Tag: जिल्हा कृषी महोत्सव

  • चंद्रपुरातील पाच दिवसीय भव्यदिव्य कृषी महोत्सवाचा समारोप, कोण आहे ट्रॅक्टर विजेता?

    चंद्रपुरातील पाच दिवसीय भव्यदिव्य कृषी महोत्सवाचा समारोप, कोण आहे ट्रॅक्टर विजेता?

    News34 chandrapur

    चंद्रपूर : शेतकरी समृध्द आणि आत्मनिर्भर झाला तरच देश प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर होईल, ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात दि.3 ते 7 जानेवारी दरम्यान चांदा ॲग्रो – 2024 चे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले. पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्यात प्रथमच या माध्यमातून कृषी विकासाचे नवे दालन शेतक-यांना उपलब्ध झाले. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाचे सुक्ष्म नियोजन, खिचडीचा विश्वविक्रम आणि शेतक-यांना 13 लाखांचे आकर्षक बक्षीस वाटपाचे पाच दिवसीय कृषी महोत्सवाचा रविवारी समारोप करण्यात आला.

     

     

    कृषी तंत्रज्ञान व्यवस्थान यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने चांदा क्लब ग्राऊंडवर जिल्हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. दि. 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून या कृषी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. पाच दिवसीय या कृषी महोत्सवात दररोज किमान 12 ते 14 हजार याप्रमाणे अंदाजे 60 हजार नागरिकांनी उपस्थिती दर्शविली, तर 25 हजार जणांनी यात नोंदणी केली.

     

     

    पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून 13 लाखांचे आकर्षक बक्षीस वाटप : जिल्हा कृषी महोत्सवात नोंदणी केलेल्या शेतक-यांसाठी लकी ड्रॉ च्या माध्यमातून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून व्यक्तिश: 13 लाखांचे आकर्षक बक्षिसांचे वाटप करण्यात आले. यात प्रथम क्रमांकाचे मिनी ट्रॅक्टर विजेता कोरपना तालुक्यातील वडगाव खिराडी येथील पंढरी गोंडे तर द्वितीय क्रमांकाची बुलेट विजेता उर्जानगर येथील विशाल बारेकर ठरले. याव्यतिरिक्त तिस-या क्रमांकाचे पॉवर टिलर शेणगाव (ता. जिवती) येथील तुकाराम कपडे यांना, चवथ्या क्रमांकाचे पॅडी वीडर नंदोरी (ता. भद्रावती) येथील प्रशांत अहीरकर यांना तर पाचव्या क्रमांकाचे पावर वीडर आमडी (ता. बल्लारपूर) येथील सुभाष तेलतुंबडे यांना मिळाले. याशिवाय पाच विजेत्यांना चाप कटर, पाच विजेत्यांना भाजीपाला किट, 10 विजेत्यांना पॉवर स्प्रेअर, पाच जणांना आटा चक्की अशी बक्षीसे देण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या शेतक-यांचासुध्दा सन्मान करण्यात आला. प्रथमच लकी ड्रॉ च्या माध्यमातून शेतक-यांना आकर्षक बक्षीसे मिळाल्याने शेतक-यांनी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांचे आभार मानले.

     

     

    7000 किलो पेक्षा अधिक खिचडीचा विश्वविक्रम: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी चंद्रपूर येथील कृषी महोत्सवात 7 हजार किलोपेक्षा जास्त तृणधान्यांची खिचडी बनवून विश्वविक्रम नोंदविला. ही खिचडी शाळांमध्ये तसेच शहरातील वस्त्यांमध्ये वाटण्याची व्यवस्था केली. तसेच कृषी प्रदर्शनाच्यास्थळी विविध स्टॉलवर असलेल्या प्रत्येक माणसाला आणि शहरातील 35 हजार लोकांपर्यंत ही खिचडी पोहोचेल, अशी व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली.

     

    बळीराजा समृद्धी मार्ग शेतपाणंद रस्ते अभियानाचा शुभारंभ: जिल्हा कृषी महोत्सवात ‘बळीराजा समृद्धी मार्ग शेतपाणंद रस्ते’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात 5001 कि.मी. चे शेतपाणंद रस्ते तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये मातीकाम पूर्ण झालेले 2055 कि.मी. चे रस्ते, मातीकाम सुरू असलेले 405 कि.मी. चे रस्ते आणि नव्याने प्रस्तावित 3182 कि.मी.चे मुरमीकरणाचे शेतपाणंद रस्ते आणि मुरमीकरण झालेले परंतु खडीकरण बाकी असलेले इतर रस्ते सुरू करण्यात येतील.

     

     

    मिशन जयकिसान अभियानाचा शुभारंभ : कृषी क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा एक मॉडेल बनावा, या भागातील शेतकरी संपन्न व्हावा, शेतीसह कृषीपूरक उद्योगाला जिल्ह्यात चालना मिळावी आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात कृषीवैशिट्य असलेली गावे विकसित व्हावी, या पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अभिनव संकल्पनेतून ‘ मिशन जय किसान’ अभियानाचा कृषी महोत्सवात शुभारंभ करण्यात आला.

     

    31 कोटी 90 लक्ष रुपयांच्या भाजीपाला संशोधन केंद्राला मान्यता : ऐकार्जुना (ता. वरोरा) येथे 25 हेक्टर जमिनीवर 31 कोटी 90 लक्ष रुपये खर्च करून भाजीपाला संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. याबाबत राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी उद्घाटन कार्यक्रमात संशोधन केंद्राला मान्यता देण्यात आल्याचा आदेश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सुपूर्द केला.

     

    पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी : पाच दिवस चाललेल्या कृषी महोत्सवात कृषी विषयक विविध चर्चासत्रे, परिसंवाद यांच्यासोबतच विविधि सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत आणली. सोबतच या कृषी महोत्सवात जवळपास विविध विभागाने 350 स्टॉल लावले होते.

  • चंद्रपुर कृषी महोत्सवात आमदार जोरगेवार प्रशासनावर संतापले

    चंद्रपुर कृषी महोत्सवात आमदार जोरगेवार प्रशासनावर संतापले

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 3 जानेवारीला चंद्रपुरातील चांदा क्लब ग्राउंड येथे कृषी विभाग, जिल्हा प्रशासन व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चांदा ऍग्रो 2024 कृषी महोत्सवाचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

    आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन उपस्थित होते.

     

    जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनपर भाषनानंतर आमदार जोरगेवार यांनी मार्गदर्शन केले मात्र प्रशासनावर यावेळी ते प्रचंड नाराज होत, मला दुसऱ्यांदा कार्यक्रमाला बोलवायचे नाही असे म्हणत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली, मला वेळेवर भाषणाला बोलविता हे चुकीचे आहे, बाबासाहेबांनी सर्वाना समान अधिकार दिला आहे मात्र आपल्या अश्या वागणुकीमुळे माझ्या मतदार संघातील नागरिकांचा हा अपमान आहे.

     

    राज्यात सर्वात जास्त बहुमताने निवडून आलेला मी आमदार आहो, मी 5 लाख लोकांचे प्रतिनिधित्व करतो, जर माझ्या मतदारसंघात कार्यक्रम आयोजित करता तर मला वेळेवर भाषणाला का सांगता, असे असेल तर मला पुन्हा कार्यक्रमाला बोलावू नका.

     

    यापूर्वी आमदार जोरगेवार यांचा झाला अपमान..

    अनुसूचित जाती राखीव प्रवर्गातील विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व मागील 4 वर्षांपासून आमदार जोरगेवार करीत आहे, मात्र यापूर्वी जेव्हाही प्रशासनाने कार्यक्रम घेईल त्यावेळी सुद्धा जोरगेवार यांचा अपमान करीत शिष्टाचाराचे भंग शासकीय अधिकाऱ्यांनी केले आहे, मात्र वारंवार होणारा आमदार जोरगेवार यांचा हा अपमान राजकीय वृत्तीला तर प्रेरित नाही न असा प्रश्न नेहमी नागरिकांना पडत आहे.

  • चांदा एग्रो 2024 चे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते उदघाटन

    चांदा एग्रो 2024 चे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते उदघाटन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील ऐकार्जुना येथे कापूस उत्पादन संशोधन केंद्र असून येथे 23 प्रकारच्या कपाशीची लागवड केली जाते. असेच एक संशोधन केंद्र भाजीपालाकरीता असावे, असा विचार गत महिन्यात ऐकार्जुना येथील शास्त्रज्ञ शेतकरी संवाद कार्यक्रमात आला. त्यानुसार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी केली आणि एक महिन्यातच ही मागणी फळाला येऊन आज जिल्हास्तरीय कृषी महोत्सवात भाजीपाला संशोधन केंद्र मान्यतेचा कागद हाती आला. ऐकार्जुना येथे 31 कोटी 90 लक्ष रुपये खर्च करून उच्च तंत्रज्ञानयुक्त भाजीपाला संशोधन केंद्र उभे राहणार असल्याचा आनंद आहे, अशा भावना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

     

    चांदा क्लब ग्राऊंड येथे आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर कृषी मंत्री धनंजय मुंडे, आमदार किशोर जोरगेवार, म.रा. खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, बांबू बोर्डाचे अध्यक्ष श्रीनिवास राव, ताडोबाचे क्षेत्रीय संचालक जितेंद्र रामगावकर, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रिती हिरुळकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, विनीता व्यास, हरीश शर्मा, राहुल पावडे, देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, नरेंद्र जिवतोडे आदी उपस्थित होते.

     

     

    चंद्रपूर जिल्ह्यात भाजीपाला हा हैद्राबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा येथून येतो, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, कापूस उत्पादन संशोधन केंद्राप्रमाणेच भाजीपाला संशोधन केंद्र जिल्ह्यात असावे, असा विचार गत महिन्यातच आला. त्यानुसार कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी केली आणि एका क्षणात त्यांनी ऐकार्जुना येथे भाजीपाला संशोधन केंद्राला मान्यता दिली. त्यासाठी मी कृषीमंत्री श्री. मुंडे यांचा व्यक्तिश: आभारी आहे.

     

    पुढे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, जगामध्ये कितीही तंत्रज्ञान विकसीत झाले तरी शेतमाल हा मातीतच पिकविला जातो. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात आता तांत्रिक शेती, बांबु शेती, वनशेती, रानभाजी शेती असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. सरकार शेतक-यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून 1 रुपयांत पीक विमा देणारे महाराष्ट्र हे जगात एकमेव उदाहरण आहे. वन्यप्राण्यांमुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे जंगल क्षेत्र असलेल्या गावातील शेतक-यांना राज्य सरकारकडून 90 टक्के अनुदानावर कुंपन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

     

    जिल्हास्तरीय कृषी महोत्सव पाच दिवस चालणार असून यात पशुप्रदर्शनी, 6750 किग्रॅ खिचडीचा विक्रम, 43 इंचाची पुंगनुर गाय, नोंदणी केलेल्या शेतक-यांना लकी ड्रॉ द्वारे शेवटच्या दिवशी आकर्षक बक्षीसे, सांस्कृतिक कार्यक्रम हे विशेष आकर्षण आहे. राज्याचा वित्तमंत्री असतांना प्रत्येक जिल्ह्यात कृषी प्रदर्शनीसाठी 20 लक्ष रुपये देण्याचा निर्णय सर्वप्रथम आपणच घेतला, असेही त्यांनी सांगितले.

     

    85 लक्ष शेतक-यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा – कृषीमंत्री मुंडे

    केंद्र व राज्य सरकार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अग्रेसर असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकटाच्या काळात शेतक-यांना पी.एम. किसान योजनेंतर्गत 6 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेला जोड म्हणून राज्य सरकारनेसुध्दा नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. या अंतर्गत शेतक-यांना राज्य सरकारकडून अतिरिक्त 6 हजार रुपये देण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यातील 97 लक्ष शेतक-यांपैकी 85 लक्ष शेतक-यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता जमा करण्यात आल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. उर्वरीत शेतक-यांच्या खात्यात लवकरच हा हप्ता जमा केला जाणार आहे.

     

    पुढे ते म्हणाले, आज जग बदलले आहे. त्यामुळे शेतक-यांनी पारंपरिक शेतीऐवजी 21 व्या शतकात आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेती करावी व शेतीला व्यवसाय म्हणून स्वीकारावे. स्मार्ट प्रकल्प, स्टार्टअप, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आदींमधून शेतकरी उत्पादक कंपन्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतक-यांच्या शेतमालाला भाव देण्यासाठी एक महिन्याच्या आत राज्य सरकारच्या कृषी विभागाने मोठ्या कंपन्यांसोबत करार केला आहे. सोबतच पेरलेल्या आणि उगविलेल्या मालाला भाव देण्याचा अंदाज कृषी विभाग देणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्यातील 1 कोटी 70 लक्ष शेतक-यांनी सहभाग नोंदविला असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

     

    यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी, बचत गटाच्या महिला, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, आमदार किशोर जोरगेवार आदींनी कृषी महोत्सवातील विविध स्टॉलची पाहणी केली.

     

    जिल्ह्यात दोन मधाचे गाव: चंद्रपूर जिल्हा वाघ, साग, चिमूर क्रांती, कोळसा, वन यासाठी प्रसिध्द आहे. आता पिर्ली आणि मामला या दोन गावांची मधाचे गाव म्हणून निवड झाल्यामुळे चंद्रपूर जिल्हा हनी क्रांतीचा महत्वाचा भाग होईल.

     

    नोंदणी करणा-या शेतक-यांनाच धानाचा बोनस : चंद्रपूर जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा आहे. जिल्ह्यात 1 लक्ष 84 हजार हेक्टरवर धानाची शेती केली जाते. राज्य सरकारने धानाला 20 हजार रुपये प्रति हेक्टर बोनस जाहीर केला आहे. मात्र नोंदणी केलेल्या शेतक-यांनाच या बोनसचा लाभ मिळणार आहे.

     

    फर्निचर क्लस्टरकरीता 48 कोटी रुपये मंजूर : एम.आय.डी.सी.च्या धर्तीवर आता एफ. आय.डी.सी. ची निर्मिती होणार असून लाकडावर कोरीव काम करणा-यांसाठी 48 कोटी रुपये खर्च करून फर्निचर क्लस्टर तयार करण्यात येत आहे.

     

    नाविन्यपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ: यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बळीराजा समृध्दी मार्ग शेतपाणंद रस्ते योजनेचा शुभारंभ, मधाचे गाव म्हणून पिर्ली (ता. भद्रावती) चे उद्घाटन, मिशन जयकिसान योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

  • चंद्रपुरात तयार होणार 6750 किलोग्रॅमची खिचडी

    चंद्रपुरात तयार होणार 6750 किलोग्रॅमची खिचडी

    News34 chandrapur

    चंद्रपूर : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात 3 ते 7 जानेवारी दरम्यान चांदा क्लब ग्राऊंडवर चांदा ॲग्रो – 2024 चे भव्यदिव्य आयोजन करण्यात येत आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थान यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते 3 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रिती हिरुळकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटेवार उपस्थित होते.

     

    या कृषी महोत्सवात शेतीविषयक तंत्रज्ञानासोबतच पशु प्रदर्शनी, चर्चा व परिसंवाद, खिचडी महोत्सव, धान्य महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रमासह नोंदणी केलेल्या शेतक-यांसाठी शेवटच्या दिवशी आकर्षक बक्षिसांची मेजवानी राहणार आहे. कृषी विषयक प्रदर्शन व शासकीय योजना शेतक-यांपर्यंत पोहचविणे, शेतकरी, शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार विपणन साखळी सक्षम करणे, समुह / गट स्थापित करून शेतकरी उत्पादन कंपन्यांचे सक्षमीकरण करणे, कृषी विषयक शेतकरी संवाद आयोजित करून शेतक-यांच्या समस्यांचे निराकरण करणे, विक्रेता ते खरीददार संमेलनाचे आयोजन करून बाजाराभिमुख कृषी उत्पादनास चालना देणे या उद्देशाने जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

     

    6750 किलोग्रॅमची खिचडी मुख्य आकर्षण : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य महोत्सवाच्या निमित्ताने चंद्रपूर येथील जिल्हा कृषी महोत्सवात 6750 किलोग्रॅमची खिचडी तयार करण्यात येणार आहे. यापूर्वी एप्रिल 2022 मध्ये नाशिक येथे बगरीपासून 6000 किलोग्रॅमची खिचडी बनवून इंडिया बुक व आशिया बुकमध्ये नोंद करण्यात आली होती. चंद्रपूर नगरीत जिल्हा कृषी महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र मिलेट महोत्सव अंतर्गत बाजरीचा वापर करून 6750 किलोग्रॅमची खिचडी तयार करण्यात येणार आहे.

     

    43 इंचाची पुंगनूर गाय विशेष आकर्षण :

     

    आंध्र प्रदेशातील चित्तुर प्रांतात आढळणारी पुंगनुर गाय हे या प्रदर्शनाचे आकर्षण राहणार आहे. ही गाय केवळ 2 फुट उंचीची असून रंग पांढरा व भुरकट असतो. वर्षभरामध्ये ही गाय 1000 लीटरहून अधिक तेही फॅटची मात्रा असलेले दूध देते, अशी मान्यता आहे. जिल्हा कृषी महोत्सवात 43 इंचाची पुंगनुर गाय विशेष आकर्षण असणार आहे.

     

    पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रम :

     

    दि.3 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता उद्घाटन समारंभ, गणेश स्तवन व गोंडी नृत्य (सादरकर्ते धनराज कोवे) सायं 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत संगीत रजनी कार्यक्रम. दि.4 जानेवारी रोजी सांय 6 ते रात्री 10 पर्यंत स्थानिक लोककला कार्यक्रम. दि.5 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 1 भव्य विश्वविक्रमी खिचडी (6750 किग्रॅ), सायं 6 ते 8 वाजेपर्यंत श्री दर्शन महाजन, पृथ्वीवरील शेतकरी, मिलेट शो – 2 अंकी नाटक, रात्री 8 ते 10 पर्यंत श्री. अंतबुध बोरकर व संच यांचे स्थानिक आदिवासी लोककला, नाट्य एकांकिका आणि लोककला नृत्य. दि. 6 जानेवारी सायं 6 ते रात्री 10 पर्यंत सुप्रसिध्द पार्श्वगायिका श्रीमती बेला शेंडे स्वराज संगीत रजनी, तसेच चला हवा येऊ द्या फेम हास्य अभिनेते भारत गणेशपुरे यांची विशेष उपस्थिती. शेवटच्या दिवशी 7 जानेवारी रोजी सांय 6 ते रात्री 10 पर्यंत महाराष्ट्राची लोकधारा आयोजित बहारदार कार्यक्रम व इतर कार्यक्रम.

     

    शेतक-यांसाठी आकर्षक बक्षीसे :

     

    कृषी प्रदर्शनासाठी नोंदणी केलेल्या शेतक-यांसाठी कृषी महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी इश्वर चिठ्ठीद्वारे निवडलेल्या शेतक-यांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. यात मिनी ट्रॅक्टर (28 ते 30 एच.पी.), रॉयल एनफिल्ड बुलेट (स्टॅन्डर्ड), पॉवर टिलर, पॅडी विडर, पॉवर विडर, आटा चक्की, भाजीपाला किट, पॉवर स्पेअर, चाप कटर आदींचा समावेश आहे.

     

    कृषी प्रदर्शन :

     

    शासकीय दालने, विविध कंपन्या, खाद्यपदार्थ व प्रात्याक्षिके यांचा समावेश. परिसंवादमध्ये कृषी, कृषी प्रक्रिया व पुरक व्यवसाय आधारीत चर्चासत्रांचे आयोजन, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री करणे, धान्य महोत्सवाचे आयोजन, विक्रेता खरेदीदार संमेलनाचे आयोजन, जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त तसेच उल्लेखनीय काम केलेल्या शेतक-यांचा सन्मान करणे.

     

    300 च्या वर स्टॉल :

     

    दि.3 ते 7 जानेवारी या कालावधीत आयोजित होणा-या जिल्हा कृषी महोत्सवामध्ये प्रदर्शनासाठी 300 च्या वर स्टॉलची उभारणी करण्याचे नियेाजन आहे. यात शासकीय योजनांची माहिती व तंत्रज्ञान, कृषी विद्यापीठ तंत्रज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, मत्स्यव्यवसाय तंत्रज्ञान, बियाणे / निविष्ठा तंत्रज्ञान इत्यादी, कृषी व सिंचन तंत्रज्ञान, बँकिंग सेक्टर, मायक्रो स्मॉल ॲन्ड मिडीयम एंटरप्राईझेस (एम.एस.एम.ई), कृषी यांत्रिकीकरण, अवजारे, उपकरणे, धान्य, फळे व भाजीपाला, पौष्टिक तृणधान्य, शेतकरी उत्पादक कंपनी, उमेद संलग्नित महिला गट व इतर, माविम संलग्नित महिला गट व इतर नाबार्ड संलग्नित उपक्रम, फूडस्टॉल व पशुप्रदर्शनीकरीता विविध स्टॉलची उभारणी होणार आहे.