Tag: खिचडीचा विश्वविक्रम

  • खिचडीची वाट बघता बघता नागरिकांचीचं खिचडी झाली

    खिचडीची वाट बघता बघता नागरिकांचीचं खिचडी झाली

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील चांदा क्लब ग्राउंड या ठिकाणी सुरू असलेल्या चांदा ऍग्रो कृषी प्रदर्शनात महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चांदा क्लब ग्राउंड याठिकाणी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहर यांनी चंद्रपुरात सात हजार किलोची तृणधान्यांची खिचडी बनवून विश्वविक्रम नोंदविला असे सांगण्यात येत असून परंतु ही एवढ्या प्रमाणात बनवलेली खिचडी नेमकी गेली कुठे हा प्रश्नचिन्ह आम आदमी पार्टीच्या युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी केला आहे.

    प्रदर्शनातील उपस्थित जनतेकडून सांगण्यात आले की खिचडी अर्धी सुद्धा बनवण्यात आली नाही. शहरात अनेक ठिकाणी खिचडी वाटपाचे स्टॉल लावण्यात आले होते तेथील जनता सकाळी दहा वाजता पासून तरी पाच वाजेपर्यंत या आगळ्यावेगळ्या विश्वविक्रम नोंदविणाऱ्या खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होती परंतु त्या सर्व जनतेच्या वाटेला निराशा आली.

     

    कारण संबंधित स्टॉल वर उपस्थित असणारे कार्यकर्ते यांनी स्टॉलवर लागलेले बॅनर काढून तेथून निघून गेले परंतु प्रत्येक येणारा व्यक्ती स्टॉल कडे बघून निराशेने परत जाताना बोलत होता जर द्यायचेच नव्हते तर बॅनर लाऊन‌ स्टाईल मारायची काय गरज होती.अशातच जनतेची आम आदमी पार्टीकडे तक्रार आली की आम्हाला लोकांना खिचडीसाठी बोलवले परंतु प्रत्यक्षात खिचडी स्टॉल पर्यंत पोहोचलीच नाही नेमकी खिचडी किती किलोची बनली हा विश्वविक्रम केवळ कागदावरच का असा प्रश्न चंद्रपूरची जनता करू लागली आहे.म्हणून आपने या चंद्रपुरातील खिचडी मध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला आहे.तसेच प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे की मनपाच्या शाळेमध्ये खिचडी वाटली परंतु मनपाच्या शाळेची पटसंख्या किती असाही प्रश्न आपतर्फे उपस्थित करण्यात आला.

     

    ढिसाळ नियोजनाची खिचडी?

    खिचडी बनल्यावर कृषी महोत्सव स्थळी नागरिकांची गर्दी उसळली, आधी रांगेत नागरिकांनी खिचडीचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न केला मात्र गर्दी जास्त असल्याने नागरिक ऐकायला तयार नव्हते, खिचडी मिळाली मात्र चम्मच चा त्या ठिकाणी अभाव आढळला, अनेक नागरिक जमिनीवर बसून खिचडी खाऊ लागले होते, पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या सूक्ष्म नियोजनाचा अखेर अभाव दिसून आला. विविध प्रभागात नागरिक खिचडी ची वाट बघत होते मात्र काही ठिकाणी नागरिकांच्या पदरी निराशा पडली.

  • आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी बनवली 7 हजार किलोपेक्षा अधिक खिचडी

    आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी बनवली 7 हजार किलोपेक्षा अधिक खिचडी

    News34 chandrapur

    चंद्रपूर : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध शेफ श्री. विष्णू मनोहर यांनी चंद्रपुरात आज सात हजार किलोपेक्षा जास्त तृणधान्यांची खिचडी बनवून विश्वविक्रम नोंदविला. महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक आणि मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राउंड येथे सुरू असलेल्या चांदा ॲग्रो 2024 या भव्य कृषी प्रदर्शनात हा विक्रम नोंदविण्यात आला आहे.

