Tag: खिचडी महोत्सव

  • आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी बनवली 7 हजार किलोपेक्षा अधिक खिचडी

    आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी बनवली 7 हजार किलोपेक्षा अधिक खिचडी

    News34 chandrapur

    चंद्रपूर : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध शेफ श्री. विष्णू मनोहर यांनी चंद्रपुरात आज सात हजार किलोपेक्षा जास्त तृणधान्यांची खिचडी बनवून विश्वविक्रम नोंदविला. महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक आणि मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राउंड येथे सुरू असलेल्या चांदा ॲग्रो 2024 या भव्य कृषी प्रदर्शनात हा विक्रम नोंदविण्यात आला आहे.

     

    विश्वगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार साजरे करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षानिमित्त ना. श्री. मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे विष्णू मनोहर यांनी चंद्रपूर येथे मिलेट खिचडी बनवून संपूर्ण जगाला मिलेटचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. 4 जानेवारीला रात्री एक महाकाय कढई नागपूरहून चंद्रपूर येथे आणण्यात आली, जी क्रेन द्वारे मैदानात उतरविण्यात आली. याबाबत चंद्रपुरकरांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळाली. पहाटे 6 वाजता विक्रमी खिचडी बनविण्यास सुरुवात झाली.

     

    6 हजार 750 किलो खिचडी बनविण्याचा संकल्प विष्णू मनोहर यांनी केला होता. विविध विभागातील कर्मचारी, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यावेळी स्वयंसेवक म्हणून उत्स्फूर्तपणे मदत करीत होते. ही खिचडी बनवण्याची पद्धत रेसिपी आणि मोठमोठ्या कढयांमधून टाकण्यात येणारे पदार्थ याबाबत सर्वच उपस्थितांमध्ये उत्साह दिसून आला.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 ‘मि‍लेट वर्ष’ म्‍हणून घोषित केल्‍यानंतर विष्‍णू मनोहर यांनी म‍िलेटच्‍या प्रचार व प्रसारासाठी वर्षभर वेगवेगळ्या शहरात 12 म‍िलेट्सचे पदार्थ तयार करण्‍याचा निर्धार केला होता. त्‍यानुसार आतापर्यंत नागपूर, औरंगाबाद व नाशिक येथे त्‍यांनी म‍िलेटचे विविध पदार्थ तयार केले आहेत.

     

    श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून आयोजित चांदा ॲग्रो 2024 मध्ये शेफ विष्‍णू मनोहर यांनी शुक्रवारी बाजरी हे म‍िलेट धान्‍य व सर्व भाज्‍यांचा वापर करून पूर्णान्‍न असलेली खिचडी तयार केली. त्‍यासाठी ते १० फूट व्‍यासाची, ५ फूट कढई, सुमारे ५०० किलो लाकूड वापरण्यात आले.

     

    विष्‍णू मनोहर यांनी याआधी दिल्‍ली येथे 5 हजार किलोची ‘समरसता खिचडी’ तयार केली आहे. नागपुरातील महाल भागात खिचडीला राष्‍ट्रीय अन्‍न घोषित करावे या मागणीसाठी 5 हजार किलोची खिचडी तयार केली होती. वनवासी कल्‍याण आश्रमाच्‍या डिलिस्‍टींग कार्यक्रमासाठी त्‍यांनी 10 हजार किलो मसालेभात व नागपुरातील खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात विष्‍णू मनोहर यांनी श्री गजानन महाराजांना ६ हजार ५०० किलो खिचडीचा नैवेद्य अर्पण केला होता.

     

    चांदा ॲग्रो 2024 मध्ये करण्यात आलेला विक्रम महाराष्ट्रातील बळीराजाला समर्पित करण्याचा निर्धार यावेळी विष्णू मनोहर यांनी व्यक्त केला. पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी ही संधी दिल्याबद्दल मनोहर यांनी त्यांचे आभारही मानले. राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव श्री अनुप कुमार यांच्या हस्ते विष्णू मनोहर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विवेक जॉन्सन, जिल्हा कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्माच्या प्रकल्प अधिकारी प्रीती हिरळकर, भाजपाचे महानगर अध्यक्ष श्री. राहुल पावडे, श्री. प्रकाश धारणे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्तश्री विपिन पालीवाल यांनी देखील ही खिचडी बनवताना विष्णू मनोहर यांच्या सोबत संवाद साधून उत्सुकतेने सर्व माहिती घेतली.

     

    खिचडीचे शिस्तबद्ध वाटप

    7 हजा किलोपेक्षा जास्त झालेली या खिचडीचे वाटप कसे करावे हा प्रश्न सर्वांनाच उत्सुकतेपटी पडलेला होता. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विवेक जॉन्सन आणि चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. विपिन पालीवाल यांनी संपूर्ण यंत्रणा शिस्तबद्ध रीतीने कामाला लावली व खिचडी शाळांमध्ये तसेच शहरातील वस्त्यांमध्ये वाटण्याची व्यवस्था केली. कृषी प्रदर्शनाच्या स्थळी सुद्धा विविध स्टॉल लावून आलेल्या प्रत्येकाला खिचडी देण्यात आली. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी स्वयंसेवक म्हणून अथक परिश्रम घेतले. शहरातील 35 हजार लोकांपर्यंत ही खिचडी पोहोचेल अशी व्यवस्था यावेळी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली होती. पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे ना. सुधीर मुनगंटीवार हे नागपूरला असल्याने त्यांनी फोनवरून श्री. विष्णू मनोहर यांना शुभेच्छा दिल्या आणि चंद्रपुरात हा विश्वविक्रम केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

  • चंद्रपुरात तयार होणार 6750 किलोग्रॅमची खिचडी

    चंद्रपुरात तयार होणार 6750 किलोग्रॅमची खिचडी

    News34 chandrapur

    चंद्रपूर : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात 3 ते 7 जानेवारी दरम्यान चांदा क्लब ग्राऊंडवर चांदा ॲग्रो – 2024 चे भव्यदिव्य आयोजन करण्यात येत आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थान यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते 3 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रिती हिरुळकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटेवार उपस्थित होते.

     

    या कृषी महोत्सवात शेतीविषयक तंत्रज्ञानासोबतच पशु प्रदर्शनी, चर्चा व परिसंवाद, खिचडी महोत्सव, धान्य महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रमासह नोंदणी केलेल्या शेतक-यांसाठी शेवटच्या दिवशी आकर्षक बक्षिसांची मेजवानी राहणार आहे. कृषी विषयक प्रदर्शन व शासकीय योजना शेतक-यांपर्यंत पोहचविणे, शेतकरी, शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार विपणन साखळी सक्षम करणे, समुह / गट स्थापित करून शेतकरी उत्पादन कंपन्यांचे सक्षमीकरण करणे, कृषी विषयक शेतकरी संवाद आयोजित करून शेतक-यांच्या समस्यांचे निराकरण करणे, विक्रेता ते खरीददार संमेलनाचे आयोजन करून बाजाराभिमुख कृषी उत्पादनास चालना देणे या उद्देशाने जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

     

    6750 किलोग्रॅमची खिचडी मुख्य आकर्षण : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य महोत्सवाच्या निमित्ताने चंद्रपूर येथील जिल्हा कृषी महोत्सवात 6750 किलोग्रॅमची खिचडी तयार करण्यात येणार आहे. यापूर्वी एप्रिल 2022 मध्ये नाशिक येथे बगरीपासून 6000 किलोग्रॅमची खिचडी बनवून इंडिया बुक व आशिया बुकमध्ये नोंद करण्यात आली होती. चंद्रपूर नगरीत जिल्हा कृषी महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र मिलेट महोत्सव अंतर्गत बाजरीचा वापर करून 6750 किलोग्रॅमची खिचडी तयार करण्यात येणार आहे.

     

    43 इंचाची पुंगनूर गाय विशेष आकर्षण :

     

    आंध्र प्रदेशातील चित्तुर प्रांतात आढळणारी पुंगनुर गाय हे या प्रदर्शनाचे आकर्षण राहणार आहे. ही गाय केवळ 2 फुट उंचीची असून रंग पांढरा व भुरकट असतो. वर्षभरामध्ये ही गाय 1000 लीटरहून अधिक तेही फॅटची मात्रा असलेले दूध देते, अशी मान्यता आहे. जिल्हा कृषी महोत्सवात 43 इंचाची पुंगनुर गाय विशेष आकर्षण असणार आहे.

     

    पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रम :

     

    दि.3 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता उद्घाटन समारंभ, गणेश स्तवन व गोंडी नृत्य (सादरकर्ते धनराज कोवे) सायं 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत संगीत रजनी कार्यक्रम. दि.4 जानेवारी रोजी सांय 6 ते रात्री 10 पर्यंत स्थानिक लोककला कार्यक्रम. दि.5 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 1 भव्य विश्वविक्रमी खिचडी (6750 किग्रॅ), सायं 6 ते 8 वाजेपर्यंत श्री दर्शन महाजन, पृथ्वीवरील शेतकरी, मिलेट शो – 2 अंकी नाटक, रात्री 8 ते 10 पर्यंत श्री. अंतबुध बोरकर व संच यांचे स्थानिक आदिवासी लोककला, नाट्य एकांकिका आणि लोककला नृत्य. दि. 6 जानेवारी सायं 6 ते रात्री 10 पर्यंत सुप्रसिध्द पार्श्वगायिका श्रीमती बेला शेंडे स्वराज संगीत रजनी, तसेच चला हवा येऊ द्या फेम हास्य अभिनेते भारत गणेशपुरे यांची विशेष उपस्थिती. शेवटच्या दिवशी 7 जानेवारी रोजी सांय 6 ते रात्री 10 पर्यंत महाराष्ट्राची लोकधारा आयोजित बहारदार कार्यक्रम व इतर कार्यक्रम.

     

    शेतक-यांसाठी आकर्षक बक्षीसे :

     

    कृषी प्रदर्शनासाठी नोंदणी केलेल्या शेतक-यांसाठी कृषी महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी इश्वर चिठ्ठीद्वारे निवडलेल्या शेतक-यांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. यात मिनी ट्रॅक्टर (28 ते 30 एच.पी.), रॉयल एनफिल्ड बुलेट (स्टॅन्डर्ड), पॉवर टिलर, पॅडी विडर, पॉवर विडर, आटा चक्की, भाजीपाला किट, पॉवर स्पेअर, चाप कटर आदींचा समावेश आहे.

     

    कृषी प्रदर्शन :

     

    शासकीय दालने, विविध कंपन्या, खाद्यपदार्थ व प्रात्याक्षिके यांचा समावेश. परिसंवादमध्ये कृषी, कृषी प्रक्रिया व पुरक व्यवसाय आधारीत चर्चासत्रांचे आयोजन, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री करणे, धान्य महोत्सवाचे आयोजन, विक्रेता खरेदीदार संमेलनाचे आयोजन, जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त तसेच उल्लेखनीय काम केलेल्या शेतक-यांचा सन्मान करणे.

     

    300 च्या वर स्टॉल :

     

    दि.3 ते 7 जानेवारी या कालावधीत आयोजित होणा-या जिल्हा कृषी महोत्सवामध्ये प्रदर्शनासाठी 300 च्या वर स्टॉलची उभारणी करण्याचे नियेाजन आहे. यात शासकीय योजनांची माहिती व तंत्रज्ञान, कृषी विद्यापीठ तंत्रज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, मत्स्यव्यवसाय तंत्रज्ञान, बियाणे / निविष्ठा तंत्रज्ञान इत्यादी, कृषी व सिंचन तंत्रज्ञान, बँकिंग सेक्टर, मायक्रो स्मॉल ॲन्ड मिडीयम एंटरप्राईझेस (एम.एस.एम.ई), कृषी यांत्रिकीकरण, अवजारे, उपकरणे, धान्य, फळे व भाजीपाला, पौष्टिक तृणधान्य, शेतकरी उत्पादक कंपनी, उमेद संलग्नित महिला गट व इतर, माविम संलग्नित महिला गट व इतर नाबार्ड संलग्नित उपक्रम, फूडस्टॉल व पशुप्रदर्शनीकरीता विविध स्टॉलची उभारणी होणार आहे.