदला मिळणे गरजेचे आहे. मात्र प्रकल्पांसाठी जमिनी अधिग्रहित करणाऱ्या कंपन्या किंवा शासन प्रकल्पग्रस्तांना योग्य सन्मान व योग्य मोबदला देत नाही.अशा प्रकल्पग्रस्तांसाठी संघर्ष करण्याची जनविकास सेनेची भूमिका असून बरांज-मोकासा येथील आंदोलनकर्त्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देशमुख यांनी दिले.

     

    अत्यंत धोकादायक :
    कोळसा खाणीच्या काठावरच गाव आणि जिल्हा परिषद शाळा

    पप्पू देशमुख यांनी काही आंदोलनकर्त्यांसह बरांज-मोकासा गाव,कर्नाटक पावर कंपनीची कोळसा खाण तसेच जिल्हा परिषद शाळा या संपूर्ण परिसराची पाहणी केली. यावेळी अनेक धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या. गावाच्या पश्चिमेला कर्नाटक एमटा च्या जुन्या कोळसा खाणीचा मोठा खड्डा आहे. याठिकाणी कोळशाचे उत्खनन पूर्ण झाले असून खड्ड्यात पाणी साचले आहे. खड्ड्याला लागून केवळ 20 मीटरच्या अंतरावर जिल्हा परिषद ची प्राथमिक शाळा आहे.

     

    खड्ड्याच्या बाजूला शाळेची संरक्षण भिंत असून या भिंतीला असलेले प्रवेशद्वार पूर्णवेळ खुले असते. याच पटांगणात ग्रामपंचायतचे कार्यालय आहे.शाळेच्या बाजूला लागून असलेला खड्डा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय धोकादायक असतानाही त्याची दखल आजपर्यंत घेण्यात आलेली नाही. बरांज-मोकासा गाव, जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत कार्यालय सर्वच अत्यंत धोकादायक स्थितीत असुन प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया देशमुख यांनी दिली.

  • सरपंच संघटनेच्या उपोषण आंदोलनाची पालकमंत्री व प्रशासनाने घेतली दखल

    सरपंच संघटनेच्या उपोषण आंदोलनाची पालकमंत्री व प्रशासनाने घेतली दखल

    News34 chandrapur

    चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी विरोधात दत्तक गाव सरपंच संघटनेच्या वतीने 13 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर पर्यंत साखळी पोषण व तीन दिवस अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हा सचिव रत्नाकर चटप, ग्रा.पं.आवाळपूरचे उपसरपंच बाळकृष्ण काकडे यांनी आमरन उपोषण केले. विविध राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक संस्थांचा पाठिंबा व स्थानिक नागरिकांचा रोष बघता अखेर 18 नोव्हेंबरला रात्री 10 वाजता अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडून मिळालेल्या लेखी आश्वासनानंतर उपोषण सुटले. या आंदोलनाची दखल जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे. मागण्यांची पूर्तता करण्याचे निर्देश त्यांनी अल्ट्राटेक प्रशासनाला दिले आहे.

     

    जिल्हाधिकारी डॉ.विनय गौडा, मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगडे, कोरपना तहसीलदार व्हटकर, अल्ट्राटेकचे सीएसआर प्रमुख प्रतीक वानखेडे, किरण करमणकर, सरपंच संघटनेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई व दत्तक गावातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत चंद्रपूर येथे नियोजन भवनात नुकतीच बैठक पार पडली. यावेळी दत्तक गाव सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हा सचिव रत्नाकर चटप यांनी सरपंच संघटनेच्या मागण्यांविषयी चर्चा केली.

     

    अल्ट्राटेक कंपनीने गावासाठी मोठ्या प्रमाणात सीएसआर निधी खर्च करावा, गावातील पांदण रस्त्यासाठी कंपनीच्या डोलामाईट मधून पांदन रस्त्याचे बांधकाम करावे, स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा या प्रमुख मागण्या केल्या. पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी सदर मागण्या रास्त असून त्या पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, संवर्ग विकास अधिकारी, तहसीलदार व अल्ट्राटेक प्रशासनाला दिले. परिसरातील व दत्तक गावातील आयटीआय, पॉलिटेक्निक, बीई झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व रोजगार, दत्तक गावांमध्ये सुसज्ज क्रिडांगणाचे बांधकाम व प्रदूषण नियंत्रक सयंत्र तात्काळ बसवण्यासह सीएसआर निधी खर्च करत असताना ग्रामपंचायत प्रशासनाला विश्वासात घेवून नियोजन करावे असे कंपणी प्रशासनाला निर्देश दिले.