     

    विश्वगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार साजरे करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षानिमित्त ना. श्री. मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे विष्णू मनोहर यांनी चंद्रपूर येथे मिलेट खिचडी बनवून संपूर्ण जगाला मिलेटचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. 4 जानेवारीला रात्री एक महाकाय कढई नागपूरहून चंद्रपूर येथे आणण्यात आली, जी क्रेन द्वारे मैदानात उतरविण्यात आली. याबाबत चंद्रपुरकरांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळाली. पहाटे 6 वाजता विक्रमी खिचडी बनविण्यास सुरुवात झाली.

     

    6 हजार 750 किलो खिचडी बनविण्याचा संकल्प विष्णू मनोहर यांनी केला होता. विविध विभागातील कर्मचारी, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यावेळी स्वयंसेवक म्हणून उत्स्फूर्तपणे मदत करीत होते. ही खिचडी बनवण्याची पद्धत रेसिपी आणि मोठमोठ्या कढयांमधून टाकण्यात येणारे पदार्थ याबाबत सर्वच उपस्थितांमध्ये उत्साह दिसून आला.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 ‘मि‍लेट वर्ष’ म्‍हणून घोषित केल्‍यानंतर विष्‍णू मनोहर यांनी म‍िलेटच्‍या प्रचार व प्रसारासाठी वर्षभर वेगवेगळ्या शहरात 12 म‍िलेट्सचे पदार्थ तयार करण्‍याचा निर्धार केला होता. त्‍यानुसार आतापर्यंत नागपूर, औरंगाबाद व नाशिक येथे त्‍यांनी म‍िलेटचे विविध पदार्थ तयार केले आहेत.

     

    श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून आयोजित चांदा ॲग्रो 2024 मध्ये शेफ विष्‍णू मनोहर यांनी शुक्रवारी बाजरी हे म‍िलेट धान्‍य व सर्व भाज्‍यांचा वापर करून पूर्णान्‍न असलेली खिचडी तयार केली. त्‍यासाठी ते १० फूट व्‍यासाची, ५ फूट कढई, सुमारे ५०० किलो लाकूड वापरण्यात आले.

     

    विष्‍णू मनोहर यांनी याआधी दिल्‍ली येथे 5 हजार किलोची ‘समरसता खिचडी’ तयार केली आहे. नागपुरातील महाल भागात खिचडीला राष्‍ट्रीय अन्‍न घोषित करावे या मागणीसाठी 5 हजार किलोची खिचडी तयार केली होती. वनवासी कल्‍याण आश्रमाच्‍या डिलिस्‍टींग कार्यक्रमासाठी त्‍यांनी 10 हजार किलो मसालेभात व नागपुरातील खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात विष्‍णू मनोहर यांनी श्री गजानन महाराजांना ६ हजार ५०० किलो खिचडीचा नैवेद्य अर्पण केला होता.

     

    चांदा ॲग्रो 2024 मध्ये करण्यात आलेला विक्रम महाराष्ट्रातील बळीराजाला समर्पित करण्याचा निर्धार यावेळी विष्णू मनोहर यांनी व्यक्त केला. पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी ही संधी दिल्याबद्दल मनोहर यांनी त्यांचे आभारही मानले. राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव श्री अनुप कुमार यांच्या हस्ते विष्णू मनोहर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विवेक जॉन्सन, जिल्हा कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्माच्या प्रकल्प अधिकारी प्रीती हिरळकर, भाजपाचे महानगर अध्यक्ष श्री. राहुल पावडे, श्री. प्रकाश धारणे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्तश्री विपिन पालीवाल यांनी देखील ही खिचडी बनवताना विष्णू मनोहर यांच्या सोबत संवाद साधून उत्सुकतेने सर्व माहिती घेतली.

     

    खिचडीचे शिस्तबद्ध वाटप

    7 हजा किलोपेक्षा जास्त झालेली या खिचडीचे वाटप कसे करावे हा प्रश्न सर्वांनाच उत्सुकतेपटी पडलेला होता. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विवेक जॉन्सन आणि चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. विपिन पालीवाल यांनी संपूर्ण यंत्रणा शिस्तबद्ध रीतीने कामाला लावली व खिचडी शाळांमध्ये तसेच शहरातील वस्त्यांमध्ये वाटण्याची व्यवस्था केली. कृषी प्रदर्शनाच्या स्थळी सुद्धा विविध स्टॉल लावून आलेल्या प्रत्येकाला खिचडी देण्यात आली. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी स्वयंसेवक म्हणून अथक परिश्रम घेतले. शहरातील 35 हजार लोकांपर्यंत ही खिचडी पोहोचेल अशी व्यवस्था यावेळी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली होती. पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे ना. सुधीर मुनगंटीवार हे नागपूरला असल्याने त्यांनी फोनवरून श्री. विष्णू मनोहर यांना शुभेच्छा दिल्या आणि चंद्रपुरात हा विश्वविक्रम केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

  • चंद्रपुरात 6 हजार 750 किलोच्या खिचडी विश्वविक्रमाला सुरुवात

    चंद्रपुरात 6 हजार 750 किलोच्या खिचडी विश्वविक्रमाला सुरुवात

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मागर्दर्शनात आयोजित चांदा एग्रो 2024 मध्‍ये शुक्रवार, दि. 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर ‘मिलेट्स ऊर्जा’ म्‍हणजेच मिलेट्सचा वापर करून 6750 किलो पदार्थांची खिचडी तयार करून नवा विश्‍वविक्रम स्‍थापित करणार आहेत.

     

    कृषी तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापन यंत्रणा (आत्‍मा), चंद्रपूर व कृषी विभाग व पशुसंवर्धन विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने चांदा क्लब मैदान, चंद्रपूर येथे विष्‍णू मनोहर आत्‍मा संस्‍थेच्‍या सहकार्याने ‘मिलेट्स’ची खिचडी तयार करायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 हे वर्ष ‘मि‍लेट वर्ष’ म्‍हणून घोषित केल्‍यानंतर विष्‍णू मनोहर यांनी मिलेटच्‍या प्रचार व प्रसारासाठी वर्षभर वेगवेगळ्या शहरात 12 मिलेट्सचे पदार्थ तयार करण्‍याचा निर्धार केला होता. त्‍यानुसार आतापर्यंत नागपूर, औरंगाबाद व नाशिक येथे त्‍यांनी मिलेटचे विविध पदार्थ तयार केले आहेत.

     

    चांदा एग्रोमध्‍ये विष्‍णू मनोहर शुक्रवारी बाजरी हे मिलेट धान्‍य व सर्व भाज्‍यांचा वापर करून पुर्णान्‍न असलेली खिचडी तयार करणार आहेत. त्‍यासाठी ते 10 फूट व्‍यासाची, 5 फूट कढई वापरणार असून त्‍याकरिता सुमारे 500 किलो लाकूड वापरला जाईल.
    मध्यरात्री पासून खिचडी बनवायला मनोहर यांनी सुरुवात केली आहे, दुपारपर्यंत ही खिचडी तयार होणार असे शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितले.

     

    विष्‍णू मनोहर यांनी याआधी दिल्‍ली येथे 5 हजार किलोची ‘समरसता खिचडी’ तयार केली होती. तसेच खिचडीला राष्‍ट्रीय अन्‍न घोषित करावे, या मागणीसाठी नागपुरातील महाल भागात त्यांनी 5 हजार किलोची खिचडी तयार केली होती. नुकतेच वनवासी कल्‍याण आश्रमाच्‍या डीलिस्‍टींग कार्यक्रमासाठी त्‍यांनी 10 हजार किलो मसालेभात व नागपुरातील खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात विष्‍णू मनोहर यांनी श्री. गजानन महाराजांना 6500 किलो खिचडीचा नैवेद्य सादर केला होता.