     

    नियोजन बैठकीला अ.भा.सरपंच संघटनेचे जिल्हा सचिव रत्नाकर चटप, नांदा गावचे उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, आवाळपूरचे सरपंच प्रियंका दिवे, उपसरपंच बाळकृष्ण काकडे, हिरापूरचे सरपंच सुनीता तुमराम, उपसरपंच अरुण काळे, सांगोळाचे माजी सरपंच सचिन बोंडे, भोयेगावचे सरपंच शालिनी बोंडे, बाखर्डीचे सरपंच अरुण रागीट, नोकरीचे सरपंच संगीता मडावी, पत्रकार रवी बंडीवार प्रामुख्याने उपस्थित होते.

    कंत्राटी कामगारांचे मांडले प्रश्न..

    दत्तक गाव सरपंच संघटनेच्या वतीने यावेळी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीत काम करणाऱ्या कंत्राटी कामगाराच्या वेतना बाबतचा प्रश्न सरपंच संघटनेने मांडला. 120 रुपये दर दिवसाच्या रोजीत वाढ करावी ही प्रमुख मागणी करण्यात आली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी कामगार कल्याण आयुक्त यांच्या सोबत बैठक बोलावून सदर मुद्द्यांवरती चर्चा केली जाईल, असे शिष्टमंडळाला सांगितले.

  • अखेर अल्ट्राटेक सिमेंट प्रशासनाकडून सरपंच संघटनेच्या मागण्या मान्य

    अखेर अल्ट्राटेक सिमेंट प्रशासनाकडून सरपंच संघटनेच्या मागण्या मान्य

    News34 chandrapur

    कोरपना (चंद्रपूर) : –  कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवाळपूर अंतर्गत असलेल्या दत्तक गावातील दहा ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी कंपनी विरोधात 13 नोव्हेंबरपासून धरणे आंदोलन व बेमुदत साखळी उपोषण केले. अल्ट्राटेक सिमेंट प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने अखिल भारतीय सरपंच संघटनेचे जिल्हा सचिव तथा ग्रामपंचायत नांदाचे सदस्य रत्नाकर चटप व आवाळपूर ग्राम पंचायतीचे उपसरपंच बाळकृष्ण काकडे यांनी १६ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले. तब्बल तीन दिवसानंतर आंदोलनाची धार तीव्र झाली असताना गावातील व्यापारीमंडळ विविध पक्ष, सामाजिक संघटना व गावकऱ्यांच्या पाठिंब्यामुळे अल्ट्राटेक कंपणी प्रशासन नरमले. कंपनी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत सरपंच संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली.

     

    शिष्टमंडळात नांदा गावचे उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, बाखर्डीचे सरपंच अरुण रागीट, पत्रकार प्रमोद वाघाडे, हिरापूरचे उपसरपंच अरुण काळे, सांगोडाचे माजी सरपंच सचिन बोंडे, चंदू राऊत उपस्थित होते. सरपंच संघटनेच्या मागण्यांची भूमिका स्पष्ट करुन कंपनी प्रशासनाने मागण्या मान्य करण्याचे लेखी पत्र दिले. काल (ता.१८) रात्री १० वाजता अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे उपव्यवस्थापक नारायणदत्त तिवारी व सतीश मिश्रा यांनी उपोषणकर्ते रत्नाकर चटप व बाळकृष्ण काकडे यांना लिंबू पाणी पाजून लेखी पत्र देत आमरण उपोषण सोडवले. नांदा, बिबी, आवाळपूर, हिरापूर, सांगोडा, भोयगाव, बाखर्डी, तळोधी, नोकारी, पालगाव या गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी अथक प्रयत्न केले.

     

    या मागण्या केल्या मान्य

    अल्ट्राटेक सिमेंट कंपणी अंतर्गत दत्तक गावात सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) संबंधित गावातील सरपंच व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून कामे केली जातील. दत्तक गावातील आयटीआय व तांत्रिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण रोजगारासाठी प्राधान्य दिले जाईल. पोलीस व सैन्य भरती तयारीसाठी कंपणीतील मैदान दत्तक गावातील मुलांना उपलब्ध करण्यात येईल. दरवर्षी गावातील मुख्य रस्त्यांवर होणारा कचरा स्वच्छतेसाठी मशीन उपलब्ध करण्यात येईल. दत्तक गावातील कुठल्याही दुर्घटनेत रुग्णवाहिका व अग्निशमन यंत्र कंपणीकडून उपलब्ध करण्यात येईल.

     

    आंदोलनातील या कृतीने अल्ट्राटेक प्रशासन धास्तावले

    आंदोलनात दहा गावातील सरपंच व लोकप्रतिनिधी एकत्र येत धरणे व उपोषण केले. विविध राजकिय व सामाजिक संघटनांनी पाठींबा दिला. प्रहारचे जिल्हाध्यक्ष सतीश बिडकर यांनी रक्तांनी पत्र लिहीले. संतप्त गावक-यांनी कंपणीविरोधात मुंडन केले. ‘मी माझ्या गावासाठी’ असे फलक गावक-यांनी लावले. सिमेंट कंपणींच्या अधिका-यांना दत्तक गावांनी गावबंदी केली. आंदोलनाची तिव्रता वाढल्याने अखेर ६ दिवसानंतर अल्ट्राटेक प्रशासन धास्तावले व आंदोलनस्थळी येत मागण्यांची पुर्तता केली.

     

    अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवाळपूर विरोधात करण्यात आलेल्या आमरण उपोषणानंतर कंपनी प्रशासनांनी मागण्या मान्य केल्या. या मागण्यांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यासोबतच गावकऱ्यांसह कामगार, गावातील तरुणांच्या रोजगाराबाबत दत्तक गाव सरपंच संघटना कंपनी प्रशासनाकडे आग्रही आहे. सदर मागण्यांकडे कंपनी प्रशासनांने दुर्लक्ष केले तर पुन्हा आंदोलन करण्यात येईल.

    – रत्नाकर चटप
    जिल्हा सचिव, अ.भा.सरपंच परिषद तथा ग्रा.पं.सदस्य नांदा

  • अल्ट्राटेक कंपनी विरोधात साखळी उपोषणानंतर आता आमरण उपोषणाला सुरुवात

    अल्ट्राटेक कंपनी विरोधात साखळी उपोषणानंतर आता आमरण उपोषणाला सुरुवात

    News34 chandrapur

    चंद्रपूर – कोरपणा तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवरपुर अंतर्गत असलेल्या दत्तक गावातील दहा ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी कंपनी विरोधात 13 नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन व बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली होती. मात्र अजून पर्यंत कंपनीकडून या आंदोलनाची कुठलीही दखल घेण्यात आली नाही त्यामुळे सरपंच संघटनेच्या वतीने 16 नोव्हेंबर पासून आमरण उपोषण पुकारण्यात आलेला आहे.

     

    यावेळी रत्नाकर चटप (ग्रा.प सदस्य नांदा तथा अखिल भारतीय सरपंच संघटना जिल्हा सचिव) व बाळकृष्ण काकडे (उपसरपंच आवरपुर) हे दोघे आमरण उपोषण करीत असून उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे.

     

    कंपनीच्या सी एस आर निधी मधून ग्रामपंचायतींना पाहिजे त्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येत नसल्याचा ठपका ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ठेवला आहे. सोबतच ग्रामपंचायत प्रशासनाला विश्वासात न घेता निधी परस्पर खर्च केला जात आहे . कंत्राटी कामगारांचया बोनसमध्ये वाढ करावी.

     

    स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्यावा .कंपनीने माणिकगड येथे होणारी लाईम स्टोनची वाहतूक तात्काळ थांबवावी आय टी आय विद्यार्थ्यांना अप्रेंटिस करता जागा भरती करावी . गाव शिवारातील पांदन रस्त्याची दुरुस्ती कंपनीमार्फत करण्यात यावी . इतर राज्यातील शिक्षित युवकांना आणून कारखान्याच्या माध्यमातून प्रशिक्षित केल्या जाते दत्तक घेतलेल्या गावांमध्ये अनेक युवक सुशिक्षित आहे अशा प्रशिक्षण झालेल्या युवकांना ट्रेनिंग म्हणून घेण्यात यावे, वाढते प्रदूषण बंद करावे दिवसेंदिवस कारखान्याच्या माध्यमातून वाढत्या प्रदूषणामुळे आजूबाजूच्या दत्तक गावामध्ये राहणाऱ्या अनेक नागरिकांना कॅन्सर अपेंडिक्स हर्निया त्वचेचे रोग असे विविध आजार होत असताना दिसत असून अनेकांनी यामध्ये आपले जीव सुद्धा गमावलेले आहे.

     

    कंपनीच्या प्रदूषणामुळे झाल्याचे तज्ञाचे म्हणणे आहे. यावरती कंपनीकडून कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना केल्या जात नाही मात्र, परिसरातील नागरिकांच्या जीवाशी कंपनी खेड करीत आहे. ही समस्या त्वरित निकाली काढावी सी एस आर फंड च्या नावाखाली कंपनी इतर जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठानंना व अधिकारी लोकांना यातील फंडाचा हिस्सा वाटप करतानाचे चित्रसुद्धा दिसून येत आहे. ते त्वरित बंद करावे इत्यादी मागण्यासाठी सरपंच संघटना आक्रमक पवित्र घेत असून दत्तक गावातील नांदा, बीबी, आवरपूर, हिरापूर, सांगोडा, नोकारी,पालगाव तळोदी, बाखर्डी, भोयेगाव गावातील सरपंच उसरपंच सदस्य अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या माध्यमातून सदर आंदोलन करीत आहे. या आंदोलनाला दत्तक गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     

    आमरण उपोषण आंदोलनाला ओबीसी नेते राजेश बेले यांचा जाहीर पाठिंबा

    चंद्रपूर : जिल्ह्यातील आवरपुर येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या दत्तक गावांमध्ये सीएसआर निधी खर्च न करण्याच्या कंपनीच्या धोरणाविरोधात 13 नोव्हेंबर 2023 रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन व साखळी उपोषण करण्यात आले. या आंदोलनाला ओबीसी नेते राजेश बेले यांनी पाठिंबा दर्शविला.

    Ultra tech cement company avarpur
    सरपंच संघटनेच्या आंदोलन मंडपात ओबीसी नेते राजेश बेले, आंदोलनाला दिला पाठिंबा

    आवारपुर कंपनीच्या दत्तक गावांमध्ये आवाळपूर, नांदा, बीबी हिरापूर सांगोडा, पालगाव, नोकारी, बाखर्डी, तडोधी, भोयेगाव या गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कंपनी क्षेत्रात कार्यरत आहे. मात्र सन 2020 ते 2023 या सत्रामध्ये कंपनी प्रशासन सदर दत्तक गावांमध्ये सीएसआर निधी खर्च करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे. यामुळे गावातील आरोग्य, पाणी आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न निर्माण होत आहे. कंपनीच्या प्रदूषण तसेच ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याची अवस्था बिकट झालेली असून अपघाताचे प्रमाणही वाढत चाललेले आहे. याबाबत दत्तक गावातील सरपंच, उपसरपंच सदस्य यांनी कंपनी प्रशासनाकडे विविध विकास कामांची मागणी केली.

    मात्र कंपनी प्रशासनाने या मागण्या मान्य करण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी 13 नोव्हेंबर रोजी शिवाजी चौक नांदाफाटा येथे एक दिवसीय धरणे आंदोलन व साखळी उपोषण केले. या आंदोलनाला ओबीसी नेते राजेश बेले यांनी पाठिंबा दर्शविला. त्यांनी मागण्यात आलेली मंजूर करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

  • वनाधिकारी व BVG कंपनी विरोधात चंद्रपुरातील कामगार संघटना आक्रमक

    News34 chandrapur

    चंद्रपूर : येथील वनविकास व्यवस्थापनातील ४० ते ५० वनमजूर व कंत्राटी कामगार येथे मागील अनेक वर्षांपासून काम करीत आहे. परंतु, १० वनकामगार आणि २५ कंत्राटी कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता वनअधिकाऱ्यांनी त्यांना कामावरून कमी केले आहे. तर दुसरीकडे काही नवीन कामगारांना कामावर घेण्यात येत आहे. हा जुन्या कामगारांवर अन्याय असून, कामावरून कमी केलेल्या कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा इंटक व सिटू संलग्नित वनमजूर व कंत्राटी कामगार निवारण संघर्ष समितीने चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.

     

    आठ ते नऊ वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांना वनरक्षकाने ३१ ऑक्टोबर रोजी बैठक घेत १ नोव्हेंबरपासून कामावर येऊ नका असे आदेश दिले. २५ कामगार कामावरून कमी करण्यात आले असून,पुढील आठवडाभरात आणखी कामगारांना कमी करण्यात येईल, असे यावेळी या कामगारांना सांगण्यात आले. तर दुसरीकडे नवीन कामगार कामावर घेतले जात आहे.

     

    जुन्या कामगारांना कामावरून कमी करून नवीन कामगार घेणे अन्यायकारक असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. दरम्यान, संघटनेने संचालक रेड्डी व उपसंचालक यांची भेट घेत कामावरून कमी करण्यात येऊ नये अशी मागणी केली. परंतु, अद्याप कामगारांना कामावर पूर्ववत घेण्यात आले नाही. त्यामुळे वनअधिकारी तसेच BVG कंपनीच्या विरोधात कामगारांमध्ये रोष आहे.

     

    कामावरून कमी केेलेल्या कामगारांना ९ नोव्हेंबरच्या आत कामावर न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. पत्रकार परिषदेला संघर्ष समितीचे अध्यक्ष कॉम्रेड वामन बुटले, सचिव नेताई घोष, ॲड. सुनीता पाटील यांच्यासह कामगारांची उपस्थिती होती.

  • मराठा आंदोलनात अखेर देवेंद्र फडणवीसच ठरले ‘संकटमोचक’

    News34 chandrapur

    मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका क्षमवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तारेवरची कसरत सुरू असतानाच त्यांच्या मदतीला धावून आले ते देवेंद्र फडणवीस. मनोज जरांगे – पाटील यांचं उपोषण सोडवण्यासाठी तीन मंत्र्यांसोबत दोन माजी न्यायमूर्ती देखील पोहोचले होते. या न्यायमूर्तींनी योग्य शिष्टाई करून उपोषण थांबवण्यात मोठी भूमिका बजावली. माजी न्यायमूर्ती मारोती गायकवाड आणि दुसरे माजी न्यायमूर्ती सुनिल शुक्रे यांना उपोषणस्थळी जावे ही इच्छा फडणवीस यांनीच व्यक्त केली होती. फलस्वरूप उपोषण मागे घेण्यात त्यांना यश आलं.

     

    मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे – पाटील यांनी ९ दिवस अन्नत्याग केल्याने त्यांची तब्येत खालवली होती. परिणामी राज्यात मराठा आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्याचंही दिसून आलं. तसेच, ओबीसी समाजाच्या नेत्यांवर हल्ले झाल्याच्या घटनाही या काळात घडल्या. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही नाजूक परिस्थिती हाताळणं काहीसं कठीण जात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. त्यातच दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे डेंग्यूच्या आजारामुळे बाजूला पडले होते. त्यांचं आजारपण राजकीय असल्याची चर्चाही दबक्या आवाजात सध्या सुरू आहे.

     

    मात्र, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मदतीला धावून आले ते म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यांनीच मराठा आरक्षणातील कायदेशीर गुंता आणि तो सोडवण्यासाठी लागणारा वेळ ही महत्त्वाची माहिती जरांगे – पाटील यांच्यापर्यंत पोहोचवली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जरांगे-पाटील यांच्या काही मागण्यांना उत्तर देणे सरकारला शक्य नव्हते.

     

    अशावेळी कायदेशीर बाबींचा गुंता सोडविण्याचे काम कायद्याच्या क्षेत्रातील मंडळींनीच केले तर ते सयुक्तिक ठरेल, असा विचार उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडला. न्या. मारोती गायकवाड यांना फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळात मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष करण्यात आले होते. तर दुसरे माजी न्या. सुनिल शुक्रे हे अलीकडेच उच्च न्यायालयातून निवृत्त झाले होते. या दोघांचीही नावं जरांगे – पाटील यांच्याकडे जाण्यासाठी पुढे आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ही कल्पना लागलीच उचलून धरली. या दोन्ही न्यायमूर्तींनी अतिशय योग्यप्रकारे विषयांची मांडणी जरांगे – पाटील यांच्यासमोर केली. सरकारच्या वतीने जे शिष्टमंडळ तयार करण्यात आले होते, त्यातल्या मंत्र्यांनीही जरांगेंकडे या माजी न्यायमूर्तींंचं म्हणणं ऐकण्याची विनंती केली. अखेर त्यानंतर जरांगेंनी उपोषण मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर केला.

     

    ‘टार्गेट’ असूनही फडणवीसांची महत्त्वाची भूमिका
    मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी स्वतः जरांगे – पाटील यांनी फडणवीसांवर आरोप करत यथेच्छ टीका केली होती. तसेच, त्यांच्याविरोधात अरे-तुरेची एकेरी भाषा देखील वापरली होती. आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचा आरोपही त्यांच्यावर लावण्यात आला होता. त्यामुळे सरकारमध्ये फडणवीसच थेट टार्गेट झाले होते. मात्र, याचा कोणताही विशाद मनात न ठेवता आणि राज्यात कायदा – सुव्यवस्था राखत त्यांनी आंदोलन हाताळलं. याहीवेळी मराठा समाजाला खऱ्या अर्थाने धीर देण्यात फडणवीस यशस्वी झाले.

     

    ‘संकटमोचक’ ही जुनी ओळख

    देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने उग्र रूप धारण केले होते. त्यावेळीही ते आंदोलन त्यांनी शिताफीने हाताळले होते. मराठा समाजाला विश्वासात घेऊन त्यांनी आरक्षण देण्याचा निर्णयच तेव्हा जाहीर केला. हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयात टिकले होता. मात्र, फडणवीसांनंतरच्या सरकारने सुप्रीम कोर्टात राज्याची बाजू नीट न मांडल्याने हा निर्णय सुप्रीम कोर्टात टिकला नाही. पण त्यावेळी आंदोलन योग्यरितीने हातळत फडणवीसांनी ‘संकटमोचका’ची भूमिका बजावली होती. त्यावेळची कौशल्य त्यांनी यावेळी देखील वापरल्याने राज्यात आंदोलनाचा उडालेला भडका क्षमवण्यात सरकारला यश आलं.

  • कांग्रेसचा दणका आणि कंपनी संचालक उपोषण मंडपात

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – MIDC मरेगाव येथील जी. आर.कृष्णा फेरो अलाय कंपनीमध्ये कामगार,ड्रायव्हर,आपरेटर यांचेवर होत असलेल्या अन्यायाबाबत कामगारांना पाठिंबा म्हणून काँग्रेसचे नेते सी.डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे मार्गदर्शनात तालुका कांग्रेसच्या वतीने तहसीलदार डॉ .रवींद्र होळी यांना निवेदन देण्यात आले.

     

    यामधे जय भवानी कामगार संघटना यांचेही सहकार्य लाभले. निवेदन देताच तहसीलदार डॉ.रवींद्र होळी यांनी तात्काळ कंपनी प्रशासनाला पत्र देऊन कामगारांच्या मागण्यांवर त्वरित तोडगा काढावा असे आदेश दिल्याने सायंकाळी ५-३० वाजता कंपनीचे डायरेक्टर श्री.मनोज अग्रवाल व उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णराव इंगळे यांचे नेतृत्वात पोलीस निरीक्षक सुमित परतेकी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार ,कांग्रेस तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, युवक शहर अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार, युवक तालुका अध्यक्ष पवन नीलमवार माजी सभापती,संचालक घनश्याम येनुरकर यांचे उपस्थितीत मागण्या मान्य केल्याचे लेखी लिहून दिले व उपोषण मंडपात येऊन उपोषण करतांना उपविभागीय अधिकारी व कंपनी डायरेक्टर मनोज अग्रवाल यांनी पाणी पाजून उपोषण सोडविले.

     

    मान्य केलेल्या मागण्या. १) १ एप्रिल २०२४ पासून १० ते १८ टक्के पगार वाढ देण्यात येईल. २) पेमेंट स्लीप ४ तारखेपर्यंत दिले जाईल. ३) नियमानुसार देण्यात येईल. ४) वैद्यकीय सुविधेचा कार्ड कागद पत्र कंपनीला दील्याबरोबर देण्यात येईल. ५) फक्त ८ तासाचीच ड्युटी देण्यात येईल. ६) स्थानिकानाच प्राधान्य देण्यात येईल. ७) कामावरून कमी केलेल्यांना आवशकता भासल्यास रोटेशन पद्धतीने काम देण्यात येईल. ८) एका महिन्यात २६ दिवसाच्या वर काम केल्यास त्याचा पगार देण्यात येईल. ९) कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी कंपनी प्रशासनाला शिवीगाळ, दमदाटी करणार नाही. अशा स्वरूपात मागण्या मान्य करण्यात असल्याचे लेखी दिले आहे.

  • MIDC कृष्णा फेरो अलाय कंपनीच्या विरोधात कामगारांचे आमरण उपोषण

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – MIDC मरेगाव येथील जी. आर.कृष्णा फेरो अलाय कंपनीमध्ये मागील दोन तीन वर्षापासून काम करणाऱ्या कामगार, ड्रायव्हर,आपरेटर कडून अधिकचे काम करुन घेणे त्याचा मोबदला मागला तर कामावरून काढून टाकण्याची धमकी देणे, पगारात कपात करणे इत्यादी अन्य मागण्या कंपनी प्रशासनाकडून होत नसल्याने संबंधित कामगार यांनी तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेऊन तीन कामगार उपोषनाला बसले असून उर्वरित १८ कामगारांनी त्यांना आपला पाठिंबा दर्शविला असून तेही सोबत उपोषणस्थळी बसले आहेत.

     

    कामगारांच्या उपोषणाला मुल शहर युवक काँग्रेसने अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार यांचे नेतृत्वात जाहीर पाठिंबा दिला असून उपोषण मंडपाला कांग्रेस नेते ,सी डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोषशिंह रावत व संचालक श्री. बनसोड, सभापती राकेश रत्नावार, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, महिला अध्यक्षा रुपाली संतोषवार, शहर अध्यक्ष सुनील शेरकी, तालुका युवक अध्यक्ष पवन निलमवार, महिला अध्यक्षा नलिनी आडपवार ,औद्योगिक सेलचे अध्यक्ष दत्तात्रय समर्थ, माजी नगर सेविका लीनाताई फुलझेले, महिला पदाधिकारी शामला बेलसरे,राधिका बुक्कावार, गणेश गेडाम यांनी भेट देऊन उपोषण कर्त्याशी चर्चा केली. आणि पाठिंम्बा देऊन न्याय मिळून देउ असे आस्वासन दिले आहे.

     

    उपोषण कर्ते कामगार राकेश वाकुडकर ,नितेश घोडे, महेश नेवारे हे आमरण उपोषण करणार असून त्यांना १८ कामगारांनी सोबत पाठिंबा दिला आहे.यामधे संतोष मेश्राम,लवकुष बांग्रे ,अमोल नेवारे ,सुनील बांबोळे, सोमेश्वर सरपते ,मनोज चुदरी ,सागर बेदले, रवी चौखुंडे, बासू कटलावार,आश्विन मडावी,बंडू चंभारे ,सूरज बावनवाडे ,सुदर्शन चौधरी,दशरथ ढोले, मंगेश मोहरले, प्रदीप शेंडे,श्रावण पेंदोर ,सूरज उईके यांनी आपला सहभाग पाठिंबा दर्शविला आहे.

     

    जो पर्यंत आमच्या पूर्ण मागण्या मान्य कंपनी मान्य करणार नाही तोपर्यंत उपोषण सुरु राहणार असा इशारा उपोषण करते कामगार यांनी दिला असून जय भवानी कामगार संघटणेचा पाठिंबा जाहीर केला आहे